राज्यात प्रसिद्ध असलेल्या घोडेगाव (ता. नेवासे) येथील मिरी रस्त्यावर भरलेल्या जनावराच्या बाजारात शुक्रवारी (ता.६) रोजी अंदाजे एक कोटी रुपयांची उलाढाल झाली तर नेवासे तालुक्यात पंचवीस लाख अशी एकूण अर्धा कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
शनिवार (ता.७) रोजी सण असल्याने बाजारात आज वजनदार बोकडास मोठ्या प्रमाणात मागणी होती. ५६ किलो वजनाचा एक बोकड पन्नास हजार रुपयास विकला गेला. बकरी ईद सणाच्या खरेदीसाठी घोडेगाव येथील बाजारात मागील शुक्रवारी (ता. ३० मे) रोजी सहा तासात दीड कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. आज पहाटे चार वाजता मोठ्या बोकडांची आवक गावात सुरु होताच व्यवहार झाला.
राज्यातील व देशातील काही प्रमुख शहरातील व्यापारी आले असले तरी बोकड घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी होती. परिणामी मागील आठवड्याच्या तुलनेत अधिक भाव वधारले होते. सणाचा बाजार असल्याने शेळी, मेंढी व कोंबड्यांची आवक कमी होती. एक वर्षपिक्षा जास्त वय असलेल्या व वजनदार असलेल्या बोकडास मोठ्या प्रमाणात मागणी होती.
चाळीस ते त्रेचाळीस किलो वजनाचा बोकड वीस ते पंचवीस हजार रुपयास विकला गेला तर सत्तर किलो वजनाचा बोकड चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयास विकला गेला. मागील सात दिवसात नेवासे तालुक्यातील व्यापाऱ्यांनी लोणी, शिरुर, चाकण, काष्टी येथून आणलेले बोकड बाजारात विक्रीसाठी ऊभे केले होते.
राशीनमध्येही लाखोंची खरेदी-विक्री
राज्यात शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या राशीनच्या शेळ्या-मेंढ्यांच्या आठवडे बाजारात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बोकडांच्या खरेदी-विक्रीत लाखो रुपयांची उलाढाल झाली. बकरी ईदमुळे भिगवण, इंदापूर, करमाळा, बारामती, पुण्यातील व्यापाऱ्यांसह मुस्लिम बांधवांनी राशीनच्या बाजारात मंगळवारी बोकड खरेदीसाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
मागणी वाढल्याने प्रत्येक बोकडामागे पाच हजारांची दरवाढ झाली होती. तरीही मागणी कायम होती. एरवी १५ हजारांना विकला जाणारा बोकड यावेळी २१ हजारांपर्यंत गेला. वजनाने आणि उंचीने मोठ्या असणाऱ्या बोकडांना विशेष मागणी होती. ईद मुळे बोकडाची किंमत तब्बल ५७ हजार रुपयांपर्यंत गेली. उस्मानाबादी आणि संगमनेरी शेळ्यांपासून तयार झालेल्या बोकडांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आले होते. शेतकऱ्यांनी खास बकरी ईदसाठी जोपासलेल्या बोकडांना अपेक्षित बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या उलाढालीत शेळीपालन करणारे शेतकरी, व्यापाऱ्यांना चांगला नफा झाला. बाजारात असलेल्या खाणावळी, नाश्त्याचे हॉटेल, पाणी विक्रेते, पान टपऱ्या या व्यावसायिकांच्या व्यवसायातही चांगली उलाढाल झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.