पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरील रेमल चक्रीवादळामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. रविवारी रात्री हे चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकले होते. रेमल वादळामुळे जवळपास १६ जणांचा मृत्यू झाला आहे. हे वारे खूपच शक्तीशाली आहे. प्रति तास ११० किमी वेगाने वाहत असलेल्या या वादळाचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे.
रेमल वादळामुळे सुमारे २९ हजार घरांचे नुकसान झाले आहे.तसेच राज्यातील दन हजार हून झाडे कोसळली आहेत. त्याचसोबत अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत. यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. एका हिंदी वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी हे वारे वाहत आहे त्या ठिकाणी ८.४ दशलक्ष लोक राहत आहेत. त्यात जवळपास ३.६ दशलक्ष लहान मुलांचा समावेश आहे. या चक्रीवादळाचा धोका भारताच्या किनारपट्टीवरील लोकांनादेखील बसला आहे. या चक्रीवादळामुळे सुमारे दहा लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
रविवारी हे चक्रीवादळ बांग्लादेशमधील बंदर मोंगला आणि भारताच्या पश्चिम बंगालच्या सागर बेटावरुन गेले. त्यामुळे त्या परिसरातील लोकांना या वाऱ्याचा जबरदस्त फटका बसला आहे. हे चक्रिवादळ पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवरुन आतल्या बाजूला सरकल्यानंतर सोमवारी या वादळाचा जोर कमी झाला.
कोलकत्यासह किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये घरांची छपरे कोसळली, झाडे पडली. त्यामुळे रस्ते बंद झाले होते. तसेच वीजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा बंद झाला होता. कोलकत्यात अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने लोकांना त्रास सहन करावा लागला. कोलकत्यातील रेल्वे सेवा तीन तास बंद होती. त्यामुळे लोकांना एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी जाता येत नव्हते. ही परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे काम सुरु आहेत.