विमानात भरलेल्या सव्वा लाख लिटर इंधनाच्या ज्वालाग्राही गोळ्याने आप्तस्वकीयांच्या भेटीसाठी आतुर झालेल्यांना क्षणार्धात गिळंकृत करून टाकले. मरण-कल्पनेशी जाणत्यांचाही तर्क थांबतो. हे दु:ख गिळूनच पुढले आकाश पाहावे लागेल.
अहमदाबाद येथे गुरुवारी झालेल्या विमान दुर्घटनेने असंख्य शोकांतिकांना जन्म दिला. तसे पाहता दुर्घटनांची आपल्या देशात कमतरता नाही. रेल्वे अपघात, दरडी कोसळणे, पुलांच्या डोलाऱ्यांचे कोसळणे, चेंगराचेंगरी, दंगल, चक्रीवादळे, महापूर अशा असंख्य नैसर्गिक अथवा अनैसर्गिक कारणांनी हजारो माणसे मृत्युमुखी पडत असतात.
मृतांच्या नातलगांना सरकारी मदत जाहीर होते, नेतेमंडळींचे दौरे, दुर्घटनेची चिकित्सा, राजकीय हेत्वारोप वगैरे सारे काही साग्रसंगीत पार पडल्यावर ती दुर्घटना विस्मरणात जाते. अहमदाबादेतील विमान अपघात मात्र तसा नाही. भळभळत्या जखमेसारखा तो प्रदीर्घ काळ चिघळणार आहे.
पोटात २४२ प्रवासी घेऊन एक अवाढव्य बोइंग विमान उड्डाण करते काय, आणि अवघ्या तीस सेकंदात कोसळून आगडोंबाने लपेटून जाते काय, सारेच सुन्न करणारे आहे. एअर इंडियाचे हे ‘ड्रीमलायनर’ विमान धावपट्टीपासून जेमतेम दोन किलोमीटरवर असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहावर कोसळले. त्यात २४ विद्यार्थीही प्राणास मुकले. एकाच वेळी दोन-दोन दुर्घटना जेव्हा घडतात, तेव्हा हा नियतीचा कसला अघोरी खेळ, असा प्रश्न तर्कबुध्दीलाही पडतो.
बोइंगने ‘ड्रीमलायनर’ची निर्मिती २००९ पासून सुरु केली. त्यानंतर जगभरातल्या प्रमुख विमान कंपन्यांनी अकराशेहून अधिक विमाने खरेदी केली आहेत आणि बोइंगला अशा आणखी नऊशे विमानांचा पुरवठा करायचा आहे. अहमदाबादहून लंडनकडे दुर्दैवी उड्डाण करणारे ड्रीमलायनर अकरा वर्षे जुने होते. त्यात वारंवार तांत्रिक समस्या उद्भवत होत्या, अशी माहिती समोर येत आहे.
या पार्श्वभूमीवर भारतातील बोइंगच्या विमानांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कोणाची होती, हाही प्रश्न महत्त्वाचा ठरतो. विमानांच्या देखभाल, दुरुस्ती आणि संपूर्ण तपासणीच्या (एमआरओ) सुविधा केंद्रांची संख्या दीडशेपार झालेल्या भारताचे लवकरच विमानांच्या देखभालीचे जागतिक केंद्र बनण्याचे लक्ष्य आहे.
पण भारतातच एक दिवसाआड किमान एक विमान तांत्रिक समस्येने ग्रासलेले असते. हे प्रमाण शून्यावर आणले तरच भारताला नागरी वाहतूक क्षेत्रात काही वर्चस्व शाबूत राखता येईल. दहा दिवसांपूर्वीच दिल्लीत ४२ वर्षानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघाच्या ८१ व्या वार्षिक सभेचे, तसेच जागतिक हवाई वाहतूक शिखर परिषदेचे आयोजित करण्यात आले होते.
त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात दिलेली आकडेवारी कमालीची आकर्षक वाटली होती. आंतरदेशीय हवाई वाहतुकीच्या बाबतीत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ असून भारतातील आणि विदेशी हवाई कंपन्या मिळून दरवर्षी २४ कोटी लोक प्रवास करतात.
पाच वर्षांनंतर प्रवाशांचा हा आकडा ५० कोटींवर जाईल आणि हवाई मालवाहतूक १० दशलक्ष टनांवर जाईल. मोठी भरारी घेण्यासाठी सिद्ध झालेल्या भारताच्या नागरी विमान वाहतुकीच्या क्षेत्रातील नवकल्पना अनेक देशांसाठी उपयुक्त ठरु शकतात, असे जगभरातील हवाई वाहतूकतज्ज्ञांना संबोधताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते.
गेल्या दहा वर्षांमध्ये भारतातील विमानतळांची संख्या ७४ वरुन १६२ वर गेली. सर्व महानगरांमधील विमानतळांचा झगमगाटी कायापालट झाला, तर अनेक लहान शहरे या काळात भारताच्या हवाई नकाशावर येऊन दररोज विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या पाच लाखाच्या वर गेली.
हे आकडे उत्साहवर्धक असले तरी वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत तोकड्या पडत जाणाऱ्या सुविधांमुळे मोठ्या शहरांतील विमानतळांना अक्षरशः बसडेपोचे स्वरुप आले आहे, ते कसे विसरावे? पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि आता इराणच्या प्रतिबंधित हवाई क्षेत्रांमुळे भारताच्या प्रवासी विमान वाहतुकीचे आकाश आक्रसले आहे.
नेहमीपेक्षा जास्तीचे हवाई अंतर कापण्यासाठी विमानात पूर्ण इंधन भरावे लागते. त्याचा परिणाम विमानाचे वजन वाढण्यात होतो काय, हा पैलूही विचारात घ्यावा लागणार आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ स्थगित झाल्यानंतर दिल्लीहून श्रीनगरला जाणारे २२७ प्रवाशांचे एअरबस विमान वादळी धुमश्चक्रीत भरकटून लाहोरच्या प्रतिबंधित क्षेत्रात जायला निघाले होते.
शेवटी ते विमान श्रीनगर विमानतळावर कसेबसे उतरले ते नाकाला भगदाड पडलेल्या अवस्थेत. त्या दीड तासात २२७ प्रवाशांना साक्षात मृत्युच्या दारात गेल्याचा जीवाचा थरकाप उडविणारा अनुभव आला होता. पण लंडनला जायला निघालेल्या २४२ प्रवाशांना मृत्यूने गाठण्यासाठी अर्धे मिनिटही लागले नाही.
लंडनमध्ये आपल्या चिमुकल्यांसह आयुष्याची नव्याने सुरुवात करण्यासाठी निघालेल्या कुटुंबाचे आणि आपल्या आप्तस्वकीयांच्या भेटीसाठी आतुर झालेल्यांना विमानात भरलेल्या सव्वा लाख लीटर इंधनाच्या ज्वालाग्राही गोळ्याने क्षणार्धात गिळंकृत करुन टाकले.
विमानतळाचे कुंपण जेमतेम पार करणारे ड्रीमलायनरने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहावर कोसळून भोजनाच्या आस्वादात गुंतलेल्या डॉक्टरांचा घास घेत त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी लंडनला जाण्याचे तिकीट दोनवेळा रद्द केले होते, पण काळाने त्यांच्यावरही झडप घातली.
या विनाशकारी अपघातात विश्वासकुमार रमेश नावाचा एकमेव प्रवासी जुजबी जखमांसह सहीसलामत बचावला. सारेच अतर्क्य! अनेक शोकांतिकांचा हा जीवघेणा गुंता पाहून अनेकांचे डोळे पाणावले असतील. मन खिन्न झाले असेल. मरणाकल्पनेशी जाणत्यांचाही तर्क थांबतो. पण हे दु:ख गिळूनच पुढले आकाश पाहावे लागणार आहे.