ओवैसींसह सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा चार देशांचा दौरा संपन्न

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील आणि AIMIM खासदार असदुद्दिन ओवैसी यांचा समावेश असलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन आणि अल्जियर्स येथील चार देशांचा दौरा सोमवारी २ जून २०२५ रोजी पूर्ण केला आणि भारतात परतलं.

शिष्टमंडळात भाजप खासदार निशिकांत दुबे, फांगनॉन कोन्याक, रेखा शर्मा, खासदार सतनाम सिंग संधू, गुलाम नबी आझाद आणि माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांचा समावेश होता. या दौऱ्यात शिष्टमंडळाने २२ एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि भारताच्या सीमापार दहशतवादविरोधी लढ्याची माहिती आंतरराष्ट्रीय नेत्यांना दिली. 

भारताच्या अल्जियर्समधील राजदूत स्वाती विजय कुलकर्णी यांनी सांगितलं, “पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सात सर्वपक्षीय शिष्टमंडळं पाठवली. पांडा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ३० मे ते २ जूनदरम्यान अल्जियर्समध्ये दोन महत्त्वाच्या बैठका घेतल्या. अल्जियर्सने दहशतवादाचा तीव्र निषेध केला आणि भारताला पाठिंबा जाहीर केला.”

पांडा यांनी सांगितलं की, पाकिस्तानला पुन्हा फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स (FATF) च्या ग्रे लिस्टवर ठेवण्याचं भारताचं आवाहन जागतिक पातळीवर समर्थन मिळवत आहे. “पाकिस्तान निधीचा गैरवापर दहशतवाद आणि सैन्यासाठी करतो. इस्लामी देशांनी मूलतत्त्ववादाविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. FATF च्या देखरेखीमुळे दहशतवाद कमी झाला होता, पण २०२२ मध्ये पाकिस्तान ग्रे लिस्टमधून बाहेर पडला. आता ते मोकळेपणाने कारवाया करताहेत,” पांडा म्हणाले.

ओवैसी यांनी सौदी अरेबियात पाकिस्तान दहशतवादाला चालना देत असल्याचं सांगितलं आणि FATF ग्रे लिस्टवर परत आणण्याची मागणी केली. “पाकिस्तान भारतीय नागरिकांना लक्ष्य करतो. सौदी अरेबिया FATF चा सदस्य आहे, त्यांनी २०१८ मध्ये आम्हाला मदत केली,” ओवैसी म्हणाले. बहरीनमध्ये त्यांनी पाकिस्तानला “अपयशी राष्ट्र” म्हटलं आणि दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये निर्दोषांचा धर्म विचारून खून केल्याचा निषेध केला.

खासदार सतनाम सिंग संधू आणि रेखा शर्मा यांनी दौऱ्याला यशस्वी ठरवलं. “पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा पर्दाफाश झाला. चारही देशांनी, विशेषतः अल्जियर्सने, भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेला पाठिंबा दिला,” ते म्हणाले.