जम्मू आणि काश्मीरमधील क्रिकेटचा विकास आणि प्रगती निवडून येणाऱ्या संघटनेकडूनच होऊ शकतो. हंगामी समिती क्रिकेटला पुढे घेऊन जाऊ शकत नाही, असे स्पष्ट मत माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन यांनी व्यक्त केले आहे.
बारामुला जिल्ह्याच्या भेटीदरम्यान जम्मू आणि काश्मीरमधील क्रिकेट परिस्थितीवर भाष्य करताना अझहरुद्दीन म्हणाले, प्रत्येक वेळी संघटना किंवा प्रशासन हंगामी स्वरूपात चालवता येत नाही. निवडणुका झाल्याशिवाय विकास होणार नाही. केवळ निवडून आलेली संस्था खेळाचा योग्य दिशेने विकास करू शकते.
पायाभूत सुविधा हा सर्वात मोठा अडथळा आहे. जोपर्यंत योग्य मैदान नाही, तोपर्यंत प्रायोजक पुढे येणार नाहीत आणि लोक क्रिकेटला गांभीर्याने घेणार नाहीत. मुले काही काळ खेळतात, पण सुविधा नसल्यामुळे सोडून देतात. इथे मोठी गुणवत्ता आहे, पण अशा गुणवत्तेला मार्गदर्शन आणि योग्य प्रशिक्षणाची गरज आहे, असे अझहरुद्दीन यांनी नमूद केले.
अझहरुद्दीन यांनी, टर्फ विकेट असलेली आधुनिक स्टेडियम्स, प्रशिक्षण शिबिरे आणि स्पर्धात्मक सामने यांचे महत्त्व अधोरेखित केले.