भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी सध्या आयसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांविरूद्ध शड्डू ठोकतात. भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करत नाही अन् पाकिस्तानला भारतात येण्याची परवानगी नाही. त्यामुळे या दोन देशांमध्ये द्विपक्षीय मालिका होत नाहीत.
दरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्माने एक मोठं वक्तव्य करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रोहित शर्माने तो पाकिस्तानविरूद्ध कसोटी सामने खेळण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे. रोहितला इतर कोणत्या गोष्टींची चिंता नाही त्याला फक्त बॅट आणि बॉलमध्ये चांगले द्वंद्व झालेलं पाहायचं आहे.
रोहित शर्मा म्हणाला की, 'पाकिस्तानविरूद्ध कसोटी सामने खेळण्यास मी तयार आहे. आम्ही त्यांच्यासोबत आयसीसी स्पर्धेत खेळत आहोतच. दोन्ही संघात कसोटीत चांगली लढत होईल. मला इतर कोणत्या गोष्टींची चिंता नाही. मला फक्त बॅट आणि बॉलमध्ये चांगले द्वंद्व झाललं हवं आहे.'
भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटचा कसोटी सामना हा 2007 मध्ये झाला होता. त्यानंतर दोन्ही देशातील राजकीय संबंध हे बिघडले अन् त्यानंतर हे दोन्ही शेजारी देश आयसीसी स्पर्धेतच एकमेकांसमोर उभे ठाकत आहेत. 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कपच्या आयोजनावरून वाद झाले होते.
मात्र पाकिस्तानचा संघ वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात दाखल झाला. त्यानंतर आता पाकिस्तान पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करणार आहे. त्यामुळे आशिया कपसारखीच परिस्थीत आताही निर्माण झाली आहे.