सिंगापूरच्या पंतप्रधानांनी वाहिली महात्मा गांधींना आदरांजली, भारत दौऱ्याला सुरुवात

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
सिंगापूरच्या पंतप्रधानांनी वाहिली महात्मा गांधींना आदरांजली
सिंगापूरच्या पंतप्रधानांनी वाहिली महात्मा गांधींना आदरांजली

 

सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी आपल्या पहिल्या अधिकृत भारत दौऱ्याची सुरुवात नवी दिल्लीतील राजघाट येथे महात्मा गांधी यांना आदरांजली वाहून केली. तीन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या वोंग यांच्यासोबत त्यांच्या पत्नी लू त्झे लुई आणि एक उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळही आहे.

पंतप्रधान वोंग यांनी बुधवारी राजघाट येथे महात्मा गांधींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. यावेळी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, "बापूंचे सत्य आणि अहिंसेचे वैश्विक आदर्श आजही तितकेच समर्पक आहेत आणि आम्हाला सतत प्रेरणा देत राहतात."

या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान वोंग, भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक करतील आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतील. मंगळवारी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत व्यापार, गुंतवणूक, फिनटेक, कौशल्य विकास आणि आरोग्य सेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली.

भारत आणि सिंगापूर आपल्या राजनैतिक संबंधांची ६० वर्षे पूर्ण करत असताना हा दौरा होत असल्याने, त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या द्विपक्षीय चर्चेमुळे दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.