'रामायण'चे निर्माते रामानंद सागर होते उर्दूचे महान लेखक..

Story by  test | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
Ramanand sagar
Ramanand sagar

 

ख्वाजा अहमद अब्बास यांनी रामानंद सागर यांच्या गाजलेल्या आणि प्रसिद्ध उर्दू कादंबरी 'और इंसान मर गया' साठी प्रस्तावना लिहिली होती. त्यात ते म्हणाले की, "सुदैवाने किंवा दुर्दैवाने, रामानंद सागर हे कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य नाहीत. तो माणसांच्या पक्षाचा आहे. मानवतेचा झेंडा फडकवणाऱ्या उच्च दर्जाच्या कलाकारांमध्ये त्यांना मानाचे स्थान देण्यात आले आहे”.

रामानंद सागर यांची टेलिव्हिजनवरील महान कलाकृती रामायणासाठी ते ओळखले जातात. १९८७ मध्ये त्यांनी या टीव्ही मालिकेचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन केले होते, जे देशात तुफान गाजले. भारतातील लोक बहुधा त्यांना एक चित्रपट निर्माता म्हणून ओळखतात, ज्यांनी आरजू, घुंगट, जिंदगी आणि आँखे सारख्या उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. त्यांना सिनेमा आणि टीव्हीचे वेड तर होतेच मात्र यासोबतच ते त्यांच्या काळातील प्रख्यात उर्दू लेखक होते हे विसरता कामा नये. 
 
सागर हे फारसी आणि उर्दू भाषेचे अभ्यासक होते. त्यांचा मुलगा, प्रेम सागर लिहितो, “१९४२ मध्ये, (त्यांना) पंजाब विद्यापीठाने मुन्शी फझल (पर्शियनमध्ये पीएचडी) ही प्रतिष्ठित पदवी त्यांना प्रदान केली. त्यांनी दोन सुवर्णपदके पटकावली. शिवाय उर्दू आणि पर्शियन या विषयांसाठी असणाऱ्या पदवी परीक्षांमध्ये अव्वल स्थान पटकावले आणि त्यांना 'अदीब-ए-आलम' ही पदवी देण्यात आली.
लाहोर येथून प्रकाशित होणाऱ्या ‘मिलाप’ या उर्दू दैनिकासाठी सागर यांनी पत्रकार म्हणून काम सुरु केले. आणि हीच त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ठरली आणि पुढे ते त्याचे संपादक झाले. १९४१ मध्ये त्यांना क्षयरोग (टीबी) झाला. त्यामुळे त्यांना काश्मीरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या काळात टीबी हा जीवघेणा आजार होता आणि डॉक्टरांचे असे म्हणणे होते की, सागर जगणार नाहीत, पण एखाद्या 'व्यक्तीला मरण पराभूत करू शकत नाही'.
 
सागर यांनी सेनिटोरियम येथे आपले अनुभव लिहायला सुरुवात केली. प्रेम लिहितात, “त्यांनी ‘मौत के बिस्तर  से’ किंवा ‘डायरी ऑफ अ टीबी पेशंट’ या शीर्षकानी आपले लेखन सुरु केले. आणि लाहोरमधील प्रसिद्ध उर्दू मासिक ‘अदब-ए-मशरिक’ यांना पाठवण्यास सुरुवात केली. नियतकालिकाच्या संपादकाला त्याच्या लिखाणातील विरोधाभास आणि इतरांना जगण्याचा मार्ग दाखवणारा रुग्णालयात मृत्यूमुखी पडलेल्या माणसाला धक्का बसला. ही लेखमालिका खूप लोकप्रिय झाली आणि जेव्हा सागर यांची हॉस्पिटलमधून सुट्टी झाली तोपर्यंत ते एक प्रसिद्ध उर्दू लेखक म्हणून नावारूपाला आले होते.
 
संकटे, वेदना आणि दु:ख महान साहित्यकृतींना प्रेरणा देतात. भारताच्या फाळणीने सागर यांच्यात वेगळाच संचार झाला. त्यांना लाहोरमधील घर सोडून श्रीनगरमध्ये आश्रय घेण्यास भाग पाडण्यात आले. या सर्वात त्यांनी माणसांची वाईट बाजू पाहिली. आणि त्यातून त्यांच्या मनात आलेल्या विचाराने ‘और इंसान मर गया' या त्यांच्या कादंबरीने जन्म घेतला, जी शोकांतिकेवर लिहिलेली उर्दू कादंबरी सर्वाधिक गाजली.
 
सागर हे आपल्या कुटुंबासह श्रीनगरमध्ये निर्वासित म्हणून राहत होते. २७ ऑक्टोबर १९४७ रोजी पाकव्याप्त काश्मीर वर आक्रमण झाले तेव्हा पुन्हा एकदा निर्वासित व्हावे लागले. अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी डकोटा DC-३ तैनात करण्यात आले होते. विमानात जास्त लोकांना बसवता यावे म्हणून लोकांना सामान नेऊ नये असे सांगण्यात आले होते. त्यावेळेस बिजू पटनायक हे पायलट होते आणि त्यांनी डोक्यावर पेटी घेतलेला एक माणूस पाहिला. संतापलेल्या पटनाईकने ओरडले, “तू लोभी माणूस आहेस! एका व्यक्तीच्या जीवाची किंमत तू तुझ्या संपत्ती सोबत करतोस” असे बोलून त्यांनी लात मारून ती पेटी उघडली. पेटी हस्तलिखितानी भरलेली होती. 
 
तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून रामानंद सागर होते. ते रडत होते, त्यांच्या भावना अनावर होऊन ते म्हणाले कि, “या माझ्या ‘और इंसान मार गया’ या कादंबरीच्या नोट्स आहेत, माझ्या चिरडलेल्या भावना, युद्धाच्या निरर्थकतेबद्दल आणि शांततेच्या गरजेबद्दल. ही संपत्ती मी माझ्यासोबत घेऊन जात आहे!” पटनायक यांना सागर यांच्यात एका मोठ्या लेखकाची छबी दिसली आणि त्यांनी सागर यांच्या पायांना स्पर्श करून, त्यांचे कुटुंब सुखरूप दिल्लीत पोहोचवले.
 
सागर हे आरामदायी खुर्चीवर बसलेले बुद्धीजीवी नव्हते. त्यांना तळागाळात जाऊन लोकांच्या वेदना दुख यांवर काहीतरी लिहायचे होते त्यांच्यासाठी करायचे होते. कारण काश्मीरवर आक्रमण होत होते. लोक मारले जात होते. महिलांवर बलात्कार होत होते. दिल्लीत बसून ते कसे लिहू शकणार होते. त्यामुळे त्यांनी आपल्या कुटुंबाला दिल्लीतील मुस्लिम परिसरात मुस्लिम मित्रांकडे सोडले आणि ते स्वतः काश्मीरला परत आले. कल्पना केली तर एक सर्व खूप भयावह होत, काही महिन्यांपूर्वी लाहोरमधून जातीय हिंसाचाराने उखडलेला एक माणूस त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी त्याच्या मुस्लिम मित्रांवर अवलंबून होता.
 
सागर एकटे नव्हते. त्या काळातील इतर अनेक साहित्यिक त्यांना काश्मीरमध्ये जोडले गेले. ख्वाजा अहमद अब्बास, राजिंदर सिंग बेदी, चंद्रकिरण सोनरेक्स, नवतेज सिंग, शेर सिंग, राजबंस खन्ना हे काही प्रमुख लेखक होते जे युद्ध आघाडीवर पोहोचले होते. अब्बास हे त्यांच्या आठवणी सांगत असताना म्हणतात कि, " काश्मीर मधील वातावरणाने मला स्पेन आणि आंतरराष्ट्रीय ब्रिगेडची आठवण करून दिली, जिथे असे म्हटले जाते की लेखक त्यांच्या पुस्तकांसाठी जगतात आणि कवी त्यांच्या कवितांसाठी मरतात."
 
 
या युद्धा दरम्यान 'और इंसान मर गया' हे पुस्तक पूर्ण झाले. अब्बास हे सागरबद्दल बोलत असताना म्हणाले कि, “मी जेव्हा खोलीत प्रवेश केला तेव्हा कोणीतरी एक व्यक्ती वाचत होती, आणि तो व्यक्ती म्हणजेच रामानंद सागर होता. एक अद्भुत जगावेगळा माणूस जो काही दिवसांपूर्वीच आपल्या कुटुंबासह निर्वासित म्हणून दिल्लीत आलेला आणि ताबडतोब आपल्या पत्नी आणि मुलांना तिथे सोडून युद्ध आघाडीवर परतला. ते त्याच्या कादंबरीचा पहिला धडा वाचत होते आणि ऐकत होते. हे सर्व म्हणजे माझ्यासाठी आशेचा आणि मानवतेचा मार्ग दाखवणारे मूर्त रूपच होते. अंधारात रस्ता दाखवणारी ती प्रकाशाची छोटीशी किरण होती. आता माझ्या समोर अंधार उरला नव्हता, कारण मला प्रकाशाचा मोती सापडला होता.
 
‘और इंसान मर गया’ याचे वर्णन करताना सागर म्हणाला, “प्रेम द्वेषाइतके मजबूत नाही. या कादंबरीतून मला तुमच्यात द्वेष निर्माण करायचा आहे. जेणेकरुन तुमच्या भावना मजबूत आणि दृढ होतील. जर तुम्ही या खून, बलात्कार आणि हिंसाचाराचा तुमच्या अंतःकरणापासून तिरस्कार करू शकत असाल, तर हा माझा आणि माझ्या कादंबरीचे यश आहे असेच समजेल.
 
प्रा. इश्तियाक अहमद यांच्या मते, "और इंसान मर गया, फाळणीवरील सर्वात मानवतावादी आणि राजकीयदृष्ट्या तटस्थ कादंबरी म्हणून ओळख निर्माण केली आहे." या कादंबरीला समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि सागर हे उर्दू लेखनातील एक दिग्गज म्हणून प्रस्थापित झाले. त्यांनी साहित्यनिर्मिती का थांबवली, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. त्यांनी चित्रपटांसाठी लेखन केले होते, परंतु कथा आणि कादंबरी लिहिणे बंद केले होते. त्याचे उत्तर त्यांनी अंदाजाच्या स्वरूपात दिले. 
 
जुलै १९४८ मध्ये लिहिलेल्या 'और इंसान मर गया'च्या प्रस्तावनेत सागर यांनी लिहिले, "माझ्या आत बरेच काही आहे जे लेखनाच्या रूपात माझ्यातून बाहेर येऊ इच्छित आहे. पण, मला जाणवलं की, पुढचा बराच काळ मी केवळ साहित्यिक हेतूने काही लिहू शकणार नाही. कारण माझे पोट भरण्याची गरज माझ्या आत्म्याला आणि मनाला खायला घालण्यापेक्षा जास्त वेदनादायक बनली आहे.