साखरेच्या उत्पादनात घट होणार असल्यानं तसेच त्यामुळं साखरेच्या दरातही वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारनं बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती. पण आता केंद्रानं ही बंदी उठवली आहे, त्यामुळं साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय अन्न व प्रशासन मंत्रालयातील एका अधिकाऱ्यानं याबाबत माहिती दिली आहे.
केंद्रीय अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, चालू वर्षात इथेनॉलच्या निर्मितीसाठी ६.७ लाख टन बी हेवी मोलॅसिस वारण्याची परवानगी दिली आहे. २४ एप्रिल रोजी या निर्णयाला परवानगी देण्यात आली. यामध्ये ३१ मार्च २०२४ अखेरपर्यंत बी हेवी मळीच्या मात्रेतून इथेनॉल खरेदी करण्याचे आदेश केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे पारित होणार आहे, याच्या प्रक्रियेला सुरुवातही झाली आहे.
या इथेनॉल निर्मितीसाठी सुमारे ३.२५ लाख टन अतिरिक्त साखर इथेनॉल निर्मिकडं वळवली गेल्यानं त्यातून ३८ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती होण्याचा अंदाज आहे. यातून २ हजार ३०० कोटी रुपये उपलब्ध होतील. तर त्यामुळं साखरेचे साठे कमी होऊन स्थानिक साखरेचे विक्री दर सुधारण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, देशातील साखर कारखान्यांच्या प्रकल्पांमध्ये शिल्लक राहिलेल्या सुमारे सात लाख टन बी हेवी मळीचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करण्याची विनंती पत्राद्वारे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय सरकार मंत्री अमित शहा यांनी २४ फेब्रुवारी रोजी दिले होते.