नाशिकच्या संदल शरीफ सोहळ्यात मार्गदर्शन करताना ज्येष्ठ धर्मगुरू सय्यद मोहम्मद महमूद अशरफ
विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने खूप मोठी प्रगती केली आहे. पण ही प्रगती मानवतेला घेऊन गेली आहे की नाही, हा विचार करण्यासारखा विषय आहे. कारण गरज तर माणसाला प्रगतीकडे घेऊन जाते. पण मानवता जपली तो प्रगत झाला असल्याचे मत ज्येष्ठ धर्मगुरू सय्यद मोहम्मद महमूद अशरफ यांनी मांडले. हजरत पीर सय्यद सादिक शाह हुसेनी (बडी दर्गा) ३९७ व्या संदल शरीफ निमित्ताने आयोजित धार्मिक कार्यक्रमात नाशिक येथे ते बोलत होते.
अशरफ म्हणाले, "मशिन जसे एका ठराविक कामासाठी तयार केले जाते आणि जर ते काम न करू शकले, तर त्याचा उपयोग नाही. त्याचप्रमाणे, जर माणूसही आपल्या मूळ उद्देशाला धरून जन्मास आला आहे, तोच उद्देश विसरत असेल, तर त्याचा मानवी जन्म निरर्थक आहे. माणूस जर मानवतेसाठी, प्रेमासाठी, दुसऱ्याच्या मदतीसाठी, समाजासाठी काही करत नसेल, तर त्याचे अस्तित्व हे केवळ एक शारीरिक उपस्थित राहते."
सृष्टी निर्मात्याने प्रत्येकाला एका विशिष्ट हेतूसाठी निर्माण केले आहे. जर आपण त्या हेतूपासून भरकटलो, तर आपलं अस्तित्वही लुप्त होऊ शकते. प्रेम, शांती, मानवता आणि सहर्तन हेच खरे धर्म आहेत. त्यांचाच अंगीकार केल्याने समाज, धर्म आणि देशही उन्नतीकडे जाईल, असेही त्यांनी सांगितले. शेवटी फतेहा आणि दुवा करत धार्मिक प्रवचनाची सांगता झाली.