भारत-कॅनडा संबंध पुन्हा येणावर रुळावर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 3 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काल कॅनडाच्या नव्या परराष्ट्रमंत्री अनिता आनंद यांच्याशी फोनवर संवाद साधला. मार्क कार्नी यांनी कॅनडाचे पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर दोन्ही देशांमधील हा पहिला उच्चस्तरीय संवाद आहे. फोनद्वारे झालेल्या चर्चेत दोन्ही देशात आर्थिक सहकार्य वाढवणे आणि सामायिक प्राधान्यांवर काम करणे यावर भर देण्यात आला. 

जयशंकर यांनी X वर लिहिले, “अनिता आनंद यांच्याशी भारत-कॅनडा संबंधांच्या शक्यतांवर चर्चा केली. तसेच त्यांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.”

कॅनडाच्या मंत्री अनिता आनंद यांनीही या संवादाविषयी X वर लिहिले, “भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे आजच्या चर्चेसाठी आभार. भारत-कॅनडा संबंध मजबूत करणे, आर्थिक सहकार्य वाढवणे आणि सामायिक प्राधान्यांवर पुढे जाण्यासाठी मी उत्सुक आहे.”

जस्टिन ट्रुडो यांच्या नेतृत्वात भारत-कॅनडा संबंध तणावपूर्ण झाले होते. सप्टेंबर २०२३ मध्ये ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येत भारतीय एजंट्सचा हात असल्याचा आरोप केला. भारताने हे आरोप फेटाळले होते. कॅनडा खलिस्तानी समर्थकांना आश्रय देत असल्याचे भारताचे मत होते. 

कॅनडाने भारताचे तत्कालीन उच्चायुक्त संजय वर्मा यांच्यासह काही राजनयिकांना निज्जर हत्येशी जोडले होते तेव्हा हा वाद आणखी चिघळला होता.  भारताने ऑक्टोबर २०२३ मध्ये वर्मा आणि पाच अन्य राजनयिकांना माघारी बोलावले. त्याचवेळी कॅनडाच्या सहा राजनयिकांना भारतातून हकालपट्टी केली होती. ट्रुडो यांच्या कार्यकाळानंतर भारताने कॅनडाशी ‘परस्पर विश्वास आणि संवेदनशीलता’ आधारित संबंध पुन्हा बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती. मंत्री जयशंकर आणि अनिता आनंद यांच्यातील हा संवाद त्याच दिशेने पहिले पाऊल आहे.

अनिता आनंद यांचा परिचय
मूळ भारतीय वंशाच्या कॅनडाच्या अनिता आनंद उदारमतवादी पक्षाच्या (Liberal Party) ज्येष्ठ नेत्या आहेत. मे २०२५  मध्ये परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी त्या कॅनडाच्या संरक्षणमंत्र्य होत्या. मंत्रिपदाची शपथ घेताना त्यांनी भगवद्गीता हातात धरली, हा क्षण त्यांनी यापूर्वीही मंत्रिपद स्वीकारताना पुनरावृत्ती केला होता. मार्क कार्नी यांच्या नव्या मंत्रिमंडळात त्यांची नियुक्ती भारत-कॅनडा संबंध सुधारण्यासाठी सकारात्मक संदेश मानली जात आहे. 

आर्थिक सहकार्य आणि सामायिक ध्येये
या चर्चेत दोन्ही नेत्यांनी आर्थिक सहकार्य वाढवण्यावर जोर दिला. भारत आणि कॅनडा यांच्यात व्यापार, तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात सहकार्याच्या अनेक संधी आहेत. गेल्या काही महिन्यांत दोन्ही देशांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांमधील संपर्क पुन्हा सुरू झाला आहे. नवे उच्चायुक्त नेमण्याच्या चर्चाही सुरू आहेत, असे पीटीआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter