शोम्पी चक्रवर्ती पुरकायस्थ
पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातलं पांडुआ केवळ ऐतिहासिक शहर नाहीये. ते बंगालच्या सुफी वारशाचं खूप उत्कृष्ट केंद्र आहे. एकेकाळी बंगालची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेला हा भाग मध्ययुगीन काळात धार्मिक शिक्षण, आध्यात्मिक साधना आणि मानवतावादी सेवेचा अनोखा संगम म्हणून उदयाला आला. या इतिहासाच्या केंद्रस्थानी दोन महान सुफी संत होते. हजरत मखदूम शेख अलाउल हक पांडवी आणि त्यांचे सुपुत्र हजरत नूर कुतूबुल आलम ही त्यांची नावं आहेत. त्यांनी स्थापन केलेली खानकाह बंगालच्या आध्यात्मिक इतिहासातला खूप उज्ज्वल अध्याय आहे. चौदाव्या शतकात बंगालची सल्तनत भरभराटीला आली होती. त्याच काळात मध्य आशिया आणि पर्शियातल्या सुफी परंपरा बंगालच्या मातीत घट्ट रुजू लागल्या. याच काळात हजरत मखदूम शेख अलाउल हक पांडवी यांनी पांडुआला आध्यात्मिक भक्ती आणि मानवतावादी सेवेचं मोठं केंद्र बनवलं. त्यांनी स्थापन केलेली खानकाह धार्मिक उपासनेचं ठिकाण तर होतंच शिवाय ती शिक्षण, समाजसुधारणा, गरिबांची सेवा आणि मानवतावादी मूल्यांच्या जोपासनेसाठी समर्पित असलेली अपवादात्मक संस्था होती.
खानकाहमध्ये दररोज पवित्र कुराण, हदीस, इस्लामिक तत्त्वज्ञान, फिकह आणि नैतिक शिक्षणाचे धडे दिले जायचे. दूरवरून येणारे विद्यार्थी, दरवेशी आणि सामान्य लोकांना तिथे निवारा आणि शिक्षण मिळायचं. प्रवाशांची राहण्याची सोय केली जायची आणि गरजूंना अन्न दिलं जायचं. मानवतावादी सेवा, नम्रता, करुणा आणि आत्मशुद्धी ही सुफीवादाची मुख्य तत्त्वं आहेत. खानकाहच्या प्रत्येक उपक्रमात या तत्त्वांचं सुंदर दर्शन घडायचं. हजरत नूर कुतूबुल आलम यांनी त्यांच्या वडिलांनी रचलेला हा पाया अधिक भक्कम केला. ते केवळ सुफी संत नव्हते. मध्ययुगीन बंगालमधल्या प्रभावशाली इस्लामिक विचारवंत आणि सामाजिक नेत्यांपैकी ते होते. त्यांचा आध्यात्मिक प्रभाव बंगालच्या सीमा ओलांडून उत्तर भारत आणि तत्कालीन मुस्लिम जगाच्या विविध भागांपर्यंत पोहोचला होता. इतिहासकारांच्या मते, त्यांची खानकाह ज्ञान, सामाजिक संघटन आणि मानवतावादी उपक्रमांच्या प्रमुख केंद्रांपैकी बनली.

ऐतिहासिक साधनांवरून ही बाब अगदी स्पष्ट होते. बंगालचे सुलतान या सुफी संतांचा खूप आदर करायचे आणि त्यांच्या मतांना खूप महत्त्व द्यायचे. पण हे संत स्वतः कधीही सत्ताधारी व्यवस्थेचा भाग बनले नाहीत. त्याऐवजी ते सामान्य लोकांमध्ये राहिले आणि त्यांनी न्याय, प्रामाणिकपणा व मानवतेच्या आदर्शांचा मोठा प्रसार केला. याच कारणामुळे त्यांची खानकाह समाजातल्या सर्व स्तरांतल्या लोकांमध्ये तितकीच आदरणीय आणि स्वीकारार्ह बनली. आजही पांडुआ इथल्या हजरत मखदूम शेख अलाउल हक पांडवी आणि हजरत नूर कुतूबुल आलम यांच्या दर्गा व खानकाहमध्ये दररोज असंख्य भाविक आणि पर्यटक येतात. मुस्लिमांसोबत इतर धर्मांचे अनुयायीदेखील या पवित्र स्थळाला आवर्जून भेट देतात. काही लोक प्रार्थना करायला येतात, काही नवस फेडायला येतात. तर काही लोक या वारसा स्थळाच्या ऐतिहासिक आणि वास्तूविषयक महत्त्वामुळे तिकडे आकर्षित होतात. दरवर्षी उरूस शरीफच्या निमित्ताने पांडुआ मोठ्या मेळाव्याचं ठिकाण बनतं. या सोहळ्यात हजारो लोक खूप उत्साहाने सहभागी होतात.
पांडुआमधल्या या सुफी केंद्रांचं महत्त्व केवळ त्यांच्या धार्मिक महत्त्वापुरतं मर्यादित नाहीये. जवळच असलेल्या एकलाखी मकबरा, अदिना मशीद आणि इतर मध्ययुगीन वास्तूंसोबत त्यांचा खूप जवळचा संबंध आहे. परिणामी, पांडुआ केवळ बंगालच्या राजकीय इतिहासाचा साक्षीदार नाहीये. ते सुफी तत्त्वज्ञान आणि बहुलवादी सांस्कृतिक परंपरेचा अमूल्य ठेवा बनलंय. या ऐतिहासिक खानकाहमध्ये आजही धार्मिक उपक्रम सुरू आहेत. पण या ठिकाणची अनेक प्राचीन कागदपत्रं, हस्तलिखितं आणि मौखिक इतिहास अद्याप योग्य प्रकारे जतन केले गेले नाहीत, असं इतिहासकारांचं मत आहे. पद्धतशीर संशोधन, वैज्ञानिक संवर्धन आणि पर्यटनाला पूरक अशा पायाभूत सुविधांचा विकास करणं खूप आवश्यक आहे. यातून हा सुफी वारसा देशभरातल्या आणि परदेशातल्या संशोधक व इतिहासप्रेमींमध्ये अधिक चांगल्या प्रकारे पोहोचू शकेल.
हेही वाचा: फुरफुरा शरीफ: बंगालच्या सुफी वारशाचं आध्यात्मिक केंद्र
आजचं जग खूप विभागलेलं आणि संघर्षमय आहे. अशा जगात लोकांची मनं जिंकण्याची सर्वात मोठी ताकद प्रेम, ज्ञान, करुणा आणि सेवेत दडलेली आहे, याची मोठी आठवण पांडुआची खानकाह करून देते. सातशेहून अधिक वर्षांपासून हजरत मखदूम शेख अलाउल हक पांडवी (र.अ.) आणि हजरत नूर कुतूबुल आलम (र.अ.) यांच्या शिकवणीने बंगालच्या समाजात सलोखा व मानवतेचं बीज पेरलंय. त्यांची ही शिकवण आजही तितकीच प्रासंगिक आणि मार्गदर्शक आहे.

म्हणूनच मालदा इथली पांडुआची खानकाह बंगालचा इतिहास, सुफी तत्त्वज्ञान, शिक्षण, मानवतावादी सेवा आणि जातीय सलोख्याचं चिरंतन प्रतीक आहे. अनेक पिढ्यांतल्या लोकांची मनं उजळवण्याचं महान काम हे ठिकाण सतत करतंय.