अन् शाहू महाराजांच्या निधनानंतर आबालाल यांनी आपली चित्रे पंचगंगेत केली विसर्जित

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

६ जून राजर्षी शाहू महाराज जयंती.शाहू महाराजांच आयुष्य केवळ ४७ वर्षांच पण या आयुष्यात त्यांनी येणारी अनेक शतके लक्षात राहतील अशी कार्ये केली. त्यामध्ये प्रथम आरक्षणाची सुरुवात, शिक्षणाचा प्रसार त्याकाळी एखादा राजा आपलं नाव कायम राहावं यासाठी मंदिरे बांधत होते तेव्हा राजर्षी शाहू महाराज यांनी प्रत्येक जाती-धर्मातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावं यासाठी वसतिगृह उभारली आजही हि वसतिगृह विद्यार्थ्यांना वरदान ठरत आहेत. एकूणच शाहू महाराज यांनी कोल्हापुरात कला, क्रीडा, शिक्षणाची बीज पेरली. आज जे कोल्हापूर सर्वगुणसंप्पन आहे त्याचे एकमेव कारण म्हणजे राजर्षी शाहू महाराज.

महाराज हे अत्यंत कलाप्रेमी होते त्या काळी त्यांनी कलेला राजाश्रय दिला. यामधील त्यांचे सगळ्यात जावळचे म्हणजे चित्रकार शिल्पकार आबालाल रहिमान जेव्हा शाहू महाराजांचे १९२२ साली निधन झाले तेव्हा आबालाल यांना मोठं धक्का बसला. आपल्या चित्रांचा खरा रसिक गेला या भावनेने त्यांनी काढलेली चित्र पंचगंगा नदीमध्ये सोडली. यामधून शाहू महाराजांच्या विषयी असणारे प्रेम दिसून येते.जितकी आपुलकी आबालाल रहिमान यांची शाहूंच्या विषयी होती. तितकीच शाहूराजांनाही त्यांच्याबद्दल होती या दोघांची कहाणी एखाद्या चित्रपटासारखीच पण अगदी खरी आहे.

१८६० च्या दरम्यान कोल्हापूर मधील कासारगल्ली येथे एका मुस्लिम कुटूंबात आबालाल यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कोल्हापूर संस्थानात काम करायचे आणि त्यासोबतच ते कुराणाच्या प्रति देखील तयार करायचे. कुराणाच्या पानाभोवती असणारे नक्षीकाम वडिलांसोबत तेही आवडीने करायचे.

यातूनच त्यांच्यातील कला गुण दिसून येत. लहान वयातच ते व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, जिथे वेळ मिळेल तिथे काढायचे. एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या पत्नीचे त्यांनी व्यक्तिचित्र काढले. ते पाहून भारावून गेलेल्या त्या ऑफिसरने शाहू महाराजांना विनंती केली कि या मुलाला "जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे कलेचे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती द्यावी. शाहूराजांनी त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली.

"जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिक्षण घेत असतानाच ब्रिटिश त्यांच्याकडून चित्र काढून घेत आणि लंडनला पाठवून देत. विद्यार्थीदशेतच ते प्रसिद्ध झाले. शिक्षण झाल्यानंतर ते कोल्हापुरात परतले. त्यांना पसंत असलेल्या मुलीशी त्यांना लग्न करता न आल्याने ते भौतिक जगापासून दूर गेले. कोल्हापुरातील कोटीतीर्थ येथे ते एका फकीरासोबत राहू लागले आणि हळू हळू ते हि फकीराप्रमाणेच झाले. तिथे ते वेगवेगळ्या रंगाची माती, कोळसा याच्या माध्यमातून चित्र काढत असत. त्यांची हि अवस्था झालेली माहिती शाहू महाराजांपर्यंत पोहोचली. शाहू महाराजांनी त्यांना तात्काळ बोलावून घेतलं.

फाटलेली कपडे, वाढलेली दाढी, आणि कमकुवत झालेले शरीर पाहून शाहू महाराजांना दुःख झाले. एका महान चित्रकाराची हि अवस्था पाहून त्यांना स्वस्थ बसवत नव्हत. त्यांनी आबालाल यांना आर्थिक मदत केली शिवाय अहिल्याबाई गर्ल्स हायस्कूल मध्ये शिक्षक पदी नेमणूक केली तेव्हा त्यांना २५ रु मानधन देखील सुरु केले. इथूनच त्याची ओळख आबालाल मास्तर अशी बनली. आबालाल हे मुळात स्वतःच्या मानाने वागणारे , चौकटीत न राहणारे व्यक्तिमत्व होते. त्यांना ह्या शाळेच्या नोकरीत मन रमेना. शाहू महाराज त्यांची वरचेवर चौकशी देखील करत असत. महाराजांच्या लक्षात आलं कि आबालाल यांची या नोकरीत कुचंबणा होत आहे. तेव्हा महाराजांनी त्यांना नोकरीच्या जाळ्यातून मुक्त केले. पण त्यांचे मासिक वेतन सुरूच ठेवले.

आबालाल हे आता शाहू महाराजांसोबत राहू लागले, ते शिकारीला गेले, किंवा काही कामानिमित्त राधानगरी, पन्हाळा, अशा ठिकाणी गेले कि ते आबालाल यांना सोबत घेऊन जात. तिथे ते निसर्गचित्र रेखाटत, महाराजांना ते घरच्यांसारखे होते. त्यांचे भावनिक बंध अतूट होते. या काळात आबालाल यांनी चित्रकलेत असंख्य प्रयोग केले. विशेषतः वॉटर कलर, आणि ऑइल पेंटींग मध्ये त्यांची निसर्गचित्र अभ्यासण्यासारखी आहेत. आबालाल यांना आपण केवळ चित्रकार म्हणणं चुकीच ठरेल कारण ते एक उत्तम सारंगी वादकही होते.अध्यत्मात त्यांना आवड होती असे हरहुन्नरी, खरे, आणि प्रामाणिक कलाकार होते. म्हणूनच ते शाहू महाराजांच्या जवळचे म्हणता येईल.

शाहू महाराजांचे १९२२ साली निधन झाले. याचे दुःख तर सगळ्यांनाच होते पण आबालाल यांना त्याचा मोठं धक्का बसला. आपल्या चित्रांचा खरा रसिक गेला अशी त्यांची भावना झाली. अखेर आबालाल पंचगंगा नदीच्या काठी गेले आणि नदीच्या वाहत्या प्रवाहात त्यांनी काढलेली चित्र सोडली. चित्रकाराच्या हातून त्याचे रंग हिरावून घ्यावे अशी आबालाल याची अवस्था झाली.

ते नैराश्येत गेले. यानंतर त्यांनी एकूणच चित्र काढणं कमी केले. ते एका खोलीत एकांतात राहू लागले. २७ डिसेंबर १९३१ रोजी त्यांनी स्वतःचे आरशात पाहून जलरंगातील चित्र काढले आणि हेच चित्र आबालाल यांचे अखेरचे चित्र ठरले. २८ डिसेंबर १९३१ रोजी त्यांच्या खोलीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या राजाला स्वतःपेक्षाही जास्त किंमत देणारे आबालाल यांची चित्र आजही शाहू महाराज आणि आबालाल यांच्या नात्याची साक्ष देत आहेत.

- प्रसाद महेकर
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter