‘पाकिस्तानी सरकार, डीप स्टेट, ISI दहशतवादात गुंतलेत!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
AIMIM चे प्रमुख,  खासदार असदुद्दीन ओवैसी
AIMIM चे प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवैसी

 

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका करत त्याला “तकफिरिझमचं केंद्र” संबोधलं आणि सरकार, डीप स्टेट आणि गुप्तचर यंत्रणा ISI यांच्यावर बेकायदा आर्थिक नेटवर्कद्वारे दहशतवादाला खतपाणी घालण्याचा आरोप केला. बीजेपी खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळासह सौदी अरेबिया, कुवेत, बहारीन आणि अल्जीरिया दौऱ्यावरून परतल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं.

ओवैसी यांनी सांगितलं की, या दौऱ्यातील चारही देशांनी २०१८ मध्ये पाकिस्तानला फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स (FATF) च्या ग्रे लिस्टवर आणण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला होता. हे देश ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (OIC), गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) आणि मिडल ईस्ट अँड नॉर्थ आफ्रिका फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स (MENAFATF) चे सदस्य आहेत. “आम्ही भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि या देशांना सांगितलं की, पाकिस्तान अनेक वर्षांपासून भारतात दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. आम्ही २२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यावर लक्ष केंद्रित केलं. रेझिस्टन्स फ्रंट हा लष्कर-ए-तोयबाचा (LeT) नवा चेहरा आहे, याबाबत भारताने युएन सिक्युरिटी कौन्सिलच्या १२६२ संक्शन कमिटीलाच सांगितलं होतं,” असं ओवैसी म्हणाले.

त्यांनी दहशतवादाचं मूळ कारण बेकायदा पैसा असल्याचं सांगत, यावर नियंत्रणाची गरज अधोरेखित केली. “२०१८ मध्ये या चार देशांनी पाकिस्तानला FATF च्या ग्रे लिस्टवर आणण्यास मदत केली होती. पुन्हा तशीच मदत हवी. दहशतवादाला पैसा पुरवठा हे मूळ आहे. जगात फक्त अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात पोलिओ आहे, पाकिस्तानात ४०% गरिबी आहे, मग पैसा कुठे जातो? पाकिस्तानचं सरकार, डीप स्टेट आणि ISI दहशतवादात गुंतले आहेत,” असा घणाघात ओवैसींनी केला.

शिष्टमंडळात पांडा यांच्यासह बीजेपी खासदार निशिकांत दुबे, फांगनॉन कोन्याक, रेखा शर्मा, सतनाम सिंग संधू, गुलाम नबी आझाद आणि माजी परराष्ट्र सचिव हर्ष वर्धन श्रृंगला यांचा समावेश होता. या दौऱ्यात शिष्टमंडळाने २२ एप्रिलच्या पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देत, सीमापार दहशतवादाविरुद्ध भारताच्या लढ्यावर प्रकाश टाकला.

पाकिस्तानी लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या १५ एप्रिलच्या भाषणाचा उल्लेख करत ओवैसी यांनी त्यांच्या कथित अतिरेकी विचारसरणीवरही बोट ठेवलं. या दौऱ्याने भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला आंतरराष्ट्रीय पाठबळ मिळालं असून, पाकिस्तानच्या कृतींवर जागतिक दबाव वाढण्याची शक्यता आहे. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter