जगातील सर्वात उंच रेल्वे पूल जम्मू-काश्मीरमध्ये तयार करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच असलेल्या या चिनाब पुलाचं आज (६ जून) उद्घाटन केले. हा पूल भारताच्या पायाभूत सुविधा आणि जम्मू-काश्मीरच्या विकासातील एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. चिनाब नदीवर बांधलेला हा पूल तयार करणे हे मोठे आव्हान होते, परंतु काही महिन्यांपूर्वी यशस्वी रेल्वे चाचणीनंतर आज हा पूल पूर्णत्वास गेला आहे.
हा पूल पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा उंच आहे आणि त्याच्या सुरक्षिततेबाबत सुरुवातीला चिंता व्यक्त केली गेली होती. तरीही सर्व चाचण्या यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर हा पूल आता सर्वांसाठी खुला झाला आहे. या पुलाच्या बांधकामासाठी तब्बल २२ वर्षे लागली असून यासाठी १५ हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे.
उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी पुलाची पाहणी केली. आता या पुलामुळे कटरा ते संगलदान दरम्यान ६३ किमीच्या रेल्वे मार्गावर रेल्वे सेवा सुरू होणार आहे. हा पूल भारताच्या विकासात आणि जम्मू-काश्मीरच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देणार आहे.
दरम्यान, हा पूल स्थानिक, पर्यटक आणि यात्रेकरूंना जलद, आरामदायी प्रवास सेवा देईल. यामुळे जम्मू-कश्मीरच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. चिनाब पूल भारताच्या तंत्रज्ञान प्रगतीसाठी महत्वाचा निर्णय ठरला आहे.