अहमद अली : शिक्षणक्रांतीने हजारो आयुष्यांचा कायापालट करणारे व्यक्तिमत्व

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
समाजसेवक अहमद अली
समाजसेवक अहमद अली

 

- दौलत रहमान
 
१९७० च्या उत्तरार्धाचा काळ होता. दक्षिण आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यातील अहमद अली एका रात्री आपली सायकल रिक्षा चालवून झोपायला गेले. परंतु स्वप्नात भयावह दृश्य पाहून ते जागे झाले. त्या रात्री त्यांना व्यवस्थित झोप लागली नाही. जन्माला येणारा त्यांचा मुलगा निरक्षर राहील आणि त्यालाही रिक्षा चालवावी लागेल, असे स्वप्न त्यांना पडले होते. 

 
आपल्या मुलाला शिक्षण मिळणार नाही, ही भीती त्यांना इतकी सतावू लागली आणि त्याच भीतीतून त्यांनी काहीतरी करण्याचे ठरवले. त्यांची येणारी पिढी निरक्षरतेची बळी ठरू नयेत, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. आता जवळपास ९० वर्षांचे असलेले श्रीभूमी (पूर्वीचे करीमगंज) जिल्ह्यातील पाथरकांडी तालुक्यातील खिलोरबोंड-मधुरबोंड येथील अहमद अली आपल्या परिसरात एक समाज परिवर्तक म्हणून ओळखले जातात.

अहमद अली यांनी आपल्या रिक्षा चालवून मिळवलेल्या उत्पन्नातून आणि ३२ बिघा वडिलोपार्जित जमिनीतून तब्बल नऊ शाळा उभारल्या आहेत. त्यांच्या या शाळांमधून ५०० विद्यार्थिनी आणि १०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोणालाही निरक्षरतेच्या पापात जगावे लागू नये, असे अली यांना वाटते. 

१९७४ मध्ये त्यांनी जमिनीचा एक तुकडा विकून पहिली प्राथमिक शाळा सुरू केली. गावकऱ्यांकडूनही थोडी देणगी मिळाली. तेव्हापासून अली यांनी आपल्या स्वप्नासाठी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी खिलोरबोंड-मधुरबोंड आणि आजूबाजूच्या परिसरात नऊ शाळा उभारल्या. यात तीन प्राथमिक शाळा, पाच मध्यम शाळा (इंग्रजी माध्यम) आणि एक उच्च माध्यमिक शाळा आहे. पाच शाळा शासकीय झाल्या असून, तिथल्या शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना सरकारकडून पगार मिळतो. उरलेल्या शाळांमध्ये शिक्षक स्वयंसेवी पद्धतीने काम करतात.
 

वयाच्या नव्वदीतही अली स्वप्ने पाहतात आणि आपले ध्येय नव्या उंचीवर नेण्यासाठी झटतात. गावाजवळ ज्युनियर कॉलेज सुरू करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. जेणेकरून दहावी उत्तीर्ण विद्यार्थी पुढील शिक्षण घेऊ शकतील. गावात आणि आजूबाजूच्या भागात आणखी शाळा उभारण्याचाही त्यांचा मानस आहे.

अली यांनी ‘आवाज - द व्हॉइस’ला सांगितले की, “ईश्वर मला मार्गदर्शन आणि आशीर्वाद देत आहे. मी पुढच्या पिढ्यांचे आयुष्य बदलण्याच्या मिशनवर आहे. माझ्या मुलांसह गावातील इतर मुलांना शिक्षण देऊ शकलो, याचा आनंद आहे. काही विद्यार्थी आता चांगल्या नोकऱ्यांना लागले आहेत. यामुळे मला समाधान आणि आत्मिक शांती मिळते. मी समाजातील श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्तींना अधिक शाळा उभारण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करतो.” 
 

अली यांच्यासाठी शिक्षण ही जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येकाला शिक्षणाची संधी मिळायला हवी यासाठी ते प्रयत्न करत आहेत. ते म्हणतात, “निरक्षर राहणे हे पाप आहे. कुराणातील पहिला शब्द ‘इक्‌रा’ आहे, म्हणजे वाचन किंवा पठण. हा शब्द सूरह अल-अलकच्या (अध्याय ९६) पहिल्या आयतच्या सुरुवातीला येतो. ‘इक्‌रा’ हा शब्द ज्ञान, शिक्षण आणि इस्लाममधील शिक्षणाच्या महत्त्वावर भर देतो. शेवटच्या श्वासापर्यंत मी शाळा उभारण्याचे प्रयत्न सुरू ठेवेन.” 

यंदा प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात नवी दिल्लीत अहमद अली यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून गेली. समाजासाठी त्यांच्या अतुलनीय सेवेसाठी भारत सरकारने त्यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’मध्ये दक्षिण आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यातील या ग्रामीण गावातील रहिवासी अहमद अली यांचा उल्लेख केला होता.
 
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter