राज्यभरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 5 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

राज्यभरात मेघगर्जना व वादळी पावसाने दमदार हजेरी लावली. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपीट
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड आणि कन्नड तालुक्यातील अनेक भागात गारपीट आणि वादळी पावसाने यंदाच्याही रब्बी हंगामातील पिके उध्वस्त केली. काल सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी गारपीट झाल्यानं अभी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आणि इतर पिक आडवी झाली आहेत.  

सध्या गहू, ज्वारी आणि हरभरा ही मुख्य रब्बी पिके परिपक्व झाली आहेत, तर काही ठिकाणी काढणीच्या अवस्थेत आहेत, त्याचवेळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. मागच्या वर्षी अशाच पद्धतीने काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झालं होतं. आता यंदाही आणखी काही दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्यामुळे शेतकरी भयभीत झाला आहे.
   
अकोल्यातही पावसाची हजेरी
अकोला जिल्ह्यातील बाळापुर तेल्हारा आणि अकोट तालुक्यातल्या काही भागात अवकाळी पावसानं चांगलच झोडपलये. तर तेल्हारा तालुक्यात पावसानं मोठी हजेरी लावली आहे. आज रात्री 8 वाजेपासून जिल्ह्यातील तीन तालुक्यात अवकाळी पावसान हजेरी लावली आहे. याशिवाय अकोला तालुक्यातील केळीवेळी आणि दहिहंडा, कुटासा या ग्रामीण भागातही पाऊस सुरू आहे. सध्या हरभरा सोंगणीला आलाय. जेमतेम सोंगणीला सुरवात होणार तोच विजांच्या कडकडाटासह अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळ पुन्हा एकदा शेतकरऱ्यांसमोर आस्मानी संकटात ठाकले आहे.

जालन्यात जाफराबाद तालुक्यात तुफान गारपीट
भोकरदन तालुक्यासह जाफराबाद तालुक्यात सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस आणि मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने हरबरा, गव्हाच्या पिकासह शेतकऱ्याच्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या वादळी वारासह गारांचा पाऊस झाल्याने ऐन काढणीला आलेल्या गहू, हरभरा, मका, कांदा, ज्वारी, भाजरी यासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस
बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तर आज दुपारनंतर काही भागात वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. नांदुरा,जळगाव जामोद आणि मलकापूर , संग्रामपूर तालुक्यातील काही परिसरात गारपीटीसह मुसळधार पाऊस झाला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पीक असलेल्या गहू, हरबरा, कांदा, भाजीपाला आणि फळबागांचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.