- इम्तियाज अहमद
द्रोणाचार्य पुरस्कार विजेते स्वर्गीय रमाकांत आचरेकर यांनी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांना घडवले आणि त्यांचा मुलगा अर्जुन यालाही मार्गदर्शन केले. अगदी तसेच 'आसामचे आचरेकर' नबाब अली यांनी माजी आसाम रणजी कर्णधार पराग दास यांना घडवले आणि त्यांचा मुलगा रियान पराग यालाही घडवले. आसाममधून भारतीय संघात स्थान मिळवणारा पहिला तो क्रिकेटपटू बनवला.
क्रिकेट विश्वात सर्वांनी ‘नबाबदा’ (नबाब भाऊ) म्हणून हाक मारलेल्या नबाब अली यांनी स्वत:च्या कारकीर्दीत फारशी शतके किंवा अर्धशतके ठोकली नसली, तरीही त्यांनी आसाम आणि भारतासाठी दर्जेदार क्रिकेटपटूंची शंभरी नक्कीच गाठली आहे.
संपूर्ण आयुष्य क्रिकेट प्रशिक्षणासाठी वाहून घेतलेल्या नबाब अली यांना ‘क्रिकेटचा नवाब’ म्हणून ओळखले जाते. १९८५ पासून आसामसाठी खेळलेल्या बहुतेक प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना त्यांनी घडवले. ५० हून अधिक प्रथम श्रेणी खेळाडू आणि १०० हून अधिक राष्ट्रीय वयोगट स्पर्धेतील खेळाडू तयार करणाऱ्या नबाबदा यांना रियान परागने भारतीय संघाची निळी जर्सी परिधान केल्यानंतर खरा आनंद झाला.
नबाबदा यांनी फक्त पराग आणि रियान यांनाच घडवले नाही, तर त्यांनी प्रशिक्षित केलेल्या खेळाडूंच्या दुसऱ्या पिढीतील मुलांनाही तयार केले. यात सय्यद जकारिया झुफ्री, निशांत बोरदोलोई, विश्वजित चौधरी, गौतम शर्मा, झावेद झमान यांचा समावेश आहे. शांत स्वभावाचे नबाबदा वयाच्या साठीनंतरही तसेच तंदुरुस्त आहेत. आसाममधून भारतीय संघात खेळाडू देण्याच्या ध्येयाने त्यांनी १९८५ मध्ये गुवाहाटी क्रिकेट प्रशिक्षण केंद्र सुरू केले. तेव्हापासून नेहरू स्टेडियमवरील एकही प्रशिक्षण सत्र त्यांनी चुकवले नाहीत.
नबाब अली यांनी वयाच्या १५व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. १९७८ मध्ये बीसीसीआयच्या पूर्व क्षेत्राचे प्रशिक्षक एदुल बी. आयबारा यांच्याकडून त्यांनी क्रिकेटचे धडे घेतले. १९८१-८२ आणि १९८३-८४ हंगामात त्यांनी आसामचे सीके नायुडू ट्रॉफी स्कूल क्रिकेट स्पर्धेत प्रतिनिधित्व केले. १९८४ ते १९८६ दरम्यान गुवाहाटी जिल्हा संघासाठी नुरुद्दीन ट्रॉफी सीनियर आंतरजिल्हा स्पर्धेतही ते खेळले.
लहानपणापासूनच संघटन आणि प्रशिक्षणाची आवड जोपासणाऱ्या नबाब अली यांनी १९८४ मध्ये आसाम राज्य क्रीडा परिषदेने आयोजित शिबिरात क्रीडा प्राधिकरणाचे प्रशिक्षक वीरेंद्रकुमार शर्मा यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. नबाब अली यांनी ‘आवाज - द व्हॉइस’ला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितले की, “शर्मा यांची गुवाहाटीतून बदली झाल्यानंतर १९८५ मध्ये नेहरू स्टेडियमच्या एका कोपऱ्यात प्रशिक्षण केंद्र सुरू झाले. मी प्रशिक्षणार्थींमध्ये सर्वात ज्येष्ठ होतो, म्हणून मी लहान मुलांना प्रशिक्षण द्यायचो.”

नबाबदा एक उत्तम क्रीडा संघटकही आहेत. १९९२ ते २०१८ पर्यंत त्यांनी गुवाहाटी क्रीडा संघटनेचे नेतृत्व केले. त्यांच्या समकालीन सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी गुवाहाटी क्रिकेट प्रशिक्षण केंद्राला पूर्ण स्वरूप दिले. त्यामध्ये स्वर्गीय अब्दुल रॉब, रतूल दास, अशरफूर रहीम (राजू) यांचा समावेश होता. आज हे केंद्र अनेक प्रतिभावान क्रिकेटपटूंसाठी तयारीचे मैदान आहे. सुरुवातीला आसामचे माजी कर्णधार राजिंदर सिंग, झहीर अहमद आणि सध्याचे आसाम क्रिकेट असोसिएशनचे सचिव देवजित सैकिया यांच्यासह २५-३० प्रशिक्षणार्थी होते. आता या केंद्रात ३५० खेळाडू नोंदणीकृत आहेत.
नबाबदा यांनी घडवलेल्या उत्तम खेळाडूंमध्ये सय्यद जकारिया झुफ्री, अबू नसिम अहमद, पराग दास, निशांत बोरदोलोई, खानिन सैकिया, रियान पराग, मृगेन तालुकदार, पोलाश ज्योती दास, सादेक इम्रान चौधरी यांचा समावेश आहे. जकारियाने २००२ मध्ये चॅलेंजर ट्रॉफीत भारत बी संघाचे प्रतिनिधित्व केले. अबू नसिम यांची भारतीय संघात निवड होणार होती, परंतु ते इंडियन क्रिकेट लीगमध्ये खेळल्याने बीसीसीआयने त्यांना निलंबित केले होते. भारत अंडर-१९ संघातील त्यांचा सहकारी इशांत शर्माची त्यांच्याऐवजी निवड झाली.
यावर नबाबदा म्हणाले की, “जकारिया, गौतम दत्ता आणि हेमंगा बारुआ यांना भारतीय संघात स्थान न मिळाल्याने निराशा झाली. परंतु अबूच्या निलंबनाने आम्हाला धक्का बसला. ती घटना खूप दुर्दैवी होती.”
आता नबाबदा एका गोष्टीमुळे आशावादी आहेत. त्यांचे शिष्य देवजित सैकिया बीसीसीआयचे सचिव झाल्याने भविष्यात आसामच्या प्रतिभावान खेळाडूंना दुर्लक्षित केले जाणार नाही, असा त्यांना विश्वास आहे. “भूतकाळात आसामच्या प्रशासकांना बीसीसीआय पातळीवर खेळाडूंसाठी लढता आले नाही. पण आता देवजित सैकिया यांच्या नेतृत्वाखाली आसामवर अशी वेळ येणार नाही. बीसीसीआय आणि आयसीसीमधील त्यांची उपस्थिती आसामच्या क्रिकेटसाठी वरदान आहे. मला आशा आहे की ते लवकरच आयसीसीचे नेतृत्व करतील."
अबू, मृगेन, पोलाश आणि खानिन यांनी भारत अंडर-१९ साठी खेळले, तर सादेकने २००१ मध्ये भारत अंडर-१७ चे प्रतिनिधित्व केले. नेहरू स्टेडियमवरील प्रशिक्षण केंद्राबाबत नबाबदा म्हणाले, "नेहरू स्टेडियम हे नेहमीच बहुउद्देशीय मैदान आहे. गुवाहाटीत ही एकमेव उपलब्ध सुविधा होती. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, अॅथलेटिक्स असे सर्व काही येथे चालायचे. आम्हाला बऱ्याच तडजोडी कराव्या लागल्या. पण आसाम क्रीडा मंडळ आणि आसाम क्रिकेट असोसिएशनकडून आम्हाला नेहमी सहकार्य मिळाले. इतरही खेळांचा विकास व्हावा असे आम्हाला वाटते.”
नबाबदा यांच्याकडे गुवाहाटीतील खेळाडूच नव्हे, तर शिवसागर, चराईदेव, नाझिरा, दिब्रुगड, सिलचर, धुब्री यासारख्या दूरच्या भागातील खेळाडू अल्पकालीन शिबिरांसाठी येतात.