काश्मीरमधील धार्मिक सौहार्दाची अनोखी कहाणी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
काश्मीरमधील  साई मंदिर प्रकल्पाचे विश्वस्त फिरदोस बाबा.
काश्मीरमधील साई मंदिर प्रकल्पाचे विश्वस्त फिरदोस बाबा.

 

वक्फ बोर्डामध्ये मुस्लिमेतर सदस्यांच्या समावेशाला वाट करून देणाऱ्या नव्या कायद्याच्या तरतुदींवर काही मुस्लिम आक्षेप घेत असताना काश्मीरमध्ये मात्र धार्मिक सौहार्द आणि विश्वासाची एक अनोखी हृदयस्पर्शी कहाणी आकाराला येत आहे. 

साई मंदिर संस्थान ही गुजरातच्या सुरतमधील धार्मिक आणि सामाजिक संस्था. या संस्थेने दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग येथील आगामी साई मंदिर प्रकल्पाचे विश्वस्त म्हणून काश्मिरी मुस्लिम आणि प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते फिरदोस बाबा यांची नेमणूक केली आहे. ‘आयडेंटीटी पॉलिटिक्स’च्या राजकारणाने बेजार झालेल्या आपल्या देशात या नियुक्ती मोठा संदेश दिलाय. विभाजन नव्हे एकत्रित जनसेवेत आणि परस्परांविषयीचा आदर हीच आपल्या देशाची खरी ओळख असल्याचे यामुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

गुजरातमधील महिला हक्क कार्यकर्त्या आणि समान नागरी कायदा मसुदा समितीच्या सदस्य गीता श्रॉफ या प्रकल्पाच्या विश्वस्त आहेत. या प्रकल्पात महिला-केंद्रित उपक्रम राबवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. या याविषयी त्या म्हणाल्या, “काश्मिरी महिला यापुढे फक्त पीडित म्हणून दिसणार नाहीत, तर त्या भविष्याच्या शिल्पकार असतील. इथं त्यांनी टाकलेला प्रत्येक टाका स्वतःसाठी, मुलांसाठी आणि भारतासाठी आशेची वीण घट्ट करेल. त्यांच्या सहभागामुळे हा प्रकल्प म्हणजे स्थानिकांची सहानुभूती आणि राष्ट्रीय धोरणांविषयी संवेदनशीलतेचा संगम असल्याचं दिसतं.

साई मंदिर संस्थान, सुरतचे अध्यक्ष आचार्य श्याम सुरेश याविषयी म्हणतात, “हिंदू मंदिराने आपले दरवाजे मुस्लिम विश्वस्तासाठी उघडले ही बाब केवळ देखाव्यासाठी नाहीये. सौहार्दाची कृतीसाठी असतं. हे आपल्या सभ्यतेच्या खोल मूल्यांचं प्रतिबिंब आहे. ‘मानवतेचं मंदिर’ हे भारताच्या सांस्कृतिक विविधेविषयी असलेल्या आत्मविश्वासाचे प्रतिक आहे. आपण विविधतेला घाबरत नाही, तर आपण तिचं स्वागत करतो. विद्वेषाचा गोंगाट आपल्याला आपल्यात फुट पाडतात,  त्याउलट अशी शांतपणे केलेली कृती आपल्याला जोडण्याचे काम करते.”
      
फिरदोस बाबा हे नाव काश्मीरी लोकांसाठी नवे नाही. काश्मीर सेवा संघाचे संस्थापक म्हणून त्यांनी शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन आणि कौशल्य विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये मोठं काम उभं केलं आहे. काश्मीर खोऱ्यातील संघर्षग्रस्त आणि उपेक्षित भागांमध्ये त्यांचे हे सेवाकार्य चालते. मंदिर विश्वस्त मंडळातील त्यांचा समावेश हा केवळ प्रतीकात्मक नाही. तो त्यांचा सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि दृष्टीकोनाचा सन्मान आहे.

संस्थेच्या या निर्णयाने केवळ भारतच नव्हे तर जगाला ठाम संदेश दिलाय की इथं श्रद्धा वैयक्तिक आहे, पण सेवा मात्र सार्वत्रिक आहे. सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या साई बाबांना समर्पित या हिंदू मंदिरात मुस्लिम व्यक्ती विश्वस्त असणे ही बाब अध्यात्म आणि सेवा धर्माच्या सीमाही ओलांडू शकतात हा विचार अधोरेखित करते.

अनंतनागमधील ‘मानवतेचं मंदिर’ प्रकल्प केवळ एक धार्मिक स्थळ नाही. मानव उत्थानाची ती जीवंत व्यवस्था आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. कारण इथे महिला सक्षमीकरण, मुलांना शिक्षण आणि सर्वांना आरोग्यसेवा देणाऱ्या सुविधांचाही समावेश असणार आहे.

संस्थानाकडून मंदिर परिसरात अनेक सामाजिक सुविधाही उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे ही वास्तू एक परिपूर्ण समुदाय कल्याण केंद्र म्हणून उदयास येईल. इथे महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र शिलाई, भरतकाम आणि डिजिटल साक्षरता अभ्यासक्रम तसंच तरुणांसाठी रोजगार कौशल्य आणि उद्योजकता विकास कार्यक्रमराबवण्यात येणार आहेत.

इथे शालेय विभाग मोफत शैक्षणिक साहित्य वितरण, शिकवणी आणि सर्वसमावेशक शिक्षणाला प्रोत्साहन देईल. दर आठवड्याला इथे आरोग्य शिबिरं वैद्यकीय तपासणी, औषधं आणि समुपदेशन देईल. हे दान नाही; हे संरचित सक्षमीकरण आहे—भारतीय मूल्यांवर आधारित स्वावलंबी, सर्वसमावेशक विकासाचा नमुना.

फिरदोस बाबा म्हणाले, “मी मुस्लिम आहे, तरी मला साई बाबा मंदिरात सेवा करण्याची जबाबदारी दिली आहे. हेच भारताचं खरं रूप जिथं तुमचं नावापेक्षा तुमचं काम, तुमच्या ओळखीपेक्षा तुमची करुणा महत्त्वाची. पहलगामच्या वेदनेचं उत्तर द्वेष नाही, तर सौहार्द आहे. काश्मीर सेवा संघातून आम्ही मानलं की, खोऱ्याला शस्त्रं नाही, तर कौशल्यं हवीत. आज ‘मानवतेचं मंदिर’ या स्वप्नाला आकार देतंय. हे फक्त मंदिर नाही ही सामाजिक क्रांती बांधली जात आहे.”

अनंतनागमध्ये ‘मानवतेच्या मंदिरा’च्या पहिल्या विटा रचल्या जात असताना, त्या फक्त इमारत नाही, तर संदेश घडवतात. भारताचं वैभव एका धर्मात नाही, तर सर्व धर्मांना कृतीतून स्वीकारण्याच्या क्षमतेत आहे. ही फक्त प्रादेशिक कहाणी नाही ही भारताच्या खऱ्या सामर्थ्याची कहाणी आहे: एकसमानता नसलेली एकता आणि भेद न ठेवता प्रगती. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter