शाह अस्त हुसेन... हजरत इमाम हुसेन: परमेश्वराच्या लाडक्याचे लाडके

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 59 m ago
सलोख्याचे प्रतीक असलेला मोहरम आणि हुसेनी ब्राह्मण समुदायाची परंपरा
सलोख्याचे प्रतीक असलेला मोहरम आणि हुसेनी ब्राह्मण समुदायाची परंपरा

 

हाजी सय्यद सलमान चिश्ती

"श्रद्धावानांमध्ये असे पुरुष आहेत, त्यांनी अल्लाहाला दिलेले वचन पूर्ण केले." - (आयत २३ / सूरा अल-अहजाब)

मोहरमच्या १० तारखेला, हिजरी ६१ (इसवी सन ६८०) मध्ये जुलमी यजीदच्या सैन्याने हजरत इमाम हुसेन यांना शहीद केले. या शोकांतिकेने इस्लामिक जगाला हादरवून सोडले. प्रेषित (स.) आणि त्यांच्या कुटुंबावर प्रेम करणारे सर्व लोक आजही या घटनेचे स्मरण करतात. हजरत इमाम हुसेन यांचे हौतात्म्य, त्यांचा सत्य व न्यायासाठीचा लढा आणि इस्लामची विनम्रता आजही आठवली जाते आणि साजरी केली जाते.

या वर्षी २६ जून २०२६ रोजी अजमेर शरीफमध्ये 'आशुरा'चा दिवस पाळला जाईल. यात सहभागी होण्यासाठी देशभरातून भाविकांचा मोठा जनसागर अजमेर शरीफ दर्ग्याच्या पवित्र परिसरात दाखल होईल.

हजरत इमाम हुसेन इब्न अली इब्न अबी तालिब हे प्रेषित मुहम्मद (स.) यांचे नातू होते. तरुणपणी ते अतिशय धार्मिक, बुद्धिमान आणि देखणे होते. ते अगदी प्रेषितांसारखे (स.) दिसायचे, असे इतिहासकारांनी नमूद केले आहे. प्रेषितांचे (स.) आपल्या नातवावर खूप प्रेम होते. एका प्रसंगी प्रेषित (स.) नमाजचे नेतृत्व करत होते. ते 'सजदा'मध्ये गेले, तेव्हा लहानगे हजरत हुसेन त्यांच्या पाठीवर चढले. तो लहानगा मुलगा खाली उतरेपर्यंत इस्लामचे पवित्र प्रेषित (स.) बराच काळ त्याच स्थितीत राहिले.

दुसऱ्या एका प्रसंगी प्रेषित (स.) त्यांची मुलगी हजरत बीबी फातिमा (रझि.) यांच्या घराजवळून जात होते. तेव्हा त्यांना लहानग्या हजरत हुसेन यांच्या रडण्याचा आवाज आला. प्रेषित (स.) थांबले आणि घरात जाऊन म्हणाले, 'फातिमा, हुसेनला रडताना पाहून मला खूप वेदना होतात, हे तुला माहीत नाही का.'

एका प्रसिद्ध हदीसमध्ये, लाडके प्रेषित (स.) म्हणतात: "हुसेन माझ्यापासून आहे आणि मी हुसेनपासून आहे". हुसेन माझ्यासारखाच आहे, हुसेनचा मार्ग माझ्या मार्गासारखाच आहे, हुसेनचा संदेश माझा संदेश आहे, हुसेन माझ्यापासून आहे आणि मी हुसेनपासून आहे, असा याचा स्पष्ट अर्थ होतो.

हजरत इमाम हुसेन यांनी आपले वडील हजरत मौला अली यांच्याकडून ज्ञान मिळवले. त्यांना त्यांच्या वडिलांकडून सद्गुण आणि शूर चारित्र्य वारशाने मिळाले.

इतिहासाने आपल्याला काही शिकवले असेल, तर तो एक स्पष्ट संदेश आहे. 'हक्क' (सत्य) आणि स्वातंत्र्य या कुणी देण्याच्या गोष्टी नाहीत. 'हक्क' आणि स्वातंत्र्य या लोकांनी स्वतःहून मिळवण्याच्या गोष्टी आहेत. लोकांना जितके स्वातंत्र्य आणि 'हक्क' हवे असतात, तितके ते मिळवू शकतात.

शांतता, सत्य, न्याय आणि स्वातंत्र्याचा धर्म असलेला इस्लाम एका अशा काळात आणि ठिकाणी आला. तिथे जुलूम हाच नियम होता. दुर्बलांचा अपमान करण्यासाठी गुलामगिरीचे हत्यार वापरले जायचे आणि समस्या सोडवण्यासाठी हत्या हाच एक मार्ग होता. तो समाज आदिवासींच्या भांडणांनी आणि हिंसेने भडकला होता. केवळ चुकीच्या कुटुंबात जन्म घेतल्याचा अर्थ कायमस्वरूपी गुलामगिरी, अत्याचार आणि सर्व अधिकारांपासून वंचित राहणे, असा असायचा.

पवित्र प्रेषितांनी (स.) न्याय आणि समानता प्रस्थापित करण्यासाठी या चुकीच्या मार्गांचा निषेध करणारा आवाज उठवला. त्यांनी आपल्याला अनमोल मानवी देणगी दिली. ती म्हणजे आत्मपरीक्षणाचे सामूहिक कर्तव्य आणि स्वतःच्या विरुद्ध असले तरीही नेहमी सत्य बोलणे. 'हक्क'ला (सत्याला) साथ द्या आणि 'बातिल'ला (असत्याला) नाकारा. सत्य आणि न्यायाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण जुलमी आणि अत्याचाऱ्यांच्या विरोधात खंबीरपणे उभे राहा.

प्रेषितांनी (स.) आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या आणि त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचा धडा दिला. पवित्र कुराणनेही या गोष्टीवर वारंवार भर दिला आहे: जिंकण्यासाठी बहुमताची गरज नसते. सत्याचे रक्षण करण्यासाठी आणि त्यासाठी बलिदान देण्यासाठी तयार असलेल्या काही निष्ठावान लोकांचीच गरज असते. स्वतः जळून इतरांना प्रकाश देणाऱ्या मेणबत्तीचे उदाहरण बनणे महत्त्वाचे आहे. सत्याचा मार्ग उजळण्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले पाहिजे. सत्य आणि केवळ सत्यच तुम्हाला मुक्त करेल.

हा मोहरमचा महिना आहे आणि काही दिवसांतच 'आशुरा'चा दिवस येईल. या दिवशी प्रेषितांच्या लाडक्या नातवाने सर्वोच्च उदात्तता दाखवली आणि अंतिम बलिदान दिले. ते लाडके पवित्र प्रेषित (स.) यांचे नातू आहेत आणि 'अमीर उल मोमिनीन' हजरत अली व हजरत बीबी फातिमा अझ-जहरा (रझि.) यांचे सुपुत्र आहेत, यात अजिबात नवल नाही.

हजरत इमाम हुसेन यांच्या हौतात्म्यामागे एक उदात्त कारण होते. इस्लामला जुलमी यजीदच्या दुष्कृत्यांपासून आणि खोटेपणापासून वाचवणे, हे ते कारण होय. मोहरमचा पवित्र महिना लोकांना एका गोष्टीची आठवण करून देतो. प्रत्येकाने अत्याचार आणि जुलमाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे आणि शोषितांना मदत केली पाहिजे.

सत्य, न्याय, समानता आणि स्वातंत्र्य हे इस्लामचे मौल्यवान गुण आहेत. या मूल्यांसाठी तितक्याच मौल्यवान बलिदानाची गरज होती. हेच या हौतात्म्याचे सर्वोच्च महत्त्व आहे. हजरत इमाम हुसेन यांनी कर्तव्य आणि सन्मानाने धोक्याचा व संकटांचा मार्ग निवडला. ते त्यापासून कधीही मागे हटले नाहीत. मानवजातीला ज्ञात असलेल्या अत्यंत शौर्याने त्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली.

इस्लामच्या इतिहासात कर्बलाचे हुतात्मे हजरत इमाम हुसेन यांनी सुवर्ण अध्याय लिहिला. तेरा शतकांहून अधिक काळ लोटूनही हा अध्याय आजही सर्वत्र लोकांच्या मनात आणि हृदयात घुमत आहे.

कर्बलाची शोकांतिका इसवी सन ६८० मध्ये इराक मधील युफ्रेटिस नदीच्या तीरावर घडली. पण कर्बलाचा संदेश वैश्विक आहे आणि आजच्या हिंसाचार व अन्यायाच्या वातावरणात तो पूर्वीपेक्षा अधिक प्रासंगिक आहे. कर्बलाची शोकांतिका, त्याचा अहिंसक प्रतिकार आणि सर्वोच्च बलिदानाचा आत्मा महात्मा गांधींसारख्या नेत्यांसाठीही प्रेरणास्थान राहिला आहे. गांधीजींच्याच शब्दांत सांगायचे तर- "अत्याचार सहन करूनही विजयी कसे व्हावे, हे मी हुसेनकडून शिकलो."

संपूर्ण दक्षिण आशियात आणि विशेषतः भारतात मोहरमचे कार्यक्रम पाळले जातात. मुस्लिम आणि बिगर मुस्लिम दोघेही आदर आणि भक्तीने यातील विधी आणि प्रथांमध्ये सहभागी होतात. अशा प्रकारे, मोहरमच्या कार्यक्रमांनी इस्लामची ओळख दक्षिण आशियातील आंतरधर्मीय सामंजस्याचा मोठा दूत म्हणून करून दिली आहे.

इमाम हुसेन यांच्या महान बलिदानाचे स्मरण जगभरातील मुस्लिम करतात. पण भारतीय उपखंडात ते अत्यंत भावनिक तीव्रतेने पाळले जाते. भारतात पाळल्या जाणाऱ्या मोहरमच्या महिन्यातील सर्वात विशेष गोष्ट म्हणजे या विधींमध्ये हिंदूंचाही मोठा सहभाग असतो.

भारतात हिंदू, शीख, जैन आणि ख्रिश्चन समुदायातील अनेक ज्येष्ठ, बंधू आणि भगिनी मोठ्या भक्तीने मोहरमचे कार्यक्रम पाळतात. भारतातील हिंदू धर्माच्या सर्वात पवित्र शहरांपैकी एक आणि प्रसिद्ध घाट व वैदिक संतांचे शहर असलेल्या वाराणसीमध्ये मोहरम पाळण्याची परंपरा आहे. तिथे काही प्रतिष्ठित हिंदू कुटुंबे ताजिया शरीफच्या मिरवणुकीत सहभागी होतात.

लखनौ, अलाहाबाद, कानपूर, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, चेन्नई, अमरोहा, इंदूर, नागपूर, जयपूर, अजमेर शरीफ, भोपाळ आणि इतर प्रमुख शहरांमध्येही हे पाहायला मिळते. 'मजलिस'मध्ये (मोहरमच्या सभांमध्ये) सहभागी होणारे माझे स्वतःचे अनेक वैयक्तिक मित्र आहेत. ते ताजिया शरीफ (कर्बलातील हजरत इमाम हुसेन यांच्या समाधीच्या प्रतिकृती) बनवण्यातही मोठ्या उत्साहाने भाग घेतात.

हुसेनी ब्राह्मण समुदायही इमाम हुसेन यांच्याप्रती असलेल्या भक्ती आणि आदरासाठी प्रसिद्ध आहे. भारतात प्रामुख्याने पंजाब राज्यात असणाऱ्या या समुदायाला 'दत्त' म्हणूनही ओळखले जाते.

हुसेनी ब्राह्मणांची एक मोठी युद्ध परंपरा आहे. ते या परंपरेचा संबंध थेट कर्बलाच्या घटनेशी जोडतात. 'राहाब' नावाच्या त्यांच्या एका पूर्वजाने पंजाबपासून अरेबियापर्यंतचा प्रवास केला आणि तिथे इमाम हुसेन यांच्याशी जवळचे संबंध निर्माण केले, अशी त्यांची धारणा आहे.

कर्बलाच्या युद्धात राहाब यांनी जुलमी यजीदविरुद्ध इमाम हुसेन यांच्या सैन्यातून लढा दिला. त्यांचे पुत्रही त्यांच्यात सामील झाले आणि त्यापैकी बहुतांश मारले गेले. राहाब यांचे आपल्यावरील प्रेम पाहून इमाम हुसेन यांनी त्यांना 'सुलतान' किंवा राजा ही पदवी दिली आणि भारतात परत जाण्यास सांगितले. त्यांचे पूर्वज राहाब आणि इमाम हुसेन यांच्यातील या जवळच्या नात्यामुळेच हुसेनी ब्राह्मणांना हे नाव मिळाले. त्यांना त्यांच्या या पवित्र पूर्वजांच्या वारशाचा प्रचंड अभिमान वाटतो.

इतर धर्मांप्रमाणेच हिंदू धर्मही आपल्या अनुयायांना शोषित किंवा क्रूरता आणि अन्यायाचा सामना करणाऱ्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन करतो. भागवत पुराणानुसार, एखादा माणूस दुसऱ्या माणसाचा छळ करत असेल, तर तो कितीही मोठा भक्त असला तरी देव त्याच्यावर प्रसन्न होत नाही. इमाम हुसेन यांच्या समर्थनार्थ हिंदू राहाब दत्त यांनी दिलेले चिरंतर बलिदान एक मोठी गोष्ट सिद्ध करते. प्रत्येक समाजात शांतताप्रिय आणि देवाला घाबरणारे लोक असतात. त्यांचे धार्मिक किंवा भौगोलिक संबंध काहीही असोत, ते सत्य, तत्त्व आणि न्यायाच्या रक्षणासाठी नेहमीच उभे राहतात.

इमाम हुसेन यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाने उपखंडातील ब्रिटिश साम्राज्यवादाविरुद्धच्या संघर्षात मोठी भूमिका बजावली. ब्रिटिश आक्रमणाच्या वेळी, विविध हिंदू आणि मुस्लिम राज्यांमध्ये मोहरम गांभीर्याने पाळला जात असे. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात झाशीची राणी लक्ष्मीबाई एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होत्या. त्यादेखील इमाम हुसेन यांच्या भक्त होत्या. इमाम हुसेन यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती देणे पसंत केले. पण त्यांनी ब्रिटिशांचा ताबा कधीही मान्य केला नाही.

आजही मोठ्या संख्येने हिंदू बांधव इमाम हुसेन यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी मोहरम पाळतात. आंतरधर्मीय सलोख्याला चालना देण्यासाठी आणि मुस्लिमांप्रती एकता दाखवण्यासाठी ते यजीदच्या क्रूरतेचा निषेधही करतात.

जय सिंह, माथुर लखनवी आणि कंवर मोहिंदर सिंग बेदी यांसारख्या अनेक हिंदू कवींनीही आपल्या कवितांमधून इमाम हुसेन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

कंवर मोहिंदर सिंग बेदी 'सहर' यांनी हजरत इमाम हुसेन (अ.) यांच्या सर्वोच्च बलिदानाला हृदयस्पर्शी श्रद्धांजली वाहिली आहे:

लब पे जब शाह-ए-शहीदाँ तेरा नाम आता है

सामने साकी-ए-कौसर लिए जाम आता है

मुझ को भी अपनी गुलामी का शरफ दे दीजियो

खोटा सिक्का भी तो आका कभी काम आता है

(हे हुतात्म्यांच्या राजा, जेव्हा तुझे नाव माझ्या ओठांवर येते,

तेव्हा स्वर्गातील नदीचा साकी मला प्याला देत असल्याचे मला दिसते.

मलाही आपला गुलाम म्हणून सेवा करण्याचा मान द्या,

कारण खोटे नाणेही कधीतरी नक्कीच कामी येते.)

समकालीन तरुण अरब कवी आणि कवयित्रीही हजरत इमाम हुसेन (अ.) यांच्या सर्वोच्च बलिदाबद्दल लिहून आपली भक्ती व्यक्त करत आहेत.

सौदी अरेबियातील अशाच एका उत्तम कवयित्रीने आशुराच्या स्मरणात आणि इमाम हुसेन यांच्या हौतात्म्यावर एक कविता लिहिली आहे. जेद्दाह येथे राहणाऱ्या सौदी कवयित्री अलिसिया अली यांची ही कविता प्रेषित मुहम्मद यांच्या कुटुंबाचा सन्मान करते. खोट्या राजकीय विचारांविरुद्धच्या त्यांच्या संघर्षाची ती आपल्याला आठवण करून देते.

अलिसिया अली यांची 'झैनब्स साईग' (झैनबचा सुस्कारा):

वाळवंटाच्या आकाशातील घोंघावणारे वारे

निरव शांतता

मला मुलांचे रडणे ऐकू येते

एका तहानलेल्या छावणीत

झैनबचा सुस्कारा

माझा हुसेन, आमचा हुसेन

माझा हुसेन, आमचा हुसेन......

मानवतेला जागृत करणारा एक दैवी निर्णय

अतुलनीय गौरवाचे पुरुष आणि स्त्रिया

कर्बलाची एक महाकाव्य आणि भव्य कथा म्हणून कोरलेली नोंद

इतिहासावर हसनच्या हुसेनचा ठसा

माझा हुसेन, आमचा हुसेन

माझा हुसेन, आमचा हुसेन

अल्लामा मुहम्मद इक्बाल म्हणतात:

"इमाम हुसेन यांनी 'कयामत'च्या दिवसापर्यंत हुकूमशाही कायमची मुळासकट उखडून टाकली. त्यांनी स्वातंत्र्याच्या सुकलेल्या बागेला आपल्या रक्ताच्या उसळणाऱ्या लाटांनी पाणी दिले. खऱ्या अर्थाने त्यांनी झोपलेल्या मुस्लिम राष्ट्राला जागे केले. इमाम हुसेन यांचा उद्देश सांसारिक साम्राज्य मिळवण्याचा असता, तर त्यांनी मदिना ते कर्बला असा प्रवास केला नसता. सत्यासाठी इमाम हुसेन रक्त आणि धुळीत न्हाऊन निघाले. खऱ्या अर्थाने ते मुस्लिम धर्माचा (La ilaha illa Allah - अल्लाहाशिवाय दुसरा कोणीही देव नाही) मुख्य आधारस्तंभ बनले."

रोने वाला हूँ शहीद-ए-कर्बला के गम में मैं,

क्या दुरे मक्सद ना देंगे साकी-ए-कौसर मुझे।

(कर्बलाच्या हुतात्म्याच्या दुःखात अश्रू ढाळणारा मी एक आहे,

कौसरचा रक्षक (अल्लाह) मला याचे बक्षीस देणार नाही का?)

या हौतात्म्याने जगभरातील अनेक भाषांमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्याला जन्म दिला आहे. ही प्रक्रिया आजही सुरू आहे. मीर अनीस यांनी लिहिलेले मर्सिये (शोकगीते) हे याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यापैकी एका कवितेने गेल्या दोन शतकांपासून सर्वात लांब कवितेचा जागतिक विक्रम नोंदवला आहे.

सय्यद नसीर जहान यांनी लिहिलेल्या 'सलाम-ए-आखिर'चे हृदयस्पर्शी आणि भावपूर्ण पठण अनेकदा मर्सियाखानीच्या शेवटच्या दिवशी केले जाते -

बचे तो अगले बरस हम हैं और यह गम फिर है

जो चल बसे तो यह अपना सलाम-ए-आखिर है।

(जिवंत राहिलो तर पुढच्या वर्षी आपण असू आणि हे दुःख पुन्हा असेल,

पण जर मृत्यू आला, तर हाच आपला शेवटचा सलाम आहे.)

हजरत इमाम हुसेन यांच्या सन्मानार्थ सर्वाधिक पठण केली जाणारी आणि प्रसिद्ध पर्शियन कविता महान सूफी संत हजरत ख्वाजा सय्यद मोईनुद्दीन हसन चिश्ती (रह.) यांनी लिहिली होती:

शाह अस्त हुसेन, बादशाह अस्त हुसेन

दीन अस्त हुसेन, दीन पनाह अस्त हुसेन

सर दाद, ना दाद दस्त दर दस्त-ए-यजीद

हक-ए-बिन्ना ला इलाहा अस्त हुसेन

(हुसेन राजा आहे, राजांचा राजा हुसेन आहे. धर्म हुसेन आहे, धर्माचा रक्षक हुसेन आहे. त्याने स्वतःचे मस्तक दिले, पण यजीदच्या हातात आपला हात दिला नाही. खऱ्या अर्थाने, सत्य दुसरे काहीही नसून केवळ हुसेन आहे.)


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter