मुन्नी बेगम
वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी नाहिद आफरीनने समाजासाठी असे काही केलंय, जे अनेकांना वयाची पन्नाशी ओलांडूनही जमलेलं नाही. शालेय जीवनापासूनच नाहिद हिने आसामचा गौरव वाढवला आहे.
२०१५ मध्ये इंडियन आयडॉल ज्युनियरच्या स्पर्धेत ती द्वितीय उपविजेती ठरली आणि प्रसिद्धीच्या झोतात आली. २०१६ मध्ये सोनाक्षी सिन्हा अभिनीत ‘अकिरा’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले. तर २०१८ मध्ये युनिसेफ इंडियाने नाहिदला ईशान्य भारतासाठी ‘चाइल्ड राइट्स चॅम्पियन’ म्हणून निवडले. तेव्हा नाहिद शाळेत होती, परंतु तिच्या कामाने समाजातील तिचे योगदान अधोरेखित केले.
सध्या नाहिद गुवाहाटीतील प्रतिष्ठित कॉटन युनिव्हर्सिटीमध्ये मानसशास्त्राची विद्यार्थिनी आहे. युनिसेफ इंडियाची युथ ॲडव्होकेट म्हणून ती आता बालविवाहासारख्या सामाजिक समस्यांविरुद्ध लढत आहे. नाहिदसह तीन अन्य युथ ॲडव्होकेट्स बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान यांच्यासोबत काम करत आहेत. करीना कपूर खान या युनिसेफ इंडियाची राष्ट्रीय राजदूत म्हणून कार्यरत आहेत. बालविवाहाबरोबरच हवामान कृती, मानसिक आरोग्य, नवोन्मेष आणि मुलींसाठी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित (STEM) क्षेत्रातील मुद्द्यांवर ते काम करत आहेत.
२०१८ मध्ये युनिसेफने आसाम विधानसभेत बालविवाहाविरुद्ध कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा विधानसभेच्या अध्यक्षांनी बालविवाहाच्या नकारात्मक परिणामांवर अहवाल सादर केला आणि उपाययोजनांवर चर्चा झाली. नाहिदने २०२० पर्यंत बालविवाहविरोधी मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
२०२३ मध्ये युनिसेफ इंडियाच्या प्रादेशिक कार्यालयातून नाहिदला फोन आला. त्यात तिला युथ ॲडव्होकेट म्हणून नामांकन मिळाल्याची माहिती देण्यात आली. भारतातील काही निवडक तरुणांपैकी नाहिदची निवड झाली होती. त्यानंतर तिने वर्षभराच्या प्रशिक्षण कार्यशाळेत सहभाग घेतला आणि आसामसाठी ही जबाबदारी स्वीकारली.
युनिसेफची युथ ॲडव्होकेट म्हणून नाहिदला आता बालविवाहासारख्या समस्यांवर आंतरराष्ट्रीय मंचावर काम करण्याची संधी आहे.
याविषयी बोलताना नाहिद म्हणते, “मुलींचा विचार येतो तेव्हा शिक्षण, आरोग्य आणि विकासाकडे लक्ष जाते. आता मी बालविवाह आणि मुलांच्या मानसिक आरोग्यावर काम करणार आहे. आजकाल अनेक विद्यार्थी आणि मुले मानसिक तणावात आणि नैराश्यात असतात. १३ ते १९ वयोगटातील मुलांना तणावाचा सामना करावा लागत आहे.
ती पुढे म्हणते, "अभ्यास आणि इतर क्षेत्रांतील स्पर्धा, पालकांचा दबाव, सामाजिक अपेक्षा आणि करिअरची चिंता यामुळे अनेकजण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. युनिसेफची युथ ॲडव्होकेट आणि मानसशास्त्राची विद्यार्थिनी म्हणून मी मुलांना तणावमुक्त करण्यासाठी जागरूकता निर्माण करणार आहे.”
नाहिदच्या मते, ग्रामीण भागात अनेकदा पालकांना योग्य माहिती नसल्याने नवजात बालकांच्या पोषणाकडे दुर्लक्ष होते. बाळाच्या जन्मानंतर स्तनपानाचे महत्त्वही गावकऱ्यांना माहीत नसते. युनिसेफची युथ ॲडव्होकेट म्हणून नाहिद आता पालकांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण करणार आहे.
भविष्यात स्वतःची ओळख कशी सांगायची, असं विचारलं असता नाहिद म्हणाली, “मी संगीत, शिक्षण आणि सामाजिक कार्य सुरू ठेवेन. ईश्वराने माझ्यावर आतापर्यंत अनेक कृपा केल्या. मी भविष्यात काय करेन याचा समाजाला फायदा झाला पाहिजे. मला एक अशी व्यक्ती म्हणून स्मरणात ठेवले जावे, जिने जगातील लोकांना राहण्याजोगे ठिकाण अधिक चांगले ठिकाण बनवण्यासाठी काहीतरी योगदान दिले आहे.”