नोएडामध्ये सोमवारी वेतनावरून सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. बघता बघता या आंदोलनाचे रूपांतर मोठ्या गोंधळात झाले. सुमारे ४०,००० फॅक्टरी कामगार आणि सुरक्षा रक्षक आमनेसामने आले. यामुळे मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले, सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आणि शहराच्या प्रवेशद्वारांवर भीतीचे वातावरण निर्माण झाले. हरियाणा सरकारने किमान वेतनात वाढ केल्याच्या निर्णयामुळे शहरातील ८० ठिकाणचे कामगार रस्त्यावर उतरले होते. नोएडा फेज-२ आणि सेक्टर ६३ मध्ये आंदोलकांनी वाहने आणि मालमत्ता पेटवून दिली. पोलिसांशी झालेल्या वादावादी दरम्यान जोरदार दगडफेकही करण्यात आली.
संध्याकाळपर्यंत जाळपोळ आणि तोडफोड केल्याप्रकरणी ३०० हून अधिक आंदोलकांना प्रतिबंधात्मक कलमांखाली अटक करण्यात आली. तसेच १०० हून अधिक जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यांमधील सीसीटीव्ही फुटेजवरून आंदोलकांची ओळख पटवली जात असून आणखी लोकांवर कारवाई होऊ शकते.
कामगार शांततेत पांगल्यानंतर काही बाहेरच्या लोकांनी नोएडामध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. गौतम बुद्ध नगरच्या पोलीस आयुक्त लक्ष्मी सिंह म्हणाल्या, "कामगार शांततेत निघून गेल्यावर शेजारील जिल्ह्यांच्या सीमेवरून बाहेरचा एक गट आला. त्यांनी तणाव निर्माण करून हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न केला. आम्ही या गटातील काही जणांना ताब्यात घेतले असून उर्वरितांची ओळख पटवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल."
पाकिस्तानी संबंधांची चौकशी
उत्तर प्रदेशचे कामगार मंत्री अनिल राजभर यांनी या गोंधळामागे पाकिस्तानी संबंध असण्याची शक्यता वर्तवली आहे. परिसरात अलीकडेच दहशतवादाशी संबंधित झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी सुरू आहे. या आंदोलनाला नियोजित कट म्हणत मंत्री म्हणाले, "राज्याचा विकास आणि कायदा सुव्यवस्था विस्कळीत करण्याच्या उद्देशाने ही घटना घडल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांत मेरठ आणि नोएडामधून चार संशयित दहशतवादांना अटक करण्यात आली होती. त्यांचे संबंध पाकिस्तानमधील हँडलर्सशी होते. अशा परिस्थितीत राज्यात अस्थिरता निर्माण करण्याच्या कटाची शक्यता बळावते. तपास यंत्रणा या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत."
मंत्र्यांनी असाही दावा केला की, हा गोंधळ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुझफ्फरनगरमधील कार्यक्रमात अडथळा आणण्यासाठी असू शकतो. "देशविरोधी शक्ती" राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. "लोकांनी कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या माहितीला किंवा चिथावणीला बळी पडू नये आणि शांतता राखावी. गोंधळ आणि आक्रमक आंदोलने कोणत्याही समस्येवर उपाय नाहीत. सरकार कामगारांचे प्रत्येक म्हणणे ऐकण्यास तयार आहे," असेही ते म्हणाले.
कामगारांनी आंदोलन का केले?
हरियाणा सरकारने अकुशल, अर्धकुशल, कुशल आणि उच्च-कुशल कामगारांच्या किमान वेतनात ३५ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे आम्हाला कमी पगार का मिळत आहे, असा प्रश्न नोएडामधील कामगारांनी उपस्थित केला. कारखाने केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या किमान वेतनानुसार पगार देत नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. कमी पगार आणि कामाच्या ठिकाणची वाईट परिस्थिती यामुळे रस्त्यावर उतरावे लागल्याचे त्यांनी सांगितले.
एका आंदोलकाने सांगितले की, १२ तास काम करूनही कामगारांना ११,००० ते १५,००० रुपये मिळतात. एवढ्या पैशात घर चालवणे कठीण झाले आहे. दुसऱ्या एका कामगाराने पगारातील अनियमिततेचा आरोप केला. कामगारांकडून दोन शिफ्टची सही घेतली जाते पण पगार मात्र एकाच शिफ्टचा दिला जातो, असे तो म्हणाला. "सर्व काही महाग होत आहे, पण आमचा पगार ११,०००-१२,००० रुपयांच्या आसपास आहे. तो किमान २०,०००-२५,००० रुपये व्हायला हवा," अशी मागणी एका आंदोलकाने केली.
उत्तर प्रदेश सरकारने मात्र पगारवाढीची मागणी फेटाळून लावली आहे. १ एप्रिल रोजीच दर वाढवण्यात आल्याचे सरकारने सांगितले. गौतम बुद्ध नगर आणि गाझियाबादमध्ये अकुशल कामगारांसाठी १३,६९० रुपये, अर्धकुशल कामगारांसाठी १५,०५९ रुपये आणि कुशल कामगारांसाठी १६,८६८ रुपये असे अंतरिम दर निश्चित केले आहेत.
सोमवारी रात्रीपर्यंत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून सतत देखरेख ठेवली जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेल्या समितीने कामगारांच्या हिताचे संरक्षण करण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल आणि कामगार कायद्यांची कडक अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
राजकीय प्रतिक्रिया
योगी आदित्यनाथ यांनी मुझफ्फरनगरमध्ये बोलताना आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. अशांतता पसरवणाऱ्या घटकांपासून सावध राहण्याचा इशारा त्यांनी दिला. सरकार किमान मानधन आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. "उत्तर प्रदेश प्रगती करत आहे, पण काही लोक या वाढीविरुद्ध कट रचत आहेत. औद्योगिक युनिट्समधील सर्व कर्मचाऱ्यांनी आणि कामगारांनी हे लक्षात ठेवावे की कोव्हिड काळात हे 'डबल इंजिन' सरकार तुमच्या पाठीशी कसे उभे राहिले होते," असे ते म्हणाले.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या आंदोलनावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. "सरकारची धोरणे एकतर्फी असून ती केवळ उद्योगपतींच्या फायद्याची आहेत, त्यामुळेच हा गोंधळ झाला," असा आरोप त्यांनी केला. "आम्ही संवादातून प्रश्न सोडवतो. भाजप उद्योगपतींच्या बाजूने असल्याचे दिसते. नोएडामध्ये उद्योगपतींसाठी 'एटीएम' उभारल्याचा हा परिणाम असून कामगारांकडे दुर्लक्ष केले जात आहे," असे अखिलेश यादव म्हणाले.