गोष्ट एका अतरंगी मुलाची.. उड्या मार-उलटंच चाल-डोकं खाली पाय वर.. एक ना अनेक उद्योगात गडी सतत मग्न असायचा.. हायपरॲक्टिवच म्हणा ना..नुसती घाई-गडबड... याच्या हाताला काहीतरी हवंच असायचं.. वय वाढत गेलं तसे याचे उद्योगही वाढले.. हा गडी सायकल शिकला.. बरं ती ही नीट चालवेल तो हा कसला? वाऱ्याच्या वेगानं सायकल चालवता चालवता हॅंडलवरचे हात काढून हाताची घडी घाल.. बरं ते कमी की काय मग डोळेच बंद कर..
घरातल्या बिचाऱ्या नोकरचाकरांची दमछाक व्हायची.. ‘हा कधी अन् काय वेळ आणेल?’ या धास्तीतच बिचारे त्याच्या आजूबाजूलाच घुटमळायचे.. पठ्ठ्या नक्कीच सिनेमात नायक बनणार-नायक कसला हा तर स्टंटमॅन बनणाऱ्यांचे उद्योग बघता हा काहीतरी विश्वविक्रमच करणार.. शेजारपाजारात त्याच्याबद्दल हीच चर्चा चाले.
सगळ्यांची अटकळ मोडीत काढत हा अभ्यासातही तेवढाच तल्लख निघाला आणि थेट भौतिकशास्त्रज्ञच बनला. बरं कुणी साधासुधा नाही तर जागतिक किर्तीचा भौतिकशास्त्रज्ञ! इथंही मात्र तो प्रचंड खेळला-धोके पत्करले-नव्या वाटा धुंडाळल्या आणि आखल्याही.
१२ ऑगस्ट १९१९ला अहमदाबादच्या अंबालाल आणि सरलादेवी या दाम्पत्याचा हा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला मुलगा म्हणजे ‘विक्रम साराभाई’. त्यांचे बाबा पेशानं उद्योजक असले पेशीनं मात्र समाजसेवक. याच दरम्यान भारतीय स्वातंत्र्य संग्रामानं जोर धरला आणि क्रूरकर्मा जनरल डायरनं जालियनवाला बागेत निष्पाप भारतीयांवर गोळीबार केला.
भारतीय लोकं इंग्रजाविरुद्ध एक झाले, या लढ्यास बळकटी मिळावी म्हणून त्यांच्या बाबानंही सढळ हस्ते दान दिलं. एका बाजूला एव्हाना शालेय शिक्षण संपत आलं होतं,त्यांनी शहरातील महाविद्यालयात प्रवेश घेतला पण अजूनही त्याचं चित्त स्थिर नव्हतं. तडकाफडकी मध्येच ते सोडत केम्ब्रिज विद्यापीठ गाठलं आणि १९३९साली ‘नॅचरल सायन्सेस’ या विषयात पदवीही मिळवली. अभ्यास भरात येतच होता पण दुर्दैवानं नेमकं तेव्हाच दुसऱ्या जागतिक महायुद्धाचे पडघम वाजले आणि त्यांना नाईलाजानं मायदेशी परतावं लागलं.
भारतात येऊन त्यांनी सी.व्ही.रमन यांच्या हाताखाली कॉस्मिक तरंगांचा अभ्यास सुरू केला. इथं अनुभव भरात येतच होता तेवढ्यात १९४६ साली युद्धसमाप्तीची घोषणा झाली आणि ते पुनश्च एकवार केम्ब्रिजला परतले. पुनश्च हरिओम.. या वर्षी त्यांनी आपली पीएचडी पूर्ण केली. इकडं देशालाही स्वातंत्र्य मिळालं. परदेशी अनेक संधी असतांना मायदेशी परतून त्यांनी स्वत:ची फिजिकल रिसर्च लॅब बनवली. स्वातंत्र्यपश्चातचा तो काळ देशप्रेमानं भारलेला-स्वप्नाळू-आदर्शवादी होता.
लोकं देशभक्तीनं आणि राष्ट्रवादानं भारलेली होती पण तोपर्यंत जग फिरून आलेले साराभाई मात्र, या देशाच्या गरजा काय? इथं अजून काय करायला हवं? जग कुठे आहे, आपण कुठे आहोत? असा मुलभूत विचार करत होते.
फिजिकल रिसर्च लॅबमध्ये त्यांनी अंतरीक्ष किरणांसंबंधित अनेक प्रयोग केले गेले. आयआयएम अहमदाबादची स्थापना केली आणि १९६१ साली आपले व्यावसायिक मित्र कस्तुरभाई लालभाई यांच्यासोबत शिक्षण क्षेत्रात त्यांनी अनेक विकासात्मक कामंही केली.पुढच्या वर्षी लगेच अहमदाबादला प्राकृतिक योजना आणि तंत्रज्ञान विद्यापीठ स्थापन करण्यात शासनाला महत्वपूर्ण मदत केली.तीन वर्षांनी म्हणजे १९६५ साली नेहरू विकास संस्थेची स्थापना करत भारतात ’शिक्षण आणि सामाजिक क्षेत्राचा विकास’ यावर प्रामुख्यानं भर दिला. सोबतच कम्युनिटी सायन्स सेंटर उभारत ‘विज्ञान आणि गणित’ विषयात लोकांची रुची वाढेल यासाठी अत्यंत मुलभूत असं नियोजन केलं.
डॉ. भाभा या पहिल्या भारतीय अणुशास्त्रज्ञाच्या साथीनं थुंबा इथं भारतातलं पहिलंवहिलं रॉकेट लॉंचिंग स्टेशन उभारलं. १९६९ साली अंतरीक्ष अनुसंधान संस्था अर्थात इस्त्रोच्या स्थापनेतही त्यांचा सिंहाचा वाटा होता.
लहानपणच्या अतरंगी उद्योगांपासून सुरू झालेला साराभाईंचा कार्यमग्न प्रवास अविरत सुरूच होता. असंच एकदा ‘थुंबा’ इथं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले असतांना कोवलम इथं जास्त प्रवास आणि कामाचा ताण यामुळं त्यांच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होऊन त्यांच्या हृदयावर अतिरिक्त ताण आला आणि झोपेतच त्यांचं निधन झालं.
अर्थात हे सगळं तेव्हाही संशयास्पद होतं आणि आताही. चांद्रयान-गगनयान मोहिमेसोबतच आजही आपण अनेक स्वप्न बघतो त्यांची पायभरणी साराभाईंनी केली होती. या साराभाईंची आज जयंती.. त्या निमित्ताने या समाजाभिमुख भौतिकशास्रज्ञाला विनम्र अभिवादन.
-प्रज्ञावंत देवळेकर