पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडातील जी-७ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर सविस्तर चर्चा केली. अर्धा तास चाललेल्या या संभाषणात मोदींनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली. भारताने पाकिस्तानसोबतच्या मुद्द्यांवर कधीही मध्यस्थी स्वीकारली नाही आणि भविष्यातही स्वीकारणार नाही, असा ठाम संदेश त्यांनी दिला, अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी बुधवारी दिली.
मिस्री यांनी सांगितलं, “पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना स्पष्ट केलं की या संपूर्ण प्रकरणात भारत-अमेरिका व्यापारी करार किंवा अमेरिकेच्या मध्यस्थीचे मुद्दे कधीच चर्चेत नव्हते. सैन्य कारवाई थांबवण्याची चर्चा भारत आणि पाकिस्तान यांच्या लष्करांद्वारे थेट झाली. पाकिस्तानच्या विनंतीवरून ही कारवाई थांबली.” त्यांनी पुढे नमूद केलं, “मोदींनी ठामपणे सांगितलं की भारत मध्यस्थी कधीच स्वीकारत नाही, सध्या स्वीकारत नाही आणि भविष्यातही स्वीकारणार नाही. यावर भारतात संपूर्ण राजकीय एकमत आहे.”
या संभाषणापूर्वी ट्रम्प यांनी वारंवार दावा केला होता की त्यांनी व्यापारी कराराच्या माध्यमातून भारत-पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यात मध्यस्थी केली. पण भारताने हा दावा स्पष्टपणे फेटाळला. जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित सर्व मुद्दे भारत आणि पाकिस्तान थेट हाताळतील, अशी भारताची नेहमीची भूमिका आहे.
मिस्री यांनी सांगितलं की ट्रम्प यांनी मोदींनी मांडलेले मुद्दे समजून घेतले. भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला त्यांनी पाठिंबा दर्शवला. ट्रम्प यांनी मोदींना कॅनडाहून परतताना अमेरिकेला भेट देण्याचं निमंत्रण दिलं. पण पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मोदींनी ते स्वीकारलं नाही.
मिस्री यांनी पुढे सांगितलं, “मोदी आणि ट्रम्प यांची भेट जी-७ परिषदेच्या दरम्यान होणार होती. पण ट्रम्प यांना लवकर अमेरिकेला परतावं लागलं, त्यामुळे ती भेट होऊ शकली नाही. ट्रम्प यांच्या विनंतीवरून दोन्ही नेत्यांनी आज फोनवर चर्चा केली. २२ एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी मोदींना फोन करून शोक व्यक्त केला होता. त्यांनी दहशतवादविरोधात पाठिंबा दिला होता. तेव्हापासून ही त्यांची पहिली चर्चा होती.”
मोदींनी ट्रम्प यांना ऑपरेशन सिंदूरबाबत तपशीलवार माहिती दिली. “२२ एप्रिलनंतर भारताने जगाला दहशतवादविरोधातील आपला निर्धार सांगितला होता. ६-७ मे च्या रात्री भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यांवरच हल्ले केले. भारताची कारवाई मोजकी, अचूक आणि तणाव वाढवणारी नव्हती”, असं मोदींनी ट्रम्प यांना सांगितलं. त्यांनी “गोळीचा जवाब गोळ्याने” ही भूमिका पुन्हा अधोरेखित केली.
मिस्री यांनी नमूद केलं, “९ मे च्या रात्री अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष व्हान्स यांनी मोदींना फोन केला. त्यांनी सांगितलं की पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करू शकतो. मोदींनी त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं की असं झाल्यास भारत आणखी मोठा प्रत्युत्तर देईल. ९-१० मे च्या रात्री पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानच्या लष्कराला मोठं नुकसान झालं. त्यांच्या हवाई तळ अकार्यक्षम झाले. भारताच्या या तीव्र प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानने सैन्य कारवाई थांबवण्याची विनंती केली.”
मोदींनी ट्रम्प यांना सांगितलं की भारत आता दहशतवादाला प्रॉक्सी युद्ध मानत नाही. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू आहे. १० मे रोजी भारत-पाकिस्तानमधील सैन्य कारवाई थांबली. ही कारवाई २२ एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात सुरू झाली होती. या हल्ल्यात २६ नागरिक ठार झाले.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी छावण्या उद्ध्वस्त केल्या. यामुळे तीव्र संघर्ष झाला. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर ड्रोन हल्ले आणि गोळीबार केला. भारताने याला तितक्याच तीव्रतेने प्रत्युत्तर दिलं.
युद्धविरामाची अधिकृत घोषणा होण्यापूर्वी ट्रम्प यांनी “पूर्ण आणि तात्काळ युद्धविराम” जाहीर केला. त्यांनी अमेरिकेने मध्यस्थी केल्याचा दावा केला. पण भारताने हा दावा खोडून काढला. भारत-पाकिस्तानमधील सर्व मुद्दे द्विपक्षीय चर्चेतून सोडवले जातील, अशी भारताची ठाम भूमिका आहे.
या चर्चेत मोदींनी भारताच्या दहशतवादविरोधी धोरणाची स्पष्टता दाखवली. भारताने नेहमीच स्वतंत्र आणि स्वावलंबी धोरण स्वीकारलं आहे. ऑपरेशन सिंदूर ही त्याचीच साक्ष आहे. दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिका संबंध आणि दहशतवादविरोधी सहकार्यावरही चर्चा केली.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter