आसाममधील मान्सूनचे पूर अनेकांसाठी संकट ठरतात. दरवर्षी अनेक लोक घरं आणि आपले पशुधन गमावतात. परंतु काहींसाठी हे पूर आशा आणि संधी घेऊन येतात. दक्षिण आसाममधील श्रीभूमी जिल्हा असाच एक भाग. इथे शेती हा मुख्य व्यवसाय. पण जिल्ह्याचा बराचसा भाग वर्षभर पाण्याखाली असतो. सतत येणारे पूर स्थानिकांच्या जीवनात हाहाकार माजवतात. परंतु अलेखरगुल गावातील नझरूल हक यांनी या संकटाचे रूपांतर संधीत केले. बदरपूर शहरापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात नझरूल यांनी मत्स्यपालनातून क्रांती घडवली. ते स्वतः स्वयंपूर्ण झालेच, पण गावातील प्रत्येक कुटुंबाला आत्मनिर्भर बनवले.
‘आवाज - द व्हॉइस’सोबत बोलताना नझरूल यांनी सांगितले की, “माझ्या गावात उत्पन्नाची फारशी साधने नाहीत. लोक साधी शेती करतात. मीही सुरुवातीला शेतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचो. पण इथली शेती पाण्याखाली राहिल्याने फारसं उत्पादन मिळत नव्हतं. मग मी जमिनीचा दुसऱ्या पद्धतीने उपयोग करण्याचा विचार केला. इथे माशांची बाजारपेठ आधीपासून तयार असल्याने माझ्या मनात मत्स्यपालनाचा विचार आला."
नझरूल यांचे वडील शेतकरी होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. परंतु काहीतरी वेगळे करण्याचे स्वप्न त्यांनी लहानपणापासून पाहिले होते. सुरुवातीला त्यांनी १०,००० रुपयांचे कर्ज घेतले. त्यात त्यांनी मत्स्यपालनाचा व्यवसाय सुरू केला. ते सुरू असताना कर्जाची परतफेड वेळेत केली. यामुळे त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली.
नझरूल सांगतात, “मी २००० साली मत्स्यपालनाला सुरुवात केली. प्रामाणिकपणे आणि मेहनतीने व्यवसाय केला तर स्वयंपूर्ण होऊ शकतो असा विश्वास मला होता. २००३ मध्ये राज्य सरकारच्या ARIASP योजनेतून बँकेकडून कर्ज मिळालं. सुरुवातीला माझ्या एक हेक्टर जमिनीवर ५ ते ७ क्विंटल मासे उत्पादन करायचो. आता स्वतःच्या आणि भाड्याच्या १०० हेक्टर जमिनीवर ६ ते ७ टन मासे उत्पादन करतो."
नझरूल यांनी पदवी घेतल्यानंतर सरकारी नोकरीची वाट न पाहता मत्स्यपालनाला सुरुवात केली. यामध्ये स्वतः परिपूर्ण झाले. गावातील बेरोजगार तरुणांमध्ये मत्स्यपालनाविषयी जागृती केली. परिणामी गावातील ३०० कुटुंबे मासेपालन व्यवसायाशी जोडली गेली. बँकेकडून आर्थिक मदत मिळवण्यासाठी नझरूल यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बदरपूर शाखेशी संपर्क साधला. बँकेने त्यांना अनेक सुविधा दिल्या. नंतर बँकेने त्यांच्या गावाला ‘एसबीआय फिशरी व्हिलेज’ असं नाव देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला.
नझरूल म्हणतात, “आसाममध्ये मत्स्यपालन व्यवसायाला खूप वाव आहे. मी स्वतः मत्स्यपालन करतो. माझ्यासोबत अनेक तरुण काम करतात. मत्स्यपालन हा फायदेशीर व्यवसाय आहे. फक्त त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. आसाममध्ये अनेक ठिकाणी जमीन वर्षभर पाण्याखाली असते. अशी जमीन शेतीसाठी योग्य नसते. हीच जमीन मत्स्यपालनासाठी वापरली तर मोठा नफा मिळू शकतो. आपलं राज्य बाहेरून मासे आयात करतं. स्थानिक मासेपालकांनी मासे पुरवले तर तरुणांना फायदा होईल आणि राज्य मत्स्यपालनात पुढे जाईल."
नझरूल दरवर्षी मासेपालनातून चांगले उत्पन्न मिळवतात. रोहू, कटला, सिंगही, मागुर, कॉमन कार्प, कासव, पाबदा, कोय, रुपचंदा यासारखे मासे ते पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवतात. मत्स्यपालनामध्ये ते कोणत्याही रासायनिक पदार्थांचा वापर करत नाही. आपल्या माशांचा पुरवठा तो असममधील विविध भागांत आणि मेघालय, त्रिपुरा, मिझोरामसारख्या ईशान्येकडील राज्यांत करतात.
त्यांच्या शेतीविषयी सांगताना नझरूल म्हणतात, “मासेपालन हा फायदेशीर व्यवसाय आहे. माझ्या गावातील प्रत्येकजण यात सामील आहे. काही वर्षांपूर्वी इथल्या लोकांना मत्स्यपालनात रस नव्हता. आता अनेक शिकलेले तरुण या व्यवसायात येत आहेत. ही राज्यासाठी चांगली बाब आहे. मासेपालनाने लोक स्वयंपूर्ण होऊ शकतात. फक्त आपला दृष्टिकोन बदलायला हवा. आपल्या आसपासच्या जमिनीचा उपयोग करायला हवा. मी तरुणांना वैज्ञानिक पद्धतीने मत्स्यपालनासाठी प्रोत्साहन देतो. ही शेती करताना मी बँकेकडून कर्ज घेतलं. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. रिसर्क्युलेटिंग एक्वाकल्चर सिस्टीम, ऑक्सिजन एरेटर्स आणि माशांच्या रोगांसाठी विशेष औषधांची व्यवस्था केली."
करिमगंजचे नझरूल हक मत्स्यपालनात स्वयंपूर्ण होऊन अनेकांसाठी प्रेरणा बनले आहेत. मत्स्यपालन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मार्च २०२५ मध्ये त्यांना आसामचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान ‘आसाम गौरव पुरस्कार’ मिळाला. हैदराबादच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत राष्ट्रीय मत्स्यविकास मंडळाने (NFDB) त्यांना पुरस्कृत केले गेले.
नुकतेच गुजरातमधील अहमदाबादच्या सायन्स सिटीमध्ये केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी जागतिक मत्स्यदिनी नझरूल यांना पुरस्कार प्रदान केला. यापूर्वी त्यांना जिल्हास्तरावर प्रगतिशील मत्स्य व्यवसायिक म्हणून गौरवण्यात आले होते. भविष्यात नझरूल मत्स्यपालन व्यवसायाचा विस्तार करणार आहेत. मासे बियाणे उत्पादन कारखाना उभारण्याचे त्यांचे स्वप्न आहे.
- मुन्नी बेगम