अमरनाथ यात्रेकरूंमध्ये यंदा दहा टक्के घट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या यंदा दहा टक्क्याने घटल्याची माहिती जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी गुरुवारी दिली. पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी हल्ला होण्याआधी अमरनाथ यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी भरपूर मोठ्याप्रमाणात नोंदणी सुरू होती. मात्र, हल्ल्यानंतर अमरनाथसाठी नोंदणी करणाऱ्यांच्या संख्येत घट झाली. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अमरनाथला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत तब्बल १०.१९ टक्क्यांनी घट झाली असल्याचे सिन्हा यांनी राज भवन येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पहलगाम हल्ल्या आधी सुमारे २.३६ लाख भाविकांनी अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी केली होती. यापैकी ८५ हजार भाविकांना ते यात्रेला येणार असल्याचे प्रशासनाकडे नोंदविले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर प्रशासनाने येथील सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा केल्याने एवढ्या संख्येने भाविकांनी यात्रेला येण्याचा निर्णय घेतला आहे, असे सिन्हा यांनी सांगितले. तीन जुलै ते ९ ऑगस्ट यादरम्यान होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठीच्या बेसकॅम्पवर त्रिस्तरीय सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आसपासच्या परिसरातही सुरक्षा यंत्रणांकडून गस्त घालण्यात येत आहे.