भारतीय सेना देशभरातील पोखरण, बबिना आणि जोशीमठ येथील फायरिंग रेंजवर तसंच आग्रा आणि गोपालपूर येथे हवाई संरक्षण उपकरणांच्या प्रदर्शनासह व्यापक क्षमता विकास चाचण्या घेत आहे. या चाचण्या जवळपास युद्धजन्य परिस्थितीत इलेक्ट्रॉनिक युद्ध अनुकरणासह राबवल्या जात आहेत, ज्यामुळे अत्याधुनिक संरक्षण प्रणालींची कसून तपासणी होत आहे.
२७ मे रोजी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी बबिना फायरिंग रेंजला भेट देऊन चालू चाचण्यांचा आढावा घेतला आणि संरक्षण उद्योग भागीदारांसह चर्चा केली. संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार, या चाचण्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत विकसित तंत्रज्ञानावर केंद्रित आहेत, ज्याचा उद्देश स्वदेशी क्षमता वाढवणं आहे.
या चाचण्या ‘दशकभराच्या परिवर्तन’ या सेनेच्या रोडमॅपचा महत्त्वाचा टप्पा आहेत, ज्यामुळे नव्या तंत्रज्ञानाचा जलद अवलंब सुनिश्चित होईल. यात मोठ्या संख्येने स्वदेशी संरक्षण उत्पादकांचा सहभाग आहे, जे सेना आणि देशी उद्योगांमधील वाढत्या सहकार्याचं द्योतक आहे.
चाचणी होणाऱ्या प्रमुख प्रणालींमध्ये मानवरहित हवाई प्रणाली (UAS), ड्रोनद्वारे प्रक्षेपित अचूक मार्गदर्शित शस्त्रे (ULPGM), रनवे-स्वतंत्र दूरस्थ चालित हवाई प्रणाली (RPAS), काउंटर-UAS उपाय, लॉइटरींग म्युनिशन्स, विशेष व्हर्टिकल लॉन्च ड्रोन, अचूक मल्टी-म्युनिशन डिलिव्हरी सिस्टम्स, एकीकृत ड्रोन शोध आणि प्रतिबंध प्रणाली (IDDIS), कमी उंचीचे हलके रडार, पुढील पिढीतील VSHORADS इन्फ्रारेड प्रणाली आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध (EW) व्यासपीठांचा समावेश आहे.