सय्यदुल्ला नॉन्गरम : मेघालयात एकता आणि शिक्षणासाठी लढणारे खासिय्या मुस्लिम नेते

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 5 d ago
सय्यदुल्ला नॉन्गरम
सय्यदुल्ला नॉन्गरम

 

 
झुमूर देब, शिलॉंग 
 
मेघालयमध्ये ख्रिश्चन समाज आणि खासिय्या आदिवासी संस्कृती प्रसिद्ध आहे. याच संस्कृतीत सय्यदुल्ला नॉन्गरम एकतेचा पुरस्कार करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून समाजासमोर उभे आहेत. खासिय्या मुस्लिम असणारे सय्यदुल्ला गेल्या अनेक वर्षांपासून शिलॉंग मुस्लिम युनियनचे (SMU) जनरल सेक्रेटरी म्हणून समाजात एकता, शिक्षण आणि शांतता यासाठी काम करत आहेत. त्यांनी मेघालयात सर्व समाजांना जोडण्याचं काम केलं आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार मेघालयात फक्त चार टक्के मुस्लिम समाज आहे. यामध्ये बंगाली मुस्लिम आणि खासिय्या मुस्लिम यांचा समावेश आहे. आदिवासी जमातीतील लोकांनी काही पिढ्यांपूर्वी इस्लामचा स्वीकार केला अशा लोकांना खासिय्या मुस्लिम म्हणतात. इस्लाम स्वीकारला असला तरी त्यांनी खासिय्या भाषा, मातृसत्ताक पद्धत आणि संस्कृती कायम ठेवली आहे. 

सय्यदुल्ला यांचा जन्म मेघालयातील सर्वात जुन्या खासिय्या मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे आई-वडील स्वभरतन बीबी नॉन्गरम आणि एसके अब्दुल्ला यांनी त्यांना खासिय्या संस्कृती आणि इस्लाम यांचा समन्वय शिकवला. सय्यदुल्ला म्हणतात, “खासिय्या आणि मुस्लिम असणं यात काही विरोध नाही. आमची संस्कृती या मातीशी जोडलेली आहे. तसेच इस्लाम सर्वांना आदर देण्याची शिकवण देतो.”
 
 
 
शिलॉंग मुस्लिम युनियनची पुनर्रचना
शिलॉंग मुस्लिम युनियन (SMU) ची स्थापना १९०५  मध्ये झाली. ऑल इंडिया मुस्लिम लीगपेक्षा ही युनियन जुनी आहे. भारताचे माजी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी १९६४  मध्ये या युनियनचे अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. सय्यदुल्ला यांनी १९८२  मध्ये युनियनचं नेतृत्व स्वीकारलं. सय्यदुल्ला यांनी पद स्वीकारलं तेव्हा शिलॉंग युनियनची अवस्था खराब होती. या संस्थेचं गेस्ट हाउस, अनाथालय आणि ईदगाह मैदान खराब झालं होतं.

सय्यदुल्ला यांनी युनियनला नवसंजीवनी दिली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी ईशान्य भारतातील सर्वात मोठी मस्जिद मदिना मस्जिद बांधली. ही मस्जिद फक्त प्रार्थनेसाठी नाही, तर यात इस्लामी शिक्षण केंद्र, गरीब मुलांसाठी शाळा आणि विज्ञान, कला, तंत्रज्ञान शिकवणारा कॉलेज आहे. यामागच्या भूमिकेविषयी ते म्हणतात, “धार्मिक संस्थांनी सर्व समाजाला मदत केली पाहिजे, फक्त एका गटाला नाही.” 
 

 
शिक्षणात घडवली क्रांती
सय्यदुल्ला यांनी शिक्षणाला खूप महत्त्व दिलं आहे. त्यांनी सुरू केलेल्या उमशिर्पी कॉलेजमध्ये आज साडे तीन हजारहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. हे कॉलेज सर्व समाजातील विद्यार्थ्यांना कमी फी मध्ये शिक्षण देते. तसेच व्होकेशनल ट्रेनिंग आणि आंतरधर्मीय उपक्रम राबवतं. सय्यदुल्ला म्हणतात, “शिक्षणाने जाती, धर्म आणि जमातीच्या भिंती तोडल्या पाहिजेत. तरचं प्रगती शक्य आहे.”

राजकीय योगदान
१९९३ मध्ये सय्यदुल्ला मेघालयातील पहिले आणि एकमेव खासिय्या मुस्लिम आमदार झाले. त्यांनी राजबाला मतदारसंघाचं (पश्चिम गारो हिल्स) प्रतिनिधित्व केलं आहे. या मतदारसंघात मुस्लिम समाजाचे प्राबल्य आहे. या मतदारसंघातून आमदार झाल्यानंतर त्यांनी मेघालयाच्या सरकारमध्येही काम केलं आहे. कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी अल्पसंख्याक हक्क, आदिवासी कल्याण आणि शिक्षण यासाठी काम केलं. मेघालयाच्या राजकारणात त्यांचं नाव आदराने घेतलं जातं.

 
शांतता आणि एकतेचा संदेश
मेघालयात कधीकधी आदिवासी-गैर आदिवासी किंवा धर्माधारित तणाव निर्माण होतात. अशा वेळी सय्यदुल्ला यांनी शिलॉंग ऑल फेथ फोरमच्या माध्यमातून शांततेची भूमिका घेतली. या फोरममध्ये ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू, शीख, बौद्ध आणि स्थानिक धार्मिक नेते एकत्र येतात. “धर्माने आपल्याला विभागू नये. आपण या मातीचे रक्षक आहोत,” असं सय्यदुल्ला म्हणतात.

 
ख्रिश्चन समाजाचे नेते रेव्ह वान्सूक थाबाह म्हणतात, “सय्यदुल्ला फक्त एकतेबद्दल बोलत नाहीत, तर ते जगतात.” सय्यदुल्ला यांनी मादक पदार्थविरोधी मोहिमा आणि लसीकरण जागृती यातही भाग घेतला आहे. 

खासिय्या संस्कृती आणि इस्लामचा समन्वय
सय्यदुल्ला यांचं जीवन खासिय्या मातृसत्ताक पद्धत आणि इस्लाम यांचा सुंदर संगम आहे. ते म्हणतात, “मी माझ्या आईचं आडनाव लावतो. माझी मुलं त्यांच्या आईचं आडनाव लावतात. इस्लाम मला आईचा आदर शिकवतो, आणि खासिय्या संस्कृती मला स्त्रीवंशाचा सन्मान शिकवते.” 

त्यांचे जुम्म्याचे प्रवचन कुराणच्या आयतींनी सुरू होतात, पण त्यात पर्यावरण, मुलींचं शिक्षण आणि शांतता यांचे आवाहन असतं. ते कट्टरता, भेदभाव आणि सांप्रदायिक बोलण्याविरुद्ध बोलतात. “कोणताही धर्म अन्यायाला परवानगी देत नाही,” असं त्यांचं मत आहे.

 सय्यदुल्ला यांचं वय ७० होऊनही ते थांबलेले नाहीत. ते अजूनही SMU च्या बैठका, शैक्षणिक कार्यक्रम आणि आंतरधर्मीय फोरम यात भाग घेतात. पण ते आपल्या कामाबद्दल विनम्र आहेत. “हे माझ्याबद्दल नाही. खासिय्या मुस्लिम आणि सर्व समाजाला मेघालयाच्या भविष्यात सन्मानाचं स्थान मिळावं, यासाठी आहे,” असं ते म्हणतात.

सय्यदुल्ला हे खासिय्या आणि मुस्लिम यांच्यातील दुवा नाहीत तर आजच्या काळात विभागल्या जाणाऱ्या समाजासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत.  

- झुमूर देब 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter