कोलंबोमध्ये रविवारी भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर सेलिब्रिटींकडून सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा महापूर आला आहे. या चर्चेत स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीनेही उडी घेतली. त्याने आपल्या खास विनोदी शैलीत काही व्हिडिओ शेअर केले असून ते सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
मुनव्वर फारुकी नक्की काय म्हणाला?
सामना संपल्यानंतर लगेचच मुनव्वरने एक व्हिडीओ शेअर केला. यात त्याने पाकिस्तानच्या कामगिरीची मजा उडवत चाहत्यांना खळखळून हसवले. पाकिस्तानने क्रिकेट खेळण्याऐवजी फक्त संगीत कार्यक्रमांवरच लक्ष केंद्रित करावे, असा चिमटा त्याने काढला. भारतीय खेळाडू जाहिराती आणि ब्रँडच्या कामात व्यस्त असूनही चांगली कामगिरी करतात, मात्र पाकिस्तानी खेळाडू रिकामे असूनही सराव का करत नाहीत? असा सवाल त्याने विनोदी ढंगात विचारला.
तो म्हणाला, "मित्रांनो, बघा कोक स्टुडिओपर्यंत सर्व ठीक आहे, पण त्यानंतर हे क्रिकेट वगैरे तुमच्याकडून होत नसेल तर राहू द्या. असे नाही की भारतीय खेळाडूंकडे काम नाही, ते तर ब्रँड शूट आणि जाहिरातींमध्ये पूर्णपणे व्यस्त असतात. तुम्ही लोक तर रिकामे असता, मग सरावही का करत नाही? एकतर्फी सामना करून तुम्ही पूर्ण मजा खराब करून टाकता."
दुसऱ्या एका क्लिपमध्ये मुनव्वरने आपली फटकेबाजी सुरूच ठेवली. भारतामध्ये खेळण्यास पाकिस्तानने नकार दिला होता, त्या संदर्भाचा उल्लेख करत त्याने खोचक टीका केली. श्रीलंकेत जाऊनही पाकिस्तानला चांगली कामगिरी करता आली नाही, असे म्हणत त्याने हसत हसत त्यांना एक सल्ला दिला. सोशल मीडियावरील मिम्स टाळण्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंनी सामना संपल्यावर इन्स्टाग्राम आणि एक्स (पूर्वीचे ट्विटर) उघडू नये, असे तो म्हणाला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने पसरला असून लोक त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.