अराफातच्या मैदानात खुत्बा देतात काब्याचे प्रमुख शेख डॉ. सालेह बिन अब्दुल्लाह बिन हुमैद
मक्का, अराफातच्या मैदानावरून—
हज यात्रेच्या पवित्र प्रसंगी काब्याचे प्रमुख शेख डॉ. सालेह बिन अब्दुल्लाह बिन हुमैद यांनी अराफातच्या मैदानावरून ऐतिहासिक आणि हृदयस्पर्शी संदेश दिला.यावेळी त्यांनी संपूर्ण मुस्लिम समुदायाला एकता, अल्लाहभक्ती, न्याय आणि संयमाचा संदेश दिला.
त्यांनी भाषणाची सुरुवात पॅलेस्टिनी मुस्लिमांसाठी खास प्रार्थनेने केली. "हे अल्लाह! पॅलेस्टिनी बांधवांना शत्रूंवर विजय मिळवून दे. त्यांची भूक, दुःख, बेघरपणा आणि संकटे दूर कर. त्यांना शांती, सुख दे. प्रत्येक वाईट गोष्टीपासून त्यांचे रक्षण कर," असे ते म्हणाले. पुढे प्रार्थनेत ते म्हणाले , "मुस्लिम नेत्यांना यश, मार्गदर्शन आणि अल्लाहभक्ती दे. लोकांच्या भल्यासाठी आणि न्यायासाठी ते उभे राहतील अशी शक्ती त्यांना मिळो."
मुस्लिमांना उद्देशून इमाम म्हणाले, "हे श्रद्धावान बांधवांनो! अल्लाहचे भय मनात ठेवा. संयम बाळगा. अल्लाहभक्ती हाच इहलोक आणि परलोकात यश मिळवण्याचा मार्ग आहे." माणसाने चांगले बनावे, चांगुलपणा पसरवावा आणि वाईट गोष्टींपासून दूर राहावे, असे अल्लाहचे आदेश आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
भ्रष्टाचार आणि अन्यायाविरुद्ध इशारा
पृथ्वीवर भ्रष्टाचार आणि अन्याय पसरवणे हा अल्लाहच्या दृष्टीने गंभीर गुन्हा आहे, असे त्यांनी बजावले. मुस्लिमांनी नेहमी खरे बोलावे. चांगल्याकडे आवाहन करावे. संयमाने वागावे. संयम राखणाऱ्यांना अल्लाह पूर्ण फळ देतो, असे ते म्हणाले.
कृतज्ञता आणि प्रार्थनेची ताकद
शेख सालेह बिन हुमैद यांनी मुस्लिमांना अल्लाहप्रति कृतज्ञ राहण्याची प्रेरणा दिली. कुराणाचा दाखला देत ते म्हणाले, "कृतज्ञ माणसावर अल्लाहची कृपादृष्टी आणि आशीर्वाद असतो. प्रार्थना हा स्वीकृतीचा दरवाजा आहे." मुस्लिमांना सतत अल्लाहचे स्मरण करावे, मनापासून आणि शांतपणे प्रार्थना करावी, असे आवाहन त्यांनी या पवित्र प्रसंगी केले.
इस्लामी मूल्ये आणि कुराणाचे महत्त्व
त्यांनी यावेळी इस्लामी मूल्ये अधोरेखित केली. इस्लाम हा परिपूर्ण आणि अंतिम धर्म आहे, असे ते म्हणाले. "आम्ही तौरात, इंजील आणि सर्व पवित्र ग्रंथांवर श्रद्धा ठेवतो. कुराणाला अल्लाहने त्यांचा संरक्षक बनवले आहे," असे त्यांनी नमूद केले. माणसाचे कर्म आणि प्रत्येक घटना अल्लाहने 'लौह-ए-महफूझ' (संरक्षित पटल) मध्ये आधीच नोंदवली आहे, असेही ते म्हणाले.
मुस्लिम समुदायासाठी एकता आणि न्यायाचा संदेश
मुस्लिमांनी परस्पर वादात अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांच्या आदेशांकडे परतावे, असे शेख यांनी सांगितले. "तुमच्यात भांडण उद्भवले तर कुराण आणि सुन्नतच्या मार्गदर्शनाखाली तो सोडवा," असे ते म्हणाले. अल्लाहशिवाय कोणीही मदत करणारा किंवा संकटातून वाचवणारा नाही, याची आठवण त्यांनी हज यात्रेकरूंना करून दिली.
प्रार्थनेचा शेवट करताना ते म्हणाले, "हे अल्लाह! जगाच्या पूर्व-पश्चिमेला पसरलेल्या मुस्लिमांची परिस्थिती सुधार. त्यांना एकत्र आण. त्यांच्या हृदयात प्रेम निर्माण कर. त्यांच्यातील भेदाभेद आणि द्वेष दूर कर." हज यात्रेच्या सर्वांत महत्त्वाच्या क्षणी, म्हणजे अराफातच्या मैदानात काब्याच्या इमामांनी दिलेला हा ऐतिहासिक संदेश केवळ धार्मिक भाषण नाही. हा संदेश संपूर्ण इस्लामी जगतासाठी मार्गदर्शक आहे. अल्लाहवर श्रद्धा, न्यायाचा मार्ग आणि संयमाची ताकद यांची आठवण यानिमित्ताने मुस्लीम जगताला पुन्हा झाली.