चीन दौऱ्यावर असलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रेई बेलुसोव्ह यांच्याशी अनौपचारिक चर्चा केली.
पहलगाम हल्ल्याचा निषेध केला नसल्याने आणि पाकपुरस्कृत दहशतवादाबाबत भारताला वाटणाऱ्या चिंतेची पुरेशी दखल न घेतल्याने संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संयुक्त निवेदनावर सही करण्यास नकार दिला. यामुळे संरक्षणमंत्र्यांची ही परिषद कोणत्याही संयुक्त निवेदनाविनाच आटोपली.
'एससीओ'च्या सदस्य देशांच्या संरक्षणमंत्र्यांची परिषद चिंगदाओ या किनारपट्टीवरील शहरात झाली. या परिषदेत प्रादेशिक सुरक्षेबाबतच्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. येथे केलेल्या भाषणात राजनाथसिंह यांनी दहशतवाद्यांना पाठबळ देत असल्याबद्दल पाकिस्तानवर कठोर शब्दांत टीका केली. ते म्हणाले, "काही देश दहशतवादाचा धोरण म्हणून वापर करतात. दहशतवाद्यांना ते आश्रय देतात. अशा प्रकारच्या दुटप्पी वागण्याला वेळीच आवर घालायला हवा. अशा देशांवर टीका करण्यात शांघाय सहकार्य परिषदेने मागेपुढे पाहायला नको." राजनाथसिंह यांनी दहशतवादाबाबत भारताच्या भूमिकेचीही सविस्तर माहिती दिली आणि दहशतवाद्यांना बळ देणाऱ्यांच्या दुटप्पी वागण्याला साथ न देण्याचे आवाहन इतर सदस्य देशांना केले. "दहशतवादाच्या छायेत शांतता आणि समृद्धी नांदू शकत नाही. मानवी विनाशाची शस्त्रे दहशतवाद्यांच्या हातात जाणे योग्य नाही. आपल्या संकुचित आणि स्वार्थी ध्येयासाठी दहशतवादाला पाठबळ देणारे, त्याला खतपाणी देणारे आणि त्याचा वापर करणारे देश अखेरीस स्वतःच अडचणीत येतात," असेही राजनाथसिंह म्हणाले. या परिषदेला पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ आणि चीनचे संरक्षणमंत्री दोंग यून हे उपस्थित होते. यानंतर तयार करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनाच्या मसुद्यात पहलगाम हल्ला आणि भारताला दहशतवादाबाबत वाटणाऱ्या चिंतेचा उल्लेख केला नसल्याने राजनाथसिंह यांनी त्यावर सही करण्यास नकार दिला.
'एससीओ'च्या नियमानुसार सर्वांचे एकमत झाल्याशिवाय संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले जात नाही. संयुक्त निवेदनाच्या मसुद्यामध्ये पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा उल्लेखच नव्हता. तसेच, सीमेपलिकडील दहशतवादाचा भारताला होणारा त्रास आणि त्याबाबतची भारताची भूमिका याचीही पुरेशी दखल निवेदनात घेण्यात आली नव्हती.
'यूएन'मध्ये पाकला खडे बोल
न्यूयॉर्क: देशातील मुलांची बिकट स्थिती आणि दहशतवादाकडे काणाडोळा करणाऱ्या पाकिस्तानला भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये खडे बोल सुनावले. 'पाकिस्तान आपल्या देशातील मुलांवरील अत्याचाराच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहे. याबाबत संयुक्त राष्ट्रांच्या संकेतांनाही पाकिस्तानने धुडकावून लावले आहे,' अशा शब्दांत भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी राजदूत पी. हरीश यांनी भूमिका मांडली. संयुक्त राष्ट्रांमध्ये 'मुले आणि सशस्त्र संघर्ष' या विषयावरील वार्षिक खुल्या चर्चासत्रात बोलताना हरीश म्हणाले, "मी पाकिस्तानच्या प्रतिनिधीने केलेली टिप्पणी नाकारतो. यामागे निव्वळ राजकीय हेतू आहे. याबाबत संयुक्त राष्ट्रांच्या अजेंड्याचे पाकिस्तान उल्लंघन करीत असून, पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांच्या प्रक्रियेवर चुकीचे आरोप करत आहे. आपला घृणास्पद मुद्दा पुढे रेटण्यासाठी पाकिस्तान विविध चर्चामध्ये भारताची बदनामी करत आला आहे. या कृत्याद्वारे पाकिस्तान स्वतःच्याच देशात मुलांवर होत असलेल्या अत्याचारांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. "
'पहलगाम हल्ला विसरलेले नाही'
हरीश म्हणाले, "पाकिस्तान प्रशिक्षण घेतलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेला हल्ला जग विसरलेले नाही. मुले आणि सशस्त्र संघर्ष याबाबतच्या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात पाकिस्तानातील सशस्त्र संघर्षामध्ये मुलांवर झालेल्या परिणामांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. शाळांवर, विशेषतः मुलींच्या शाळांवर, आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांबद्दल सरचिटणिसांनी चिंता व्यक्त केली पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवरील मुलांच्या हत्या, त्यामुळे त्यांना आलेले अपंगत्व यामागे पाकिस्तानच्या सैन्याने केलेला गोळीबारच कारणीभूत आहे. अशा कृत्यानंतरही संयुक्त राष्ट्रात उपदेश करणे हा ढोंगीपणा आहे."
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter