जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाचे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केले. हा पूल दुर्गम भागातील कौरी आणि बक्कल गावादरम्यान उभारण्यात आला आहे. चिनाब नदीपासून ३५९ मीटर उंचीवर म्हणजे आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच असलेल्या या पुलाची लांबी १३१५ मीटर आहे. अतिशय कठीण वाटणारा चिनाब नदीवरील रेल्वे पूल हा एकप्रकारे काश्मीरच्या जनतेचे आकांक्षाचे प्रतिबिंब आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेला पुल २६० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणारे वारे आणि भूकंपाच्या हादऱ्यापासून सुरक्षित राहू शकतो. पुलाचे आर्युमान सुमारे १२० वर्षाचे असून त्यासाठी १४८६ कोटी रुपये खर्च आला आहे. हा पूल जम्मू आणि श्रीनगरला बारामाही जोडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
दुसरीकडे चिनाब रेल्वे पूल हा उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (यूएसबीआरएल) प्रकल्पाचा महत्त्वाचा घटक मानला जातो. सुमारे ४३, ७८० कोटी रुपये खर्चातून साकारण्यात येणाऱ्या प्रकल्पानुसार ३६ बोगदे (लांबी ११९ किलोमीटर), ९४३ पुलांची उभारणी केली असून या प्रकल्पामुळे काश्मीर खोरे आणि देशाचा उर्वरित भाग बारामाही जोडण्यासाठी मदत करणार आहे.
रेल्वेराज्यमंत्री रवनीत सिंह यांनी उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधला होता. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काश्मीर खोऱ्यात अभूतपूर्व विकास होत आहे. चिनाबचा रेल्वे पूल हा अभियांत्रिकी क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. अभियांत्रिकी कौशल्याचा हा उकृष्ट नमुना म्हणून चिनाब रेल्वे पुलाची ओळख निर्माण झाली असून ते अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीइतकीच दर्जेदार प्रतीक आहे.