‘बीएसएफने पाकच्या ११७ चौक्या उद्ध्वस्त केल्या’

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बीएसएफच्या जवानांचा सन्मान करताना
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बीएसएफच्या जवानांचा सन्मान करताना

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील पूँच येथे सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांना संबोधित केले. याप्रसंगी त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर' या कारवाईची माहिती दिली. या कारवाईदरम्यान सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानच्या तब्बल ११८ चौक्या उद्ध्वस्त केल्याचे त्यांनी नमूद केले. या कारवाईमुळे पाकिस्तानच्या पाळत ठेवण्याच्या आणि दळणवळण क्षमतेवर मोठा आघात झाल्याचे शहा यांनी सांगितले.

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सरकारने भारतीय लष्कराला दहशतवादी तळांवर कठोर प्रत्युत्तर देण्याचे स्वातंत्र्य दिले होते, असे शहा यांनी यावेळी स्पष्ट केले. पाकिस्तानने भारतीय निवासी भागांवर हल्ले केले तेव्हा, जम्मू सीमेवरील बीएसएफच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. या प्रतिहल्ल्यात केवळ तीन दिवसांत ११८ हून अधिक पाकिस्तानी चौक्या आणि त्यांची संपूर्ण पाळत ठेवण्याची प्रणाली (surveillance system) नष्ट करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

बीएसएफच्या महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईमुळे पाकिस्तानच्या दळणवळण प्रणालीला आणि पाळत ठेवण्याच्या उपकरणांना मोठा धक्का बसला. पाकिस्तानला हे नुकसान भरून काढण्यासाठी चार ते पाच वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे अमित शहा यांनी वक्तव्य केले. शांततेच्या काळातही बीएसएफने पाकिस्तानच्या चौक्यांवर बारीक नजर ठेवली होती आणि 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान अचूक गुप्तचर माहितीच्या आधारे त्यांनी ही कारवाई केली, असेही त्यांनी सांगितले.

अमित शहा यांनी यावेळी जवानांच्या शौर्याचे आणि देशभक्तीचे कौतुक केले. देशाच्या १४० कोटी जनतेच्या वतीने त्यांनी बीएसएफच्या सीमा रक्षकांचे आभार मानले. ते म्हणाले की, मनात देशाभिमानाची भावना आणि सर्वोच्च बलिदानाची जिद्द असेल तरच असे शौर्य दिसून येते.

या भेटीदरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील एकूण सुरक्षा परिस्थितीचा आणि आगामी अमरनाथ यात्रेच्या तयारीचाही आढावा घेतला. तसेच, त्यांनी पाकिस्तानी गोळीबाराचा फटका बसलेल्या काही कुटुंबांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी बीएसएफ २४ तास, ३६५ दिवस सज्ज असते, यावरही त्यांनी भर दिला.