ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी गुलजार यांच्यावरील कविता व त्यांच्या सहवासातील क्षणांच्या आठवणींनी जश्ने गुलजार कार्यक्रम रंगला. खादिमाने उर्दू फोरमच्या वतीने आयोजित गुलझार उर्दू क्लास व जश्ने गुलजार कार्यक्रम समाजकल्याण केंद्रात झाला.
यावेळी स्मिता देशपांडे, हेमंत कुलकर्णी, वृषाली बोणे, इरफान कारीगर, हारून करकम, नासिरुद्दीन आळंदकर व मोनिकासिंग ठाकूर यांनी गुलजार यांच्यावर स्वरचित कविता सादर केल्या. यावेळी बोलताना आंतरराष्ट्रीय शिल्पकार भगवान रामपुरे यांनी सांगितले की, उर्दूचा माझा परिचय गुलझार यांच्या मिर्झा गालिब या मालिकेमुळे झाला.
यावेळी आंतरराष्ट्रीय शिल्पकार भगवान रामपुरे यांनी सांगितले की, मिर्झागालिबच्या प्रतिमेचा एवाने गालिब पुतळा दिल्लीमध्ये गुलझार यांनी स्थापन केला. या माध्यमातून त्यांनी दिलेल्या संधीने मला जागतिक स्तरावर पोहोचण्याची संधी मिळाली.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिकांसिंग ठाकूर यांनी सांगितले की, उर्दू ही सरळ भाषा असून शिकण्यासाठी सोपी आहे. गालिब, मीर गुलजार यांचे नावाने कविता सोशल मिडियावर प्रसिध्द होतात त्या सत्य नसतात. त्याऐवजी त्यांचे मूळ साहित्य किंवा रेख्ता सारख्या संकेतस्थळांचा उपयोग करायला हवा. मुळ पुस्तकांचे वाचन हे सर्वाधिक प्रभावी ठरते.
उर्दू शिकणाऱ्या २५ विद्यार्थ्यांना मोहिब्बे उर्दू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फोरमचे खजिनदार नासिरुद्दीन आळंदकर यांनी उपक्रमांची माहिती दिली. डॉ. अ. रशीद शेख यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. फोरमचे संचालक अन्वर कमिश्नर व नसिरुद्दीन आळंदकर यांनी सूत्रसंचालन केले. उर्दू वर्ग शिक्षक हारून करकम व समन्वयक रफिक खान यांनी आभार मानले.