बीडच्या अविनाशने 'असा' रचला इतिहास

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
धावपट्टू अविनाश साबळे
धावपट्टू अविनाश साबळे

 

गुमी (दक्षिण कोरिया) येथे सुरू असलेल्या २६व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेला खराब हवामानाचा फटका बसला. तिसऱ्या दिवशी सायंकाळच्या स्पर्धा दोन तास उशिराने सुरू झाल्या. त्यात पुरुषांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत मराठवाड्याचा सुपुत्र असलेल्या मराठमोळ्या अविनाश साबळेने इतिहास घडविला. त्याने सुवर्णपदक जिंकताना या शर्यतीत तब्बल ३६ वर्षांपासून असलेला सुवर्णपदकाचा दुष्काळही संपुष्टात आणला.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा येथील असलेला राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या अविनाशला येथे आव्हानच नव्हते. त्याने सुरुवातीला चार फेऱ्यात हलकी आघाडी घेताना नंतरच्या दोन फेऱ्यांत रौप्यपदक विजेत्या जपानच्या युतारो निनेच्या मागे धावताना अचूक डावपेच वापरले. शेवटच्या फेरीत त्याने वेग वाढवताच एकाही स्पर्धकाने त्याला आव्हान देण्याचे धाडस केले नाही, कतारच्या स्पर्धकाला ब्राँझपदक मिळाले. 

राष्ट्रीय विक्रमवीर असलेल्या अविनाशने ही शर्यत ८ मिनिटे २०.९२ सेकंदात पूर्ण केली. सहा वर्षांपूर्वी दोहा येथे प्रथमच आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भाग घेताना अविनाशने रौप्यपदक जिंकले होते. स्टीपलचेस शर्यतीत स्पर्धेच्या इतिहासातील भारताचे हे केवळ तिसरे सुवर्णपदक असून यापूर्वी १९७५च्या स्पर्धेत हरबल सिंग तर १९८९ मध्ये दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत दिना रामने सुवर्णपदक जिंकले होते. तेव्हापासून एकाही भारतीय अ‍ॅथलिट्ला सुवर्णपदक जिंकता आले नव्हते. अविनाशने हा दुष्काळ संपुष्टात आणला, तो यापूर्वी यंदा टोकियोत होत असलेल्या जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. 

ज्योतीची विक्रमी धाव
सुवर्णपदकाचे प्रमुख आशास्थान असलेली आणखी एक अ‍ॅथलिट २५ वर्षीय ज्योती यराजीने भन्नाट पळताना आपले सुवर्णपदक कायम ठेवले. सातव्या लेनमधून धावताना ज्योतीने सातव्या हईल्सनंतर वेग वाढविला आणि १२.९६ सेकंदाच्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक निश्चित केले. अशी कामगिरी करताना तिने २००० पासून चीनच्या सू यिपिंगच्या नावावर अबाधित असलेला १२.९९ सेकंदाचा स्पर्धा विक्रम इतिहासजमा केला. दोन वर्षांपूर्वी बँकॉक येथे सुवर्णपदक मिळविल्यानंतर गेल्या वर्षी आशियाई इनडोअर स्पर्धेतही तिने सुवर्णपदक जिंकले होते. 

संजीवनीला पाचवे स्थान
दुसऱ्या दिवशी खराब हवामानामुळे महिलांची दहा हजार मीटर शर्यत १२ फेऱ्यांनंतर थांबविण्यात आली होती. ही शर्यंत आज सकाळी घेण्यात आली. त्यात नाशिकची असलेल्या संजीवनी जाधवला पाचवे स्थान मिळाले. तिने यंदाच्या मोसमातील आपली सर्वोत्तम वेळ देताना ३३ मिनिटे ०८.१७ सेकंदात शर्यत पूर्ण केली. सीमाने ३३ मिनिटे ०८.२३ सेकंदात सहावे स्थान मिळविले. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter