जावेद अख्तर/ कोलकाता
देशभरात धर्माच्या नावावर फूट पाडण्याच्या बातम्या येणे सामान्य झाले असताना पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील फरखा गावाने देशासमोर हिंदू-मुस्लिम ऐक्याचे नवे उदाहरण समोर ठेवले आहे. येत्या २७ जून रोजी होणाऱ्या भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेसाठी येथील तीन मुस्लिम तरुण—मरसलीन शेख, असीम खान आणि आमिर अल शेख—यांनी मिळून बनवलेल्या लोखंडी रथाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामुळे हा केवळ धार्मिक सोहळा राहिला नाही, तर भारताच्या गंगा-जमुनी संस्कृतीचे जिवंत उदाहरण म्हणून याकडे पाहिले जात आहे.
रथयात्रेची परंपरा आणि सौहार्दाचे नवे पाऊल
फरखा ब्लॉकमधील निशिंद्र ठाकुर गावात रथयात्रेची परंपरा अनेक वर्षे जुनी आहे. काही काळ ही परंपरा खंडित झाली होती. मागील वर्षी ती पुन्हा सुरू झाली. यंदा गावकऱ्यांनी ठरवले की भगवान जगन्नाथ लोखंडी रथात विराजमान होतील. या रथाच्या बांधकामाची जबाबदारी शिक्षिका तनुश्री मिश्रा यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यांनी गावातील अनेक हिंदू दुकानांशी संपर्क साधला. पण कोणीही रथ बनवण्यास उत्सुकता दाखवली नाही. अखेरीस त्यांनी मरसलीन शेख यांच्या ग्रिल वेल्डिंगच्या दुकानाकडे धाव घेतली.
मरसलीन यांनी असीम खान आणि आमिर अल शेख यांच्यासोबत मिळून अवघ्या अडीच दिवसांत ६ फूट उंच आणि अडीच फूट लांब, ५५ किलो वजनाचा लोखंडी रथ तयार केला. त्यामुळे हा रथ केवळ धार्मिकच नव्हे तर भारतीय समाजातील माणुसकी आणि बंधुभावाचे प्रतीकही बनला आहे.
आमचा रथ गंगा-जमुनी संस्कृती आणि बंधुभावाचा प्रतीक
रथ निर्माते मरसलीन सांगतात, “इथे आम्ही सगळे एकमेकांच्या सणांत सहभागी होतो. हा रथ केवळ भगवान जगन्नाथ यांचा नाही, तर आपल्या मिश्र संस्कृतीचा आणि बंधुभावाचा प्रतीक आहे.” असीम आणि आमिर म्हणतात की गावात ईद असो वा दुर्गा पूजा, मुहर्रम असो वा दिवाळी—सर्व सण एकत्र साजरे होतात.
या सोहळ्याच्या संयोजिका तनुश्री मिश्रा भावूक होऊन सांगतात, “जेव्हा कोणताही हिंदू रथ बनवण्यास तयार झाला नाही, तेव्हा या मुस्लिम भावांनी मनापासून हा रथ तयार केला. मला वाटते की स्वतः भगवान जगन्नाथ यांनीच त्यांच्या हातून हा रथ बनवून घेतला.”
गावकरी सांगतात की येथे प्रत्येक धर्म, प्रत्येक सणात सर्वांचा सहभाग असतो. हे सहिष्णु वातावरण कोणत्याही राजकीय प्रचाराचा परिणाम नाही, तर आमची मेहनत आणि परस्पर सन्मान यांचे फळ आहे,असे ते ठणकावून सांगतात.
रथयात्रेची ऐतिहासिक परंपरा
रथयात्रा हा भारतातील प्रमुख धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. याचे सर्वात मोठे आयोजन ओडिशातील पुरी येथे होते. यंदा हा उत्सव शुक्रवारी २७ जूनरोजी साजरा होईल. कोलकात्यात मुख्यमंत्री ममता बनर्जी रथाची दोरी खेचून या सोहळ्याचा शुभारंभ करतील
फरखा गावाने देशाला दिला सौहार्दाचा संदेश
फरखा गावातील ही घटना सिद्ध करते की भारताचा आत्मा आजही जिवंत आहे. गंगा-जमुनी संस्कृती केवळ पुस्तकांपुरती मर्यादित नाही, तर गावच्या गल्ल्यांमध्ये, नात्यांमध्ये आणि वागणुकीतून ती दृश्य स्वरुपात दिसते. धर्माच्या भिंतींपेक्षा मनांचे बंध दृढ असतात हेच या उदाहरणाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
ज्या वेळी राजकीय शक्ती समाजाला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या वेळी हे छोटेसे गाव प्रेम आणि धार्मिक सौहार्दाचे आदर्श बनून देशाला रस्ता दाखवत आहे. आणि सांगतो आहे, हाच खरा भारत आहे—जो द्वेषाची नव्हे तर प्रेमाची पेरणी करतो.