'ऑपरेशन सिंदूर' च्या माध्यमातून भारताने दहशतवादाच्या विरोधातील धोरण जगासमोर मांडले आहे, असे सांगतानाच जे लोक भारतीयांचे रक्त सांडतात, त्यांच्यासाठी जगातील कोणतीही जागा सुरक्षित नाही, असा सज्जड इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पाकिस्तानचे नाव न घेता दिला. श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्या ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
अलीकडील काळात जगाने भारताची क्षमता पाहिली आहे. राष्ट्रहिताच्या दृष्टीने जे योग्य आहे, अशीच पावले उचलणारा आजचा भारत आहे, असे सांगत मोदी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. थोडीही छेडछाड करण्यात आली तर शत्रूला सोडले जाणार नाही.
संरक्षण गरजांसाठी विदेशावर असलेली निर्भरता मागील काही काळात देशाने कमी केली आहे. 'ऑपरेशन सिंदूर 'दरम्यान याची प्रचिती सर्वांना आली असेल. आमच्या जवानांनी 'मेड इन इंडिया' शस्त्रांचा वापर करत केवळ २२ मिनिटांत शत्रूला गुडघे टेकायला भाग पाडले. भविष्यात भारतीय बनावटीची शस्त्रास्त्रे जगात नाव कमावतील, असा आपला विश्वास आहे, असे मोदी म्हणाले.
ऐतिहासिक ठेवा
श्री नारायण गुरूंचे सिद्धांत मानवतेसाठी ऐतिहासिक ठेवा असल्याचे मोदी यांनी नमूद केले. जे लोक देश आणि समाजसेवेचा संकल्प घेऊन काम करतात, त्यांच्यासाठी श्री नारायण गुरू प्रकाश स्तंभासारखे आहेत. वंचित आणि शोषित समाजासाठी काम करत असताना आपण नेहमी गुरुदेवांची आठवण काढतो. श्री नारायण गुरूंनी महिला सशक्तीकरणावर भर दिला. स्वातंत्र्याच्या दीर्घ काळानंतरही अनेक क्षेत्रांचे दरवाजे महिलांसाठी बंद होते. हे दरवाजे आता उघडण्यात आले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.