हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या बाबूजमाल दर्यात गुरुवारी कुदळ मारण्याचा विधी झाला
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरमला आता प्रारंभ झाला आहे. शहरातील पंजे प्रतिष्ठापना होणाऱ्या ठिकाणी आज कुदळ मारण्याचा पारंपरिक विधी झाला. उद्या (शुक्रवार) पासून ठिकठिकाणी पंजे प्रतिष्ठापनेला प्रारंभ होणार आहे.
बाबूजमाल दर्गा येथे अमिन ऊर्फ बालमभाई झारी यांच्या उपस्थितीत कुदळ मारण्याचा विधी झाला. त्यानंतर हिंदू-मुस्लिम धर्मीयांसाठी प्रार्थना झाली. सलग दहा दिवस मोहरमचे पर्व असेल. सातव्या दिवसापासून पंजे भेटीला प्रारंभहोईल. पाच जुलैला खत्तलरात्र असून, सहा जुलैला पंजे विर्सजन होणार आहे.
मोहरम उत्सव समितीच्यावतीने यंदाही नेटके संयोजन केले आहे. शहर आणि परिसरात दीडशेहून अधिक ठिकाणी पंजे प्रतिष्ठापना होणार आहे. मोहरम हा कारुण्याचा सण असून, मोठ्या आवाजाच्या सिस्टीम लावू नये, पारंपरिक वाद्यपथकांना निमंत्रित करावे, पंजेभेटीवेळी वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन समितीने केले आहे.