पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच कानपूरच्या हाथीपूर भागातील शुभम द्विवेदी यांच्या कुटुंबाची भेट घेतली. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात, धर्माच्या नावाखाली गोळ्या घालून शुभम द्विवेदी यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांच्या आई-वडील आणि पत्नीशी संवाद साधताना पंतप्रधान अत्यंत भावूक झाले.
शुभम द्विवेदी, एक ३१ वर्षीय व्यावसायिक, कुटुंबासोबत काश्मीरमधील पहलगाम येथे सहलीवर असताना या क्रूर हल्ल्याचे बळी ठरले. त्यांचे नुकतेच १२ फेब्रुवारी रोजी लग्न झाले होते. कानपूर येथील चकेरी विमानतळावर शुभम यांचा मृतदेह आणल्यानंतर पंतप्रधानांनी कुटुंबीयांची भेट घेतली. ही भेट कुटुंबीयांसाठी आणि पंतप्रधानांसाठीही अत्यंत हृदयस्पर्शी होती.
शुभम द्विवेदी यांचे वडील संजय द्विवेदी यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी त्यांची सून आशान्या द्विवेदी यांच्याशी या भयानक हल्ल्याबद्दल चर्चा केली. शुभम यांना त्यांच्या डोळ्यांदेखत गोळ्या घालण्यात आल्याने पंतप्रधानही व्यथित झाले होते. "मला वाटते की या घटनेने त्यांना खूप वेदना झाल्या आहेत. ते आमच्यासोबत उभे असताना तो खरोखरच एक भावनिक क्षण होता. दहशतवाद पूर्णपणे संपेपर्यंत त्यांना शांतता लाभणार नाही, असे मला वाटते," असे दुःखीत वडिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले.
वडिलांनी पुढे नमूद केले की, पंतप्रधानांना भेटण्यामागे कोणतीही मागणी नव्हती, तर दहशतवादाविरोधात त्यांनी केलेल्या कारवाईबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. "दहशतवादाविरोधातील त्यांच्या कठोर भूमिकेबद्दल मी त्यांना कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधानांनी माझ्या सूनेशी आणि शुभमबद्दलच्या घटनेवर चर्चा केली. ते खूप भावूक झाले होते, आणि त्या प्रसंगी उपस्थित असलेले प्रत्येकजण भावूक झाले."
संजय द्विवेदी यांनी सांगितले की, 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केल्याबद्दल आणि पाकिस्तानच्या हद्दीत खोलवर घुसून दहशतवादावर जोरदार प्रतिहल्ला केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानण्यासाठी ते उत्सुक होते. "पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने दहशतवादी छावण्या उद्ध्वस्त करून जोरदार कारवाई केली. भारतीय सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते. यासाठी मी माझ्या कुटुंबाच्या वतीने पंतप्रधानांचे आभार मानले. मी त्यांना सांगितले की, दहशतवादाविरोधातील या लढ्यात ते एकटे नाहीत, माझे संपूर्ण कुटुंब आणि समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पंतप्रधानांनी आमच्या कुटुंबाचे सांत्वन केले आणि दहशतवादाविरोधातील लढा सुरूच राहील, आपण दहशतवादाला पूर्णपणे नष्ट करू, अशी ग्वाही दिली," असे त्यांनी स्पष्ट केले.
शहीद शुभम द्विवेदी यांच्या पत्नी आशान्या द्विवेदी यांनी माहिती दिली की, पंतप्रधानांनी कुटुंबाला मनापासून सांत्वन दिले आणि सांगितले की दहशतवादाविरोधातील लढा अजून संपलेला नाही, तो दीर्घकाळ चालेल. "पंतप्रधान मोदी म्हणाले की संपूर्ण देश आणि सरकार आमच्या पाठीशी उभे आहे. त्यांनी आमच्या दुःखात सहभाग घेतला... पंतप्रधान मोदी खूप दुःखी होते... त्यांनी मला पहलगाम हल्ल्याबद्दल विचारले... पंतप्रधान मोदी म्हणाले की, दहशतवादाविरोधातील लढा अजून संपलेला नाही," असे आशान्या यांनी सांगितले.
त्यांनी पंतप्रधानांसोबतच्या संवादाबाबत पुढे सांगितले की, ही घटना का घडली याबद्दल त्यांचे मत पंतप्रधानांनी ऐकून घेतले आणि ते मान्य केले. "दहशतवाद्यांना हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडायची होती किंवा काश्मीरमधील शांततामय परिस्थिती संपवायची होती, असे मी त्यांना सांगितले, तेव्हा त्यांनी माझे मत ऐकून घेतले आणि ते मान्य केले. पंतप्रधान मोदींनाही असेच वाटते असे त्यांनी मला सांगितले... पंतप्रधानांनी आम्हाला आणखी एका भेटीचे आश्वासन दिले," असेही आशान्या द्विवेदी यांनी सांगितले.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter