जगभरातील मुसलमानांमध्ये बकरी ईदचा म्हणजेच ईदुद्दुहाचा उत्साह आहे. रमजान ईदनंतर दोन महिने आणि दहा दिवसांनी हा सण साजरा केला जातो. इस्लामी कॅलेंडरप्रमाणे रमजान हा नववा महिना. या महिन्यात कुराण अवतरीत झाले म्हणून हा महिना महत्त्वाचा मानला जातो आणि इस्लामच्या पाच कर्तव्यांपैकी या महिन्यात महिनाभर उपवास करणे, हे एक असल्यामुळे या कर्तव्यपालनाचा आनंद साजरा करण्याचा सण म्हणजे रमजान ईद. दानधर्म करणे, हेही या पाच कर्तव्यांपैकी एक असल्यामुळे हा दानधर्म म्हणजे फित्रा याच दिवशी करायचा असतो. म्हणून रमजान ईदीला ईदुल फित्र असेही म्हणतात.
रमजान महिना संपल्यानंतर त्यापुढील शव्वाल महिन्याच्या पहिल्या तारखेस रमजान ईद साजरी केली जाते. त्यानंतर दोन महिने आणि दहा दिवसांनी म्हणजेच जिल्हज या महिन्याच्या दहा तारखेस बकरी ईद साजरी केली जाते.
त्यागाचे मूल्य जनमानसात रुजवणे, वर्षातून एकदा तरी सर्वांनी एकत्र येऊन बंधुत्वाची भावना वृद्धिंगत करणे आणि समाजातील वंचितांना, दुर्बलांना आपल्या आनंदात सहभागी करून घेणे, असे बकरी ईदचे त्रिवेणी महत्त्व आहे. यापैकी त्यागाच्या मूल्याला हजरत महंमद पैगंबर यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या हजरत अब्राहम यांच्या जीवनातील एका घटनेची पार्श्वभूमी आहे.
हजरत अब्राहम यांना स्वप्नात दृष्टांत झाला की, तुला सर्वत्र प्रिय असणारी वस्तू तू ईश्वराला अर्पण कर. त्याप्रमाणे त्यांनी प्रथम मेंढी व मग उंटाची कुर्बानी केली. पण त्या दृष्टांतात हा अर्थ अभिप्रेत नव्हता. म्हणून त्यांना पुन्हा दृष्टांत झाला की, याहीपेक्षा अधिक प्रिय गोष्टीचा त्याग तू केला पाहिजेस. मग हजरत अब्राहमनी आपला मुलगा इस्माईल याची कुर्बानी देण्याचा निर्धार केला.
ऐन मोक्याच्या क्षणी या निर्धारात किंतू निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती. अब्राहमचा निर्धार आणि अढळ निष्ठा पाहून ईश्वर प्रसन्न झाला. देवदूतांनी इस्माईलच्या जागी एका मेंढीला पुढे केले व तिचा बळी दिला गेला. तेव्हा कुरबानी म्हणजे सर्वस्वाचा त्याग करणे असा संदेश या घटनेतून दिला गेला आहे.
पण निरपराध लोकांना हकनाक मारणे व असे करताना स्वतःचा प्राण गेला तर आपण फार मोठी कुर्बानी केली. आपण हुतात्मा झालो असा अर्थ आजकाल रूढ झाला आहे. ही विकृती आहे. कारण कुर्बानी किंवा त्याग दुसऱ्यांच्या कल्याणासाठी करायचा असतो. जितक्या अधिक प्रिय वस्तूचा त्याग केला जातो, तितके त्याचे महत्त्व व मोलही वाढते.
मक्केची तीर्थयात्रा किंवा हज हीसुद्धा याच काळात केली जाते. तिचे विधी बकरी ईदच्या आदल्या दिवशी सुरू होतात व नंतर तीन दिवसांपर्यंत सुरु असतात, यात महत्त्वाचे असे तीन विधी असतात. पहिल्या दिवशी मक्केजवळच्या आराफातच्या मैदानात सामुदायिक नमाज पढणे, बकरी ईदच्या दिवशी उंट किंवा शेळी-मेंढीची कुरबानी आणि काबा मशिदीत प्रदक्षिणा घालणे. याबरोबरच मक्केपासून जवळच असलेल्या मीनाच्या दरीत असलेल्या दोन स्तंभांवर सैतानाचा नाश करण्याच्या हेतूने प्रतीकात्मक दगड मारणे. इथेच पूर्वी चेंगराचेंगरी होऊन अनेकदा अपघात हो असत.
हज यात्रेच्या दरम्यान प्राण्यांची कुरबानी करण्याचा विधी असला तरी तिचा त्यागाच्या मूल्याशी काहीही संबंध नाही. त्याचा संबंध इस्लामच्या सामाजिक आशयाशी आहे. कुराणाच्या बाविसाव्या अध्यायातील श्लोक क्रमांक 27, 28 आणि 37 यांवरून ते स्पष्ट होते. पैगंबरांच्या जीवित काळातच हज यात्रेची सुरुवात झाली होती. त्यावेळेस अनेक ठिकाणांहून लोक मक्केस पायी किंवा उंटावरून येत असत.
अरबस्तान हे रखरखीत वाळवंट असल्यामुळे तिथे अन्नधान्य, भाजीपाला निर्माण होत नाही. त्यामुळे भूक भागविण्यासाठी मांसाहाराशिवाय दुसरा पर्यायच उपलब्ध नव्हता. तेव्हा तीर्थयात्रेसाठी मक्केस येणारे लोक आपल्याबरोबर उंट, शेळ्या-मेंढ्या आणत असत. परंतु सर्वांनाच असे प्राणी सोबत आणणे शक्य होत नसे. अशांची जबाबदारी सुस्थितीत असणाऱ्या लोकांनी घ्यावी व कापलेल्या प्राण्यांच्या मांसाचा एक भाग त्यांच्यासाठी राखून ठेवावा, असा स्पष्ट आदेश 22:28 या श्लोकात देण्यात आला आहे. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या "तर्जुमन-अल्-कुराण' या कुराणभाष्याच्या इंग्रजी आवृत्तीत या श्लोकाचे भाषांतर असे करण्यात आले आहे.
"That they may receive its benefits and pronounce the name of god, on stated days over the animals which he has provided them for sustenance and partake of it yourself and also feed therewith the needy and the poor.' (खंड 3 पृष्ठ 465) कुराणाचे आहे. कुराणाचे दुसरे मान्यवर भाष्यकार सर सय्यद अहमद यांनी तर असे म्हटले आहे, की "There is nothing in the holy Quran to support the concept of Qurbani in hajj' या संदर्भात याच अध्यायाच्या 37व्या श्लोकात आणखी एक महत्त्वाचा उल्लेख आला आहे. : "By no means can their fresh or their blood reach god - it is sincerity of devotion on your part that matter and which alone reacha the him.' (मौ. आझाद, खंड 3 पृ. 467)
यावर आणखी काही वेगळे भाष्य करण्याची गरज नाही. सर्व लोकांमध्ये बंधुत्वाचे नाते निर्माण व्हावे हेही हज यात्रेचे एक उद्दिष्ट मानले गेले आहे. हे नाते दृढ व्हावे म्हणून विविध ठिकाणच्या लोकांनी एकत्र यावे, असा त्यामागे हेतू आहे. यातूनच इस्लामचा विश्वबंधुत्वाचा (उम्मा किंवा कौमचा) सिद्धांत निर्माण झाला आहे. त्याला अरबस्तानातील तत्कालीन सामाजिक परिस्थितीची पार्श्वभूमी आहे. इस्लामपूर्व काळात अरबस्तानात टोळीवजा समाज होता. वेगवेगळ्या टोळ्या आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून होत्या व त्यांच्यात सतत संघर्ष होत असत. ते मूर्तिपूजक होते व त्यांची मूर्तिपूजा अतिशय प्राथमिक अवस्थेतील होती. त्यांना कसलीही आचारसंहिता किंवा कायदा नव्हता.
या परिस्थितीत पैगंबरांनी अमूलाग्र परिवर्तन घडवून आणले. भिन्नभिन्न टोळ्या-टोळ्यांत विभागल्या गेलेल्या व आपल्या स्वतंत्र अस्मिता कटाक्षाने टिकवून धरणाऱ्या या अरबी समाजातून पैगंबरांनी समता व न्याय यांवर आधारित एकसंध समाज निर्माण केला. ही सामाजिक क्रांती त्यांनी इ. स. 622 ते 632 या केवळ एक दशकाच्या काळात केली. पैगंबरांच्या याच क्रांतिकार्याचा त्यातील मूल्यांचा प्रभाव म. जोतिबा फुले यांच्यावर व त्यांच्या समाजपरिवर्तनाच्या कार्यावर पडलेला आहे.
पण इस्लामच्या याच विश्वबंधुत्वाच्या सिद्धांताचा आधार घेऊन मुसलमान कुठल्याही देशाशी एकनिष्ठ राहू शकत नाहीत, असा आरोप सतत केला जातो. पण त्याला वास्तवात काहीच आधार नाही. मध्यपूर्वेतील सौदी अरेबिया, ओमान, मस्कत, कतार, कुवेत, इराक, तुर्कस्तानपासून अफगाणिस्तान, मलेशिया, इंडोनेशिया यासारख्या मुस्लिम बहुसंख्य असलेल्या राष्ट्रातील नागरिक प्रथम त्या त्या देशाचे नागरिक आहेत व नंतर मुसलमान, हे परखड वास्तव आहे. मध्यपूर्वेतील अरब राष्ट्रांचे संघराज्यही निर्माण होऊ शकलेले नाही, हे कुणाला नाकारता येईल का?
तात्पर्य, इस्लाममधील विश्वबंधुत्व फक्त भावनिक पातळीवर आहे, या पलीकडे त्याला काहीही अर्थ नाही.
- अब्दुल कादर मुकादम
(लेखक ज्येष्ठ विचारवंत असून इस्लामचा त्यांचा गाढा अभ्यास आहे.)