महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन, खरीप पेरण्यांना वेग

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 19 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

राज्यात पंधरा दिवसांच्या दौर्घ खंडानंतर पुन्हा पाऊस परतला आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागांत वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. सिंधुदुर्गमधील देवगड येथील आंबा फळ संशोधन केंद्र येथे आज सकाळी आठ वाजेपर्यंत ३०२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील ६४ मंडलांत अतिवृष्टी झाली. अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. त्यामुळे खरीप पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे. मे महिन्यात दुसऱ्या पंधरवड्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे उन्हाळी पिकांचे व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर पावसाने काहीशी उघडीप दिली होती. त्यामुळे या काळात शेतकऱ्यांनी वेगाने शेतीची कामे उरकत काही ठिकाणी पेरण्या केल्या आहेत. राज्यात खरिपाचे सरासरी १४४ लाख ३६ लाख हेक्टर एवढे क्षेत्र आहे. आतापर्यंत चार लाख १७ हजार हेक्टर म्हणजेच तीन टक्के पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात तीन लाख ३९ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. चालू वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगली पेरणी झाली आहे. येत्या काळात चांगला पाऊस झाल्यास खरीप पेरण्यांना वेगात सुरुवात होईल. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार पाऊस
राज्यात २६ मे दरम्यान मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर अनेक ठिकाणी दमदार पाऊस होऊन नद्या, नाले, ओढे भरून वाहू लागले. धरणातील पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली. मध्यंतरी कमी झालेल्या पावसामुळे वेग मंदावला होता. परंतु पुन्हा पाऊस परतल्यामुळे ओढे, नाले प्रवाही झाले आहेत. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे जिल्ह्यांत पावसाच्या कमीअधिक सरी कोसळल्या. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे भात खाचरे भरून वाहू लागल्याने भात लागवडीला वेग येण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रात वादळी पाऊस मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक भागांत वादळी पावसाने हजेरी लावली. पुणे जिल्ह्यात पावसाने दुसऱ्या दिवशी चांगलाच दणका दिला आहे. वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. शिरूरमधील वडगाव, न्हावरा आणि निमोणे मंडलांत सर्वाधिक ६५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे खरीप पेरण्यांना वेग येऊ लागला आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र पश्चिम भागात गुरुवारी (ता. १२) सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. नगर जिल्ह्यातील संगमनेर, राहुरी, नेवासा, श्रीरामपूर, राहाता, भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे केळीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. 

 रायगड,रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  तर मुंबई, ठाणे, सिंधुदु‌र्ग, पुणे, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा याठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.  
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) पालघर, जळगाव, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणीला जारी करण्यात आला असून नंदूरबार, धुळे, नाशिक, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली येथे विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तनवण्यात आली आहे.  

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter