सबा अहमद या शिक्षकाच्या काश्मीरवरील कवितेची पेंग्विन प्रकाशनाने घेतली दखल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
शेख मोहम्मद सबा अहमद
शेख मोहम्मद सबा अहमद

 

पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाने भारतात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. गुवाहाटीच्या एका शाळकरी शिक्षकाने कवितेच्या माध्यमातून या गंभीर मुद्द्यावर हात घातला आहे. काश्मिरी तरुणांच्या जीवितहानीला कवितेच्या रूपात शब्दात मांडण्याचा  प्रयत्न  शेख मोहम्मद सबा अहमद यांनी केला आहे. त्यांच्या 'इन द व्हॅली ऑफ रेड' या कवितेला 'द पेंग्विन बुक ऑफ पोएम्स ऑन द इंडियन सिटी' या सुप्रसिद्ध संकलनात स्थान मिळाले आहे.

या संकलनात गालिब यांची दिल्ली, निस्सीम एजेकियल यांची मुंबई, आगा शाहिद अली यांची श्रीनगर, कमला दास यांची कोलकाता, सरोजिनी नायडू यांची हैदराबाद, अरुंधती सुब्रमण्यम यांची चेन्नई आणि किनफाम सिंग नोंगकिंरीह यांच्या शिलॉंगसह भारतातील ३७ शहरांचा काव्यात्मक प्रवास आहे. या संकलनात सुमारे ३०० कवितांचा समावेश आहे. यातील काही कविता इंग्रजीत आहेत, तर काही २५ प्रादेशिक भाषांतून भाषांतरित केलेल्या आहेत. भारताच्या शहरी जीवनाचे भावनिक आणि गहन चित्रण या संग्रहातून उलगडते.

आवाज द व्हॉइसशी बोलताना सबा अहमद यांनी सांगितले की, त्यांच्या 'इन द व्हॅली ऑफ रेड' या कवितेत काश्मिरी तरुणांच्या दुखद परिस्थितीचे चित्रण केलेले आहे. या तरुणांना फसवून सीमेपलीकडील दहशतवादी बनवले जाते. मायदेशी परतल्यावर त्यांना आपल्याच बांधवांवर हल्ले करावे लागतात आणि शेवटी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत त्यांचा अंत होतो.
 

सबा अहमद म्हणाले, "या कवितेतून मी त्या माता-पित्यांचे दुख व्यक्त केले आहे, जे आपल्या मुलांच्या परत येण्याची वाट पाहतात. परंतु त्यांना फक्त आपल्या मुलांचे मृतदेह मिळतात. कश्मीरसारखे स्वर्ग कसे नरक बनले, हे मी या कवितेतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे."

पेंग्विनच्या संकलनात समाविष्ट होण्यापूर्वी ही कविता २०२१ मध्ये 'विटनेस: द रेड रिव्हर बुक ऑफ पोएट्री ऑफ डिसेंट' या संग्रहात प्रसिद्ध झाली होती. नबीना दास यांनी संपादित केलेल्या या संग्रहात भारतातील उपेक्षितांच्या आवाजाला स्थान मिळाले. त्यानंतर २८ फेब्रुवारी २०२२ मध्ये ही कविता लंडनच्या जोआ-रोके लिटररी जर्नलमध्ये प्रकाशित झाली होती. याचे संपादन ब्रिटिश-आशियाई लेखिका सेल्मा कार्व्हाल्हो यांनी केले.
 

पेंग्विनच्या संकलनात सबा अहमद यांची दुसरी कविता 'गुवाहाटी डायरीज' देखील आहे. कोरोना महामारीच्या काळातील गुवाहाटी शहराची परिस्थिती या कवितेतून मांडली आहे. 'द पेंग्विन बुक ऑफ पोएम्स ऑन द इंडियन सिटी' चे संपादन ऑक्सफर्ड विद्यापीठाचे बिलाल मोईन यांनी केले आहे. हा संग्रह ३० मे २०२५ रोजी प्रकाशित होणार आहे.
 

गुवाहाटीच्या पानबाजार येथील प्रतिष्ठित डॉन बॉस्को स्कूलमध्ये सामाजिक शास्त्र शिकवणारे सबा अहमद हे विद्यार्थी, पालक आणि सहकाऱ्यांमध्ये मैत्रीपूर्ण स्वभावासाठी लोकप्रिय आहेत. ते म्हणाले, "१९८८ किंवा १९८९ मध्ये मी आठवी-नववीत असताना काही ओळी लिहिल्या. तेव्हा मी पुन्हा १४ वर्षांचा मुलगा झालो. तिथून ही दुरवरची वाटचाल सुरू झाली."

२०१९ मध्ये त्यांना रुएल इंटरनॅशनल प्राइज फॉर पोएट्री मिळाला होता. पूर्वोत्तर भारतातील उदयोन्मुख कवी म्हणून त्यांना हा पुरस्कार मिळाला. त्यांच्या कवितांचे इटालियन भाषांतर इटलीच्या नेपल्स येथील कवी जॉर्जियो मोइओ यांनी केले. मणिपुरी भाषांतर ज्येष्ठ समीक्षक लैश्राम मेमो सिंह यांनी केले.

काश्मीरच्या सध्याच्या परिस्थितीविषयी सबा अहमद चिंतित आहेत. ते म्हणाले, "काश्मीरमध्ये अनेक दशकांनंतर परिस्थिती सामान्य होत होती. पण पहलगामच्या हल्ल्याने सगळे उद्ध्वस्त झाले. तरीही मला आशा आहे की काश्मीरचे चांगले दिवस परत येतील. माझी कविता काश्मिरी तरुणांना स्पर्श करू शकेल आणि ते चुकीचा मार्ग सोडतील. असे झाले तर तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असेल."
 
- दौलत रहमान