चीनमधील हिंगदाओ शहरात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) दोन दिवसीय परिषदेत सहभागी होण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे चीन दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी ते दहशतवाद संपवण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही करणार आहेत. ही बैठक चीनच्या किंगदाओ शहरात २५-२६ जूनला होत आहे.
पाकिस्तानच्या पाठबळाने होणाऱ्या सीमापार दहशतवादाविरुद्ध राजनाथ सिंग आक्रमक पवित्रा घेणार आहेत. एससीओने दहशतवाद रोखण्यासाठी कठोर पावलं उचलावीत, असं त्यांचं मत आहे. किंगदाओ या चीनच्या शानदोंग प्रांतातील बंदर शहरात होणाऱ्या या बैठकीत प्रादेशिक सुरक्षा संरचनेवर सखोल चर्चा होईल.
एक्सवर पोस्ट करत राजनाथ सिंग म्हणाले, “आज, २५ जूनला मी किंगदाओ, चीनला जात आहे. एससीओ संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होईन. विविध देशांच्या संरक्षणमंत्र्यांशी अनेक मुद्द्यांवर चर्चा होईल. जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी भारताची दृष्टी मांडेन. दहशतवाद संपवण्यासाठी एकजुटीच्या आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचं आवाहन करेन.”
पहलगाम येथील क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं. या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ महत्त्वाच्या दहशतवादी पायाभूत सुविधांवर हवाई हल्ले केले गेले.
लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) २०२० मध्ये सुरू झालेल्या लष्करी तणावानंतर भारताच्या केंद्रीय मंत्र्याचा हा पहिलाच चीन दौरा आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या एससीओच्या राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांच्या बैठकीसाठी चीनमध्ये आहेत.
अधिकृत माहितीनुसार, राजनाथ सिंग एससीओच्या मूळ तत्त्वांना आणि उद्दिष्टांना भारताचं पूर्ण समर्थन असल्याचं पुन्हा सांगतील. प्रादेशिक सहकार्य वाढवून दहशतवाद आणि अतिरेकी विचारसरणीविरुद्ध लढण्याची भारताची दृष्टी ते मांडतील.
ते शांतता आणि स्थैर्याला धोका पोहोचवणाऱ्या गोष्टींविरुद्ध एकजुटीने आणि समन्वयाने कारवाईचं महत्त्व अधोरेखित करतील. तसेच व्यापार, आर्थिक सहकार्य आणि एससीओ अंतर्गत संपर्क वाढवण्याची गरजही ते व्यक्त करतील. प्लेनरी सत्राव्यतिरिक्त, राजनाथ सिंग चीन आणि रशियासह अनेक देशांच्या संरक्षणमंत्र्यांशी द्विपक्षीय बैठकाही करणार आहेत.
चीन सध्या एससीओचं अध्यक्षपद भूषवत आहे. २०२०च्या गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षानंतर भारत-चीन संबंध तणावपूर्ण राहिले. मात्र, अलीकडील कूटनीतिक प्रयत्नांनी संबंध सुधारण्याचा मार्ग मोकळा केला. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये डेमचोक आणि देपसांग येथील माघारीनंतर लष्करी तणाव अधिकृतपणे संपला.
डिसेंबरमध्ये डोवाल यांनी बीजिंगला भेट दिली. त्यांनी चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी विशेष प्रतिनिधी (एसआर) यंत्रणेअंतर्गत चर्चा केली. ही भेट संवाद पुन्हा सुरू करण्यासाठी महत्त्वाची ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात २३ ऑक्टोबरला कझान येथे झालेल्या बैठकीत एसआर यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला.