वित्तीय तुटीच्या आकड्यांनी चिंता वाढवली? केंद्र सरकारने दिले मोठे स्पष्टीकरण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
आर्थिक व्यवहार सचिव अनुराधा ठाकूर
आर्थिक व्यवहार सचिव अनुराधा ठाकूर

 

सरकार चालू आर्थिक वर्षासाठीचे ४.४ टक्क्यांचे महत्त्वाकांक्षी वित्तीय तुटीचे लक्ष्य चुकवू शकते, ही भीती आर्थिक व्यवहार सचिव अनुराधा ठाकूर यांनी फेटाळून लावली आहे. "मासिक आकडेवारीमुळे काही तात्पुरती तफावत दिसत असली तरी, अर्थसंकल्पात निश्चित केलेले उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने सरकार योग्य मार्गावर आहे," असे त्यांनी शनिवारी स्पष्ट केले.

जुलै महिन्याच्या अखेरीस केंद्राची वित्तीय तूट संपूर्ण वर्षाच्या लक्ष्याच्या २९.९ टक्क्यांवर पोहोचल्याने चिंता व्यक्त केली जात होती. गेल्या वर्षी याच काळात हे प्रमाण केवळ १७.२ टक्के होते. याच पार्श्वभूमीवर ठाकूर यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.

अनुराधा ठाकूर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, "तिमाही किंवा मासिक आकडेवारीवरून वित्तीय तुटीचे मूल्यांकन केल्यास योग्य चित्र समोर येणार नाही, कारण उत्पन्न आणि खर्चाच्या बाजूने तात्पुरती तफावत असू शकते. आमच्या आतापर्यंतच्या मूल्यांकनानुसार, आम्ही लक्ष्य गाठू शकू." केंद्राने २०२५-२६ या आर्थिक वर्षात जीडीपीच्या ४.४ टक्के किंवा १५.६९ लाख कोटी रुपयांची वित्तीय तूट अंदाजित केली आहे.

अनुराधा ठाकूर यांनी यावर भर दिला की, अर्थव्यवस्थेची मूलभूत तत्त्वे मजबूत आहेत आणि खासगी उपभोगाचे आकडेही सकारात्मक वाढ दर्शवत आहेत. तसेच, सरकारी आणि खासगी दोन्ही भांडवली खर्च (capex) मजबूत असल्याचेही त्या म्हणाल्या.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील ७.८ टक्के जीडीपी वाढीवर बोलताना अनुराधा ठाकूर म्हणाल्या की, "ही आकडेवारी आपल्या अर्थव्यवस्थेची लवचिकता आणि वाढीचा वेग दर्शवते." त्यांनी सांगितले की, कृषी, उत्पादन, बांधकाम आणि सेवा क्षेत्रांची चांगली कामगिरी आणि मजबूत देशांतर्गत मागणीमुळे ही वाढ शक्य झाली.

हाच वेग आगामी तिमाहींमध्येही कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ताज्या आकडेवारीनुसार, भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे, कारण एप्रिल-जून या कालावधीत चीनचा जीडीपी वाढीचा दर ५.२ टक्के होता.