सैनिकांना सत्कार करताना मुस्लीम बांधव.
पुणे : 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्' यांच्या घोषणेने दुमदुमून गेलेला परिसर... सैनिकांवर होणारी पुष्पवृष्टी... अभिमानाने फडकणारा तिरंगा... अशा देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात पुण्यात सद्भावना रॅली काढण्यात आली. निमित्त होते गणेश उत्सवाचे. शहराच्या पूर्व भागात हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत दिव्यांग सैनिकांसमवेत सद्भावना रॅली काढली. यावेळी राष्ट्रभक्तीचा आणि एकतेचा संदेशही देण्यात आला. देशसेवा करताना अपंगत्व आलेल्या सैनिकांप्रती यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी उपस्थितांनी दिव्यांग सैनिक आणि पोलिस यांच्या समवेत देशभक्तीचा व हिंदू-मुस्लिम एकतेचा नारा दिला. शहराच्या पूर्व भागातील चौका-चौकांत महिलांनी केलेले औक्षण, फुलांची झालेली उधळण आणि भारतमातेचा जयघोष ऐकून सैनिकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. गुरुवार पेठेतील मशिदीपासून रॅलीला प्रारंभ होऊन शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ येथे समारोप झाला.
या उपक्रमाचे कौतुक करताना पोलीस उप आयुक्त (डीसीपी) संदीपसिंह गिल म्हणाले, “हा कार्यक्रम मागील २२ वर्षे सुरु असणे ही कौतुकास्पद गोष्ट आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकोप्याचा संदेश दिला जात आहे. धार्मिक सौहार्द जपले जात आहे. आणि आपण सर्व एक आहोत, ही भावना निर्माण होते. हे खरोखरच कौतुकास्पद आहे.”
सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ अभिमान व्यक्त करत म्हणाले, “सामाजिक तणावावर उत्तर म्हणजे जवानांचा सन्मान आणि 'भारत माता की जय' हा जयघोष! मातृभूमीविषयीचे प्रेम प्रत्येकाने व्यक्त केले पाहिजे. ज्या जवानांनी देशासाठी सर्वस्व अर्पण केले, त्यांचा अभिमान वाटतो.” तर, शिरीष मोहिते म्हणाले, “स्वतःच्या प्राणाचे बलिदान देऊन सैनिक आपली रक्षा करतात. त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, अपंगत्व आले असूनही त्यांच्या ठायी असलेल्या जिद्दीला सलाम करण्यासाठी परिसरातील हिंदू-मुस्लीमांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट आणि खडक पोलिस स्टेशन यांच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नबीसाब नदाफ, जितेंद्र कुमार, प्रवेश कुमार तिवारी, गणेशाचार्य प्रकाश, रीता कटरे, हरिओम, प्रवीण कुमार मिश्रा, सादिक अरुण कुमार, उमाकांत भोसले, आर. एस. कावरे, करसनसिंह शेखावत, सुजीत कुमार, दिनेश देवरे, विनोद पथोडिया यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक घाटे यांनी केले. परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल, कर्नल वसंत बल्लेवार, क्विन्स मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट खडकीचे कॅप्टन डॉ. चंद्रशेखर चितळे, शिरीष मोहिते, विनायक घाटे, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने, पोलीस निरीक्षक संपतराव राऊत, सह पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, गिरीजा म्हस्के, पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे, नामदेव गायकवाड, कुलदीप पवार, सचिन माळी, सेवा मित्र मंडळ अध्यक्ष गणेश सांगळे, विक्रांत मोहिते, निलेश रसाळ, अमर लांडे, सचिन ससाने, उमेश कांबळे, अमर थोपटे, अभिषेक पायगुडे, लाला परदेशी, राजेंद्र काळभोर, अजय पंडित आदी उपस्थित होते.