पाकिस्तान दहशतवादाचा मूळ स्रोत आहे, असा घणाघाती आरोप AIMIM प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शनिवारी ३१ मे २०२५ रोजी अल्जेरियात केला. सर्वपक्षीय शिष्टमंडळासह अल्जेरियात असलेल्या ओवेसी यांनी पाकिस्तानला तकफिरीवादाचा केंद्रबिंदू ठरवलं. स्थानिक माध्यमे, विचारवंत आणि भारतीय समुदायाला संबोधित करताना त्यांनी पाकिस्तानातील दहशतवादी गट आणि दाइश, अल-कायदा यांच्या विचारसरणीत काहीही फरक नसल्याचं सांगितलं.
“पाकिस्तान तकफिरीवादाचा उगम आहे. त्यांना वाटतं की त्यांची दहशतवादी कृत्ये धर्मसम्मत आहेत. हे पूर्णपणे चुकीचं आहे. इस्लाम कोणाच्याही हत्येला परवानगी देत नाही,” असं ओवेसी म्हणाले. त्यांनी पाकिस्तानला पुन्हा FATF च्या ग्रे लिस्टवर आणण्याची मागणी केली.
“दहशतवाद दोन गोष्टींवर टिकतो विचारसरणी आणि पैसा. अल्जेरियाला काळ्या दशकाचा अनुभव आहे. पाकिस्तानला ग्रे लिस्टवर आणलं तर भारतात दहशतवाद कमी होईल. २०१८ मध्ये अल्जेरियासह इतर देशांनी भारताला मदत केली होती,” असं त्यांनी नमूद केलं.
झकीउर रहमान लखवी या दहशतवाद्याचा दाखला देत ओवेसी म्हणाले, “लखवी तुरुंगात असताना त्याला मुलगा झाला. कोणताही देश दहशतवाद्याला अशी मुभा देत नाही. पण पाकिस्तान ग्रे लिस्टवर गेल्यावर त्याच्यावरील खटला पुढे सरकला.” “ही फक्त दक्षिण आशियाची समस्या नाही. भारत ही चौथी मोठी अर्थव्यवस्था आहे. हा नरसंहार थांबवायचा असेल तर पाकिस्तानला नियंत्रित करावं लागेल,” असंही ते म्हणाले.
भाजप खासदार बैजयंत पांडा यांनीही पाकिस्तानवर टीका केली. “पाकिस्तान आपल्या अण्वस्त्रांचा वापर दहशतवादी कारवायांना पाठबळ देण्यासाठी करतो. हे सर्वांना माहीत आहे. इंटरनेटवर याची माहिती उपलब्ध आहे,” असं पांडा म्हणाले.
पांडा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात निशिकांत दुबे, एस. फांगनॉन कोन्याक, रेखा शर्मा, ओवेसी, सतनाम सिंग संधू, गुलाम नबी आझाद आणि माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांचा समावेश आहे. भारताने दहशतवादाविरोधात आपली भूमिका मांडण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय पाठबळ मिळवण्यासाठी अनेक शिष्टमंडळं पाठवली आहेत.
तकफिरीवाद म्हणजे काय?
तकफिरीवाद ही एक कट्टर विचारसरणी आहे, जी इस्लामच्या नावाखाली इतर मुस्लिमांना किंवा गैर-मुस्लिमांना ‘काफिर’ (अविश्वासू) ठरवून त्यांच्याविरुद्ध हिंसा आणि दहशतवादी कारवाया करण्यास प्रवृत्त करते. या विचारसरणीचा गैरवापर करून काही गट आपल्या राजकीय आणि वैचारिक उद्दिष्टांसाठी धर्माचा आधार घेतात. इस्लामच्या मुख्य प्रवाहातील तत्त्वांविरुद्ध ही विचारधारा आहे, कारण ती एकतेच्या ऐवजी फूट पाडते आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देते. तकफिरी गट, जसे की दाइश आणि अल-कायदा, आपल्या कृत्यांना धर्माचं समर्थन आहे, असा दावा करतात, जो इस्लामच्या शांततामय शिकवणींशी विसंगत आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter