‘युद्ध हा पर्याय नाही. शस्त्रविराम आणि शांततेसाठी कटिबद्ध’

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 20 h ago
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी (फाईल फोटो)
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी (फाईल फोटो)

 

11 मे, नवी दिल्ली

दहशतवादाविरुद्ध सुरु असलेली ‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाईत शस्त्रविराम घेत असल्याची घोषणा परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी शनिवारी संध्याकाळी केली. भारताने सुरुवातीपासूनच युद्ध हा पर्याय नाही, असे ठामपणे सांगितले होते. या घोषणेनंतर चीनने भारताच्या युद्धविरोधी भूमिकेचे कौतुक केले. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी ही प्रशंसा केली. ते चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटिकल ब्युरोचे सदस्य आणि केंद्रीय परराष्ट्र व्यवहार कार्यालयाचे संचालकही आहेत.

तत्पूर्वी वांग यी यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी शनिवारी रात्री फोनवर चर्चा केली. या चर्चेत त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. दोन्ही देशांच्या लष्करी संचालकांनी (DGMO) युद्धविरामावर सहमती दर्शवली होती. पण काही तासांतच पाकिस्तानने युद्धविराम तोडला. या पार्श्वभूमीवर ही चर्चा महत्त्वाची ठरली.

अजित डोवाल-वांग यी यांच्यात झाली महत्त्वाची चर्चा
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी वांग यी यांच्याशी संवाद साधत भारताची भूमिका स्पष्ट केली. युद्ध हा भारताचा पर्याय नाही आणि तो पर्याय कोणत्याही पक्षाच्या हिताचा नाही,  असे त्यांनी ठामपणे सांगितले. भारत शस्त्रविराम आणि पाकिस्तानसोबत शांतता प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही त्यांनी नमूद केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीय नागरिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे दहशतवादविरोधी कारवाई करणे गरजेचे होते, अशी माहिती डोवाल यांनी यावेळी दिली.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या उच्चस्तरीय राजनैतिक संभाषणानंतर एक निवेदन प्रसिद्ध केले. या निवेदनात म्हटले आहे: "10 मे 2025 रोजी वांग यी यांनी अजित डोवाल यांच्याशी फोनवर चर्चा केली. युद्ध हा भारताचा पर्याय नाही आणि ते कोणाच्याही हिताचे नाही, असे डोवाल यांनी सांगितले. भारत आणि पाकिस्तान युद्धविरामासाठी कटिबद्ध आहेत. प्रादेशिक शांतता आणि स्थिरता लवकर प्रस्थापित व्हावी, अशी त्यांची अपेक्षा आहे."

भारत-पाक संघर्षाविषयी चीनची भूमिका
वांग यी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती अस्थिर आणि गुंतागुंतीची आहे. आशियातील शांतता आणि स्थिरता मिळवणे कठीण आहे. त्यामुळे ती टिकवायला हवी, असे त्यांनी नमूद केले. भारत आणि पाकिस्तान हे शेजारी देश आहेत. ते एकमेकांपासून दूर जाऊ शकत नाहीत. दोन्ही देश चीनचे शेजारी आहेत, असेही त्यांनी सांगितले.

वांग यी यांनी डोवाल यांच्याशी बोलताना सांगितले, "युद्ध हा भारताचा पर्याय नाही, असे तुम्ही सांगितले. याचे चीन कौतुक करते. भारत आणि पाकिस्तानने शांतता आणि संयम राखावा, अशी आमची प्रामाणिक अपेक्षा आहे. संवाद आणि सल्लामसलतीद्वारे मतभेद हाताळावेत. परिस्थिती वाढू देऊ नये."

चीनच्या निवेदनात पुढे म्हटले आहे, "भारत आणि पाकिस्तानने सल्लामसलतीद्वारे सर्वसमावेशक आणि दीर्घकालीन युद्धविरामासाठी तोडगा काढावा, अशी चीनची अपेक्षा आहे. भारत आणि पाकिस्तानच्या मूलभूत हितासाठी हे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाचीही हीच इच्छा आहे."


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter