कॅनडा येथे होत असलेल्या जी-७ देशांच्या शिखर परिषदेपूर्वी भारताविरुद्ध आंदोलन करणारे खलिस्तानी समर्थक हे पाकिस्तानचे भाडोत्री असल्याची टीका केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी केली. या आंदोलकांची दखल घेण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.
केंद्र सरकारला अकरा वर्षे आणि दिल्ली सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिल्ली प्रदेश भाजपच्या कार्यालयात प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाला केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता तसेच दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित होते. त्यावेळी पुरी यांना कॅनडामध्ये जी-७ शिखर परिषदेपूर्वी सुरु असलेल्या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यात आले. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
"हे लोक शेजारी देशाकडून (पाकिस्तान) मिळणाऱ्या पैशाच्या जोरावर ते धरणे आंदोलन करतात आणि पैसे मिळाले नाही तर त्यांच्याच विरोधात आंदोलन करतात. तसा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या भाडोत्रींना गंभीरपणे घेऊ नका," असे पुरी म्हणाले.