देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या संखेत 'इतकी' वाढ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

देशात कोविड-19 च्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होत आहे. चंदीगड येथे कोविडमुळे या वर्षातील पहिला मृत्यू झाला आहे. मुंबईत दररोज सरासरी ११ नवीन रुग्ण आढळत असून, केरळ ४३० तर महाराष्ट्र  २१० आणि दिल्लीत १०४  सक्रिय रुग्ण आहेत.  NB.1.8.1 आणि LF.7 या नव्या व्हेरिएंट्सवर जागतिक आरोग्य संघटना (WHO) नजर ठेवून आहे. 

उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील ४० वर्षीय व्यक्तीचा चंदीगड येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल (GMCH), सेक्टर 32 येथे कोविड-19 मुळे मृत्यू झाला आहे. या रुग्णाला श्वसनाच्या तक्रारींमुळे लुधियाना येथून चंदीगडला हलवण्यात आलं होतं. कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. 

मुंबईत रुग्णांची संख्या वाढली 
मुंबईत मे महिन्यात कोविड-19 च्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. शहरात या महिन्यात ३४६ रुग्ण  असून, २८ मे रोजी  मुंबईत ३६ नवीन रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत ५२१ रुग्ण सापडले असून  त्यापैकी ३४३ मे महिन्यात आढळले आहेत. २८ मे रोजी राज्यात ८६ नवीन रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबई ३६, ठाणे २४ आणि पुण्यातील ९ रुग्णांचा समावेश आहे.  

तर महाराष्ट्रात यंदा कोविडमुळे ६ मृत्यू झाले आहेत.  BMC च्या वरिष्ठ साथरोगतज्ज्ञाने सांगितलं, “हा विषाणू आता स्थानिक (endemic) झाला आहे. याला नियंत्रित आणि तर्कसंगत प्रतिसादाची गरज आहे.”

केरळ, कर्नाटक, ओडिशामध्येही वाढ
देशात सर्वाधिक कोविडचे रुग्ण केरळमध्ये आहेत. केरळमध्ये  ४३० तर कर्नाटकात १२६  सक्रिय रुग्ण आहेत. या वर्षी कर्नाटकात २११ रुग्ण नोंदवले गेले असून, सध्या दोन रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. 

नवे व्हेरिएंट्स  NB.1.8.1 आणि LF.7
भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक्स कन्सोर्टियम (INSACOG) ने NB.1.8.1 आणि LF.7 या दोन नव्या व्हेरिएंट्सची नोंद केली आहे.  हे व्हेरिएंट्स गुजरात आणि तामिळनाडूत आढळले असून, WHO ने त्यांना Variants Under Monitoring (VUMs) म्हणून वेगळे केलं आहे. सध्या हे व्हेरिएंट्स Variants of Concern नाहीत. भारतात JN.1 हा सर्वात प्रबळ व्हेरिएंट असून, तो ५३ टक्के रुग्णांमध्ये आढळतो. 

 सावधगिरी बाळगण्याचे आवाहन 
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रुग्णसंख्या वाढत असली, तरी गंभीर लक्षणं असलेली प्रकरणं कमी आहेत. बहुतेक रुग्णांना ताप, थकवा, आणि घशात खवखव यासारखी सौम्य लक्षणं दिसतात. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि कर्नाटक सरकारने मास्क वापरणं, हात स्वच्छ ठेवणं, आणि गर्दीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter