UP मध्ये सणांदरम्यान येणार 'ही' नवी आचारसंहिता

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेऊन आगामी सणांदरम्यान कायदा-सुव्यवस्था, सामाजिक एक्य आणि लोकसुविधा सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. या बैठकीत राज्यातील सर्व पोलिस आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षक यांच्याशी सविस्तर चर्चा झाली.

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिले की, सर्व धार्मिक कार्यक्रम भक्ती, सुरक्षा आणि सामाजिक समरसतेसह पार पाडावेत आणि प्रशासनाने पूर्ण संवेदनशीलता आणि सतर्कतेने कार्य करावे. ११ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत पवित्र श्रावण महिना साजरा होणार आहे.  यात कावड यात्रा, श्रावणी शिवरात्री, नाग पंचमी आणि रक्षाबंधन यांचा समावेश आहे. याशिवाय, २७ जून ते ८ जुलै दरम्यान जगन्नाथ रथयात्रा आणि २७ जून ते ७ जुलै दरम्यान मुहर्रम साजरा होईल.

“हा संपूर्ण कालावधी कायदा-सुव्यवस्था, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे संबंधित विभाग आणि जिल्हा प्रशासनांनी समन्वय आणि जबाबदारीने कार्य करावे,” असे योगी यांनी अधिकृत निवेदनानुसार सांगितले. कावड यात्रेच्या शांततापूर्ण आणि सन्मानजनक आयोजनासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष निर्देश दिले.  

“यात्रा मार्गावरील डीजे, ढोल आणि संगीताची ध्वनिपातळी निर्धारित नियमांचं पालन करेल. कर्णकर्कश आवाज, उत्तेजक घोषणा आणि पारंपरिक मार्गापासून विचलन कोणत्याही परिस्थितीत स्वीकारलं जाणार नाही. ताजिया, रथ किंवा कांवर मिरवणुकीत वापरल्या जाणाऱ्या डीजेची उंचीही मर्यादेत राहील,” असं योगी म्हणाले.
 
 
“मिरवणूक मार्गावर प्रतिबंधित प्राण्यांच्या प्रवेशावर निर्बंध घालावेत. सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवावं, आणि आवश्यकतेनुसार ड्रोनद्वारे निरीक्षण करावं. खोट्या बातम्या आणि अफवांना त्वरित खंडन करून अचूक माहिती प्रसारित करावी,” असं योगी म्हणाले.  

यात्रेकरूंच्या सोयीसाठी स्वच्छता, रस्त्यावरील प्रकाश, पिण्याचं पाणी, शौचालये आणि प्राथमिक वैद्यकीय सुविधा सुनिश्चित कराव्यात. खराब विद्युत खांब आणि लटकणाऱ्या तारा त्वरित दुरुस्त कराव्यात. कॅम्प उभारणाऱ्या संस्थांची पडताळणी करावी आणि त्यांच्या सहकार्याने लोकसुविधा केंद्र चालवावीत.

श्रावणातील प्रत्येक सोमवारी राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होते. पंचायती राज आणि नगरविकास विभागांनी गाव, तालुके आणि शहरांमधील मंदिर परिसरात स्वच्छता, निचरा आणि वाहतूक व्यवस्थापन आधीच सुनिश्चित करावं. प्लास्टिक बंदी काटेकोरपणे लागू करावी.

कावड मार्गावरील खाद्यपदार्थांच्या जास्त किमती रोखण्यासाठी दर निश्चित करावेत असं योगी म्हणाले. खतांच्या जास्त किमतीच्या तक्रारींबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आणि जिल्हाधिकाऱ्यांना आकस्मिक तपासणी करून कठोर कारवाईचे निर्देश दिले.

मुहर्रमबाबत योगी यांनी गेल्या वर्षांतील घटनांमधून धडा घेऊन सर्व तयारी आधीच करण्याचे आदेश दिले. शांतता समित्या आणि आयोजकांशी समन्वय साधून पारंपरिक मार्गांवर कार्यक्रम शांततेने पार पाडावेत.

मुख्यमंत्र्यांनी जातीय संघर्ष भडकवण्याच्या कटांचा मुद्दा उपस्थित केला आणि कौशांबी, इटावा आणि औरैया येथील घटनांचा उल्लेख करत सांगितलं की, काही विघटकांनी अलीकडेच जातीय द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला. “असे दुष्ट हेतू राज्याच्या हिताविरुद्ध आहेत आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतलं जाणार नाही. असे कट त्वरित उघड करावेत, दोषींवर कठोर कारवाई करावी,” असा इशारा त्यांनी दिला.

तक्रार निवारणाबाबत, योगी यांनी सीएम हेल्पलाइन आणि आयजीआरएस पोर्टलवरील अर्जांचा आढावा घेतला आणि काही जिल्ह्यांची कामगिरी असमाधानकारक असल्याचं नमूद करत सुधारणा करण्याचा इशारा दिला.

‘स्कूल पेअरिंग पॉलिसी’ चा उल्लेख करताना त्यांनी सांगितलं की, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या हितासाठी काही प्राथमिक शिक्षण परिषद शाळा जोडल्या जात आहेत. ही प्रक्रिया पारदर्शक, समावेशक आणि स्थानिक गरजांशी संरेखित असावी. जिल्हाधिकाऱ्यांनी याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी, असं ते म्हणाले.  

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter